Jump to content

पान:अंगारमळा (Angarmala).pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असताना त्याच्यासमोर रस्त्यावर आडवे पडून बाबू गेनूने सत्याग्रह केला. गोऱ्या सोजरांनी ट्रक चालवून त्याच्या अंगावर घातला. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात असे समोरासमोर जाणीवपूर्वक नि:शस्त्र सत्याग्रहात हौतात्म्य पत्करल्याचे हे एकमेव उदाहरण असेल.

 १२ डिसेंबर १९८५ रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवर प्रचंड मेळावा घ्यायचे ठरले. मुंबईत मेळावा घ्यायचा तर मुंबईतील काही ताकदींना बरोबर घेतले पाहिजे म्हणून शिवसेना आणि कामगार आघाडी या दोघांबरोबर बोलणी सुरू झाली. मुंबईत कापड गिरण्यांचा प्रश्न त्या काळात बराच चिघळलेला होता. कामगार मोठ्या संख्येने राजीवस्त्र वापरणारे, त्यामुळे राजीवस्त्राविरुद्धचे आंदोलन मुंबईत आणि कामगारांत लोकप्रिय होणे दुरापास्तच; पण तरीही शेतकरी मुंबईत येतो आहे; तर कामगार आघाडीने त्याच्याबरोबर असलेच पाहिजे एवढ्या एकाच कल्पनेने का होईना डॉक्टरसाहेबांनी सहकार्य देण्याचे कबूल केले. मुंबईत आणि शिवाजी पार्कवर भरणाऱ्या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या उपस्थितीपेक्षा कामगार आघाडीची उपस्थिती जास्त भरघोस राहील असाही त्यांचा हिशेब असावा.

 शिवसेनेला त्या वेळी काही कार्यक्रमच राहिला नव्हता. गुजराथ्यांचा द्वेष करून झाला. तामिळी, मल्याळी, उत्तर प्रदेशातील पुरभय्ये यांच्याविरुद्ध विष ओकून झाले. शिवसेना मंबईतील मराठी तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर फोफावत होती. महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी नुकत्याच जिंकल्या होत्या. महापौरपदी शिवसेनेचे छगन भुजबळ विराजमान झाले होते. 'नवाकाळ'चे खाडिलकर रशियाला जाऊन आले होते; त्यांनी 'व्यावहारिक समाजवाद' नावाचे प्रकरण मांडायला सुरवात केली होती. वेगवेगळ्या समाजांत भांडण लावण्याचा धंदा सोडून व्यावहारिक समाजवादाकडे शिवसेना वळली होती, तोपर्यंत त्यांना हिंदुत्वाचा गर्व तर सोडाच, पण आपल्या हिंदुत्वाचीही फारशी जाणीव नव्हती.

 कामगार आघाडी आणि शिवसेना दोन्हीही राजीवस्त्रांच्या बहिष्काराच्या आंदोलनात आले तर मोठे जबरदस्त आंदोलन उभे राहील अशा हिशेबाने बोलणी सुरू झाली. बाळ ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा सारा वृत्तांत स्वतंत्रपणे लिहिण्यासारखा आहे. डॉ. दत्ता सामंतांच्या स्मरणलेखात त्याने जागा अडवणे योग्य होणार नाही. ठाकरे, मनोहर जोशी यांनी राजीवस्त्रांच्या विरुद्धच्या चळवळीला पाठिंबा दिला. एकत्र काम करायला लागावे मग त्याला काय मूर्त स्वरूप देता येईल ते पाहावे असे ठरले. पण तरीही शेवटी शिवसेनेने आपले अंग काढून घेतले. शिवसेना व कामगार आघाडी यांच्यातून विस्तव जात नव्हता. दत्ता सामंत मंचावर असतील तर आम्ही तेथे येणार नाही असे ठाकऱ्यांनी

अंगारमळा । १००