पान:अंगारमळा (Angarmala).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सूटसबसिडी लाटणारे, वर टॅक्स भरण्याची जरूर नाही आणि आपल्या बहुसंख्येचा वापर करून राजकारणावर पगडा बसवणारा समाज अशी धारणा होती. 'डॉक्टरसाहेब काही तसले बोलतील तर उगाचीच बाचाबाची होईल. शेतकरी आंदोलनाच्या सुरवातीच्या काळात असे काही होणे बरे नाही. डाव्यांना चिखलफेक करायला आयती संधी मिळेल', असा विचार करून मी डॉक्टरसाहेबांच्या बरोबर रस्त्यावर गेलो. डॉक्टर सामंतांचा परिचय सर्वांना करून दिला. शेतकरी, शेतमजूर आणि शेतकरीकामगार या प्रश्नावर मी दिलेले ते पहिले भाषण. मग डॉक्टरसाहेब उठले; बोलण्याची शैली मोठी जोरकस. माझ्या भाषणात आकडेवारी, युक्तिवाद यामुळे एक प्राध्यापकी बोजडपणा आलेला. त्याउलट, डॉक्टरसाहेबांचे भाषण म्हणजे 'दे दणादण, दे दणादण'; मुंबईला काळ्या घोड्यापर्यंत त्यांनी लक्षावधी कामगारांचे मोर्चे नेलेले आणि डॉक्टर सामंत दिसले, की एक तालात कामगार रस्त्यावर पाय आपटून 'दे दणादण'चे कीर्तन चालू करतात हे मी ऐकले होते. बोलताना त्यांची मातृभाषा मराठी नाही असे वाटत होते; पण मोठे प्रभावाचे बोलले. 'शेतकरीकामगार यांच्यात सघर्ष नाही. भांडवलशाही जुलमाचे दोघेही बळी आहेत; कामगार आता उठला आहे. शेतकरी आता उठायला सुरवात झाली आहे. या दोन ताकदी एकत्र आल्या तर घाम गाळून जगणाऱ्यांचा उदय झाल्याखेरीज राहणार नाही.' अशी त्यांनी बाजू मांडली. शेतकरीकामगार एकजुटीच्या जयजयकाराच्या घोषणा झाल्या. आम्ही त्यांना रस्ता काढून दिला. ते निघून गेले. रस्ता रोकोच्या खिंडीतून शिताफीने सुटण्याची त्यांची ही रणनीती असावी असा काहीसा भास झाला.

 १९८३ च्या नोव्हेंबरमध्ये पढरपूरला 'विठोबाला साकडे' घालायचा मेळावा घ्यायचे ठरले. ८० ते ८३ या काळात कांदा, ऊस, तंबाखू, दूध अशा अनेक विषयांवर सतत आंदोलने होत होती. धुळ्याचा जनावरांचा मोर्चाही गाजला होता. संघटनेने काहीही कार्यक्रम काढला, की त्यावर आपोआप बंदी यायची आणि त्या जिल्ह्यात प्रवेश करण्याचीही बंदी माझ्यावर लागायची. यावर उपाय म्हणून आम्ही कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने 'विठोबाला साकडे' घालायचा कार्यक्रम ठरवला; पण त्यावरही बंदी घातली गेली. साऱ्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्याचीच बंदी माझ्यावर आली. शेतकरी आंदोलन चेपून टाकावे ही राज्यकर्त्यांची धडपड. पोलिसांची वागणूक बेफाम आणि अहिंसात्मक सत्याग्रही आंदोलनाच्या बेड्या आम्ही स्वत:च्याच पायात अडकवून घेतलेल्या. अशा परिस्थितीत आम्ही डॉक्टर सामंतांशी संपर्क साधला. पंढरपूरच्या कार्यक्रमाला शेतकरीकामगार असे संयुक्त रूप द्यावे असा विचार चालू झाला. शेतकरी संघटनेच्या बरोबरच

अंगारमळा । ९८