पान:अंगारमळा (Angarmala).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जमणाऱ्या लोकांत बहुतेक सर्व समाजवादी, कामगारवादी, एके काळी काँग्रेस शासनाविरुद्ध लढ्यात बरोबर आलेले, आज त्यांच्या विचारसरणीला चिकटून राहिल्याने मागे पडलेले. अशा प्रसंगीतरी त्यांच्या गाठीभेटी व्हाव्यात असे वाटत नव्हते. पंतनगरच्या घरासमोर दोनतीनशे दर्शनच्छुकांची रांग लावलेली होती. रांगेत उभे राहिलो असतो तर अर्धापाऊण तासतरी गेला असता; तेथूनच नमस्कार करून जावे अशा विचारात होतो, तेवढ्यात तेथील एका कार्यकर्त्याने मला ओळखले आणि रांग ओलांडून मला आत नेले. विनीताताई, प्रकाश, भूषण यांच्या चेहऱ्याकडे खरेच पाहवत नव्हते. दहा वर्षांपूर्वीच्या अनेक आठवणी झपाट्याने येऊन गेल्या; पण त्या सगळ्याच आता काळाच्या ओघाने विटून गेलेल्या आणि निरर्थक झालेल्या.

 डॉक्टरांची माझी पहिली गाठभेट चाकणच्या कांदा आंदोलनातच झाली. चाकणला कांद्याची पोती रस्त्यावर टाकून, आम्ही रस्ता अडवून बसलो होतो. सुरवातीला जे काही लोक रस्त्यावर अडकले, त्यांतच डॉक्टरसाहेब आणि त्यांचे सहकारी होते. मुंबईहून आंबेगाव जुन्नरकडे जाताना ते चाकणमध्ये अडकले. मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या इमारतीत उपोषण करत होतो. कार्यकर्ते डॉक्टरांना घेऊन माझ्याकडे आले. रस्त्याच्या कोंडीतून आम्हाला तरी सोडवा अशी माझ्याकडे विनंती करायला अनेक माणसं येत; त्यांची थोडी समजूत काढणे आणि रस्ता पार करून देणे हे सारखे करावेच लागत होते. डॉ. सामंत आले, नमस्कार-चमत्कार झाले, 'आपण प्रसिद्ध कामगार नेते आहोत, कामासाठी आलो आहोत, आम्हाला जाऊ द्या', अशी त्यांची विनंती असणार असा माझा होरा आणि त्यांना सोडून देण्याची सूचना कार्यकर्त्यांना देण्याच्या तयारीत मी होतो; पण डॉक्टरांनी अशी विनंती केलीच नाही. ते म्हणाले, "शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहते आहे ही मोठी आनंदाची आणि आशादायी गोष्ट आहे. मीही संप, आंदोलने करतो; मला आंदोलन सोडून पुढे जायचे नाही. येथे जमलेल्या शेतकऱ्यांशी दोन शब्द बोलावे एवढी इच्छा आहे."

 १९८० सालच्या काळात शेतकरी आणि शेतमजूर यांच्यामध्ये मोठी खाई पेटलेली होती आणि त्यात तेल ओतण्याचे काम सातत्याने डावी मंडळी सतत करत असे. डावी चळवळ म्हणजे मजूर, कामगार यांची चळवळ आणि शेतकरी चळवळ म्हणजे निव्वळ गावातील धनदांडग्यांची स्वार्थी आघाडी असे सर्वसाधारण वातावरण होते. शहाद्याचे 'पुरुषोत्तम सेना' प्रकरण आणि त्याविरुद्ध डाव्यांनी केलेले आंदोलन; त्यामुळे शेतकरी समाज मोठा बदनाम झाला होता. शेतकरी म्हणजे ऊसवाले, कापूसवाले; भरपूर

अंगारमळा । ९७