पान:अंगारमळा (Angarmala).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मंडईतील एका अडत्याला तार पाठवली होती: 'सफरचंदे पाठवू नयेत.' पुण्यातील अडत्यांनी रामचंद्र बापू आणि भास्करभाऊंना तो सांकेतिक निरोप कळवला. त्यांना अर्थ समजला आणि लगेच आंदोलनाची घोषणा झाली.सांकेतिक संदेशाची ही व्यवस्था मी घालून दिलेली नव्हती, ही सारी शंकररावांची दूरदृष्टी, कल्पनाशक्ती.

 कॉलेजचे तोंड न पाहिलेले शंकरराव राम जेठमलानींना आमची केस कशी समजावून सांगत कोण जाणे? चंडीगडच्या उच्च न्यायालयात भालसिंग मलिक म्हणजे मोठे मशहूर वकील. संघटनेवर त्यांचे मोठे प्रेम. आपल्या युक्तिवादाने आणि भाषणाने भल्याभल्या न्यायाधीशांना आणि प्रतिपक्षाच्या वकिलांना चकित करणारे भालसिंग शंकररावांसमोर हात जोडून "शंकररावजी, तुम्ही फक्त हुकूम द्या, अंमल करण्याचे काम आमचे," असे म्हणताना मी ऐकले आहे. चंडीगडच्या इस्पितळात तीन आठवडे माझ्याबरोबर शंकरराव होते. हिंदुस्थानातील श्रेष्ठ श्रेष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांचा तेथे गठ्ठा होता. पण त्या सगळ्यांना शंकरराव मोठ्या थाटात हुकूम सोडत असत.

 कांद्याचे आंदोलन मागे पडू लागले, तसे मी त्यांना शेवटी म्हटले, 'आता बाहेर काहीच काम नाही, चला तुरुंगात आराम करू,' तेव्हा फक्त एकदाच शंकरराव आमच्याबरोबर औरंगाबादच्या हर्मूल तुरुंगात दहा दिवस आले. नाहीतर त्यांची कामगिरी 'डुबाव', कोणाच्या नजरेस न येणारी; गाजावाजा न होणारी, पण अत्यंत मोलाची.

 चाकण म्हणजे 'मावळांचे प्रवेशद्वार.' तीनशे वर्षांपूर्वी जगाच्या दृष्टीने नगण्य असलेल्या मावळ्यांनी तेथे इतिहास घडवला. स्वराज्याची लढाई झाली नसती तर कितीक तानाजी, बाजीप्रभू, येसाजी आणि सावळ्या तांडेल जगाला अज्ञात राहिले असते. शेतकरी आंदोलन झाले नसते तर शंकरावांची विलक्षण बुद्धी, परखड मते, कोणाचा मुलाहिजा न ठेवता तोंडावर बोलण्याचा निर्भीडपणा, घरच्या साऱ्या अडचणी दूर ठेवून कोंडाण्याच्या लग्नाला पुढे जाण्याची तत्परता, निष्ठा सगळे समुद्राच्या तळातल्या रत्नाप्रमाणे अज्ञात राहिले असते.

 पुढे, शंकररावांच्या घरच्या अडचणी वाढल्या. आंदोलनाचे स्वरूप बदलले, आवाका वाढला, शंकरराव स्थानिक संघटनेच्या कामापुरते राहिले; पण कुठे मोठी सभा असली, अधिवेशन असले, कार्यकारिणी असली, की अनंत अडणी दूर करून शंकरराव येणार, आपल्या धन्याच्या समाधीपुढे मूकपणे येऊन बसणाऱ्या 'खंड्या'सारखे बसणार. संघटनेच्या कार्यक्रमाविषयी एक अक्षर बोलणार नाहीत. पसंती दाखवणार नाहीत, नापसंती नाही. संघटनेने 'की' म्हटले की 'जय' म्हणण्याचे आपले काम. मी पुन्हा कधी

अंगारमळा । ६८