पान:अंगारमळा (Angarmala).pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यात्रा करणार. जेवायची सोय म्हणजे मुरमुरे आणि शेंगदाणे. या मोठ्या लोकांना फार जड वाटायचे. त्यांची हयगय दिसली, की शंकररावांना तोंडाचा फटका द्यायची चांगली संधीच. त्यांनी कुचेष्टा चालू केली, की 'भीक नको, कुत्रा आवर' म्हणून भलेभले चूप व्हायचे.

 संघटनेच्या आधी अनेक आंदोलनांशी शंकररावांचा संबंध आला. पण, तुरुंगात जाणे हे त्यांना न आवडणारे काम. त्यांना दोन खास सवलती होत्या. 'बहिर्जी नाईकी' करण्याकरिता पाहिजे तेव्हा बिल्ला न लावण्याची मुभा आणि तुरुंगाच्या बाहेर राहण्याची कामगिरी. आंदोलकांना तुरुंगात राहणे ही सगळ्यात आरामाची सुखावह गोष्ट. तुरुंगाच्या बाहेर राहणाऱ्यांना श्वास घ्यायची उसंत मिळत नाही. सतत धावपळ. पत्रकारांना भेट, वकिलांशी संपर्क साध, कार्यकर्त्यांना सूचना दे, तुरुंगातील लोकांना लागणाऱ्या तंबाखू, विड्या पोचवा, त्यांच्या कुटुंबियांना निरोप द्या. हा सगळा कामाचा बोजा शंकररावांनी प्रामुख्याने उचलला.

 ऑपरेशन ब्ल्यू स्टारनंतर पंजाबमधली परिस्थिती मोठी रौद्र आणि विचित्र झाली होती. मार्च ८४ च्या पंजाबच्या राजभवनाच्या घेराओच्या कार्यक्रमात खांद्याला खांदा लावून लढलेले पंजाबी शेतकरी आता शिखांवर काय भयानक अत्याचार चालू आहेत याची काहीशी अतिरंजित, रक्त तापवणारी वर्णन करत होते. शेतकरी आंदोलन वाचवायचे असेल तर स्वस्थ बसून चालणार नाही. काहीतरी आंदोलनाचा कार्यक्रम घेतला पाहिजे असे ठरले. सत्याग्रह चालू करून भारतीय किसान युनियनच्या हजारो शेतकऱ्यांना तुरुंगात घेऊन जाणे आणि त्यांच्या सत्याग्रहाला साऱ्या देशभरातील शेतकऱ्यांनी सक्रिय पाठिंबा देणे असा कार्यक्रम ठरला. त्यामुळे पंजाबातील शेतकऱ्यांना आपण एकाकी नाही, देशातील वेगवेगळ्या राज्यांतील वेगवेगळ्या धर्मांचे, वेगवेगळ्या जातींचे शेतकरी आपल्याबरोबर आहेत असा विश्वास वाटेल अशी कल्पना. जुलै ८४ मध्ये सत्याग्रह सुरू झाला. आम्ही सगळ्यांनी तुरुंगात जायचे, शंकररावांनी मात्र छातीला बिल्लासुद्धा न लावता बाहेर राहायचे. पंजाबमधील सत्याग्रहाला पुरेसा प्रतिसाद मिळतो आहे असे दिसले, की महाराष्ट्रात आंदोलन घडवून आणण्यासाठी निरोप द्यायचा असे ठरले. हजारएक सरदार शेतकऱ्यांबरोबर आम्ही महाराष्ट्रातील दहा जण चंडीगड जेलमध्ये गेलो आणि चार दिवसांत महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू झाल्याची बातमी वर्तमानपत्रांत वाचायला मिळाली. हे एवढे चटकन घडले कसे? त्या वेळी चंडीगडहून बाहेर निरोप पाठवणेसुद्धा जवळजवळ अशक्य होते. शंकररावांनी चंडीगडमधील एका फळविक्रेत्याकडून पुणे

अंगारमळा । ६७