पान:अंगारमळा (Angarmala).pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गतीनेच गेले पाहिजे. प्राध्यापक म्हणजे शाळकरी शिक्षक नव्हे.

 त्यावेळी माझ्या लक्षात आले नव्हते की, माझ्याबरोबरचे विद्यार्थी आणि माझे विद्यार्थी यात महदंतर होते. आर्थिक चणचण असली तरी सिडनेहॅममधला विद्यार्थी जात्याच आणि संस्काराने सर्वांगपरिपूर्ण होता. त्याच्या अवयवांत दोष नव्हता. व्यायाम दिल्यास आणि खुराक मिळाल्यास तो बलभीम बनू शकत होता.

 कोल्हापूरला माझ्यासमोर भक्तिभावाने ऐकणारे विद्यार्थी अपंग होते. एका अर्थान मतिमंद होते. प्राध्यापकाला उड्डाण करताना पाहता पाहता पंख उभारून उडण्याचा प्रयत्न करण्याचेही सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. पिढ्यानपिढ्यांची गरिबी आणि निरक्षरता यांनी त्यांना सर्वार्थाने खच्ची केले होते. तसे ते शिक्षणासाठीही आलेले नव्हते. महाविद्यालयाचा परिस अंगाला लागला तर शेतीच्या खातेऱ्यातून सुटू या आशेने ते आलेले होते. महाविद्यालय, शिक्षण, प्राध्यापक ही त्यांच्या दृष्टीने प्रगतीची साधने नव्हती, अपरिहार्यपणे उल्लंघण्याचे अडथळे होते. आणि हे अडथळे ओलांडत खेड्याच्या जीवनातून जिवंत कसे सुटता येईल हे ते घाबऱ्या डोळ्यांनी निरखत होते.

 आज नाही म्हटले तरी माझ्या भाषणांचा एक लौकिक आहे. अतिरिक्त मूल्य आणि भांडवल निर्मिती, आर्थिक विकासाच्या नैसर्गिक प्रक्रिया हे असले पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही जड वाटणारे विषय, बहुतांश अडाणी, निरक्षर शेतकऱ्यांच्या हजारोंच्या सभेत समजावून सांगतो; एकही इंग्रजी शब्द न वापरता, एकही बोजड शब्द न वापरता. शेतकऱ्यांच्या शब्दांत त्यांच्या उदाहरणाने, त्यांच्या रूपकांत. शेतकऱ्यांना ते समजते. त्याकरिता ते जीव ओवाळून टाकायला तयार होतात. हा एक चमत्कारच आहे. पण तसा समजायला कठीण नाही.

 पुस्तकातली विद्या इकडे खरीदून तिकडे विकायच्या दलालीत प्रतिभा येणार कोठून? सगळा पदव्यांचा भार सोडून आंबेठाणच्या माझ्या कोरडवाहू शेतीत मी उभा राहिलो आणि आर्थिक विकासाच्या प्रश्नाचे उत्तर मलाच मनोमन मिळाले. म्हणून वाचा सरस्वती फूलली. विद्यानामे अविद्येचे ओझे टाकले तेव्हा मी खरा विद्यार्थी बनलो आणि शिक्षकही.

 (शेतकरी संघटक, १० ऑक्टोबर १९८५ प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश भाग २- प्रथमावृत्ती, डिसेंबर १९८५, या पुस्तकातून)

■ ■ 

अंगारमळा । ६१