पान:अंगारमळा (Angarmala).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पण कोल्हापुरात आल्यावर आता मी धनवानांत जमा झालो होतो. त्याकाळी रु. २१० एकूण पगार म्हणजे वैभव होत. कोल्हापूरच्या सर्वोत्तम लॉजमध्ये शाकाहारी जेवणाला महिन्याला रु. ३० लागत होते. मांसाहारी जेवणाला रु. ३५. मी पद्मा गेस्ट हाऊसमध्ये उतरलो होतो. अजून रहावयाची जागा शोधत होतो. शेवटी वसतिगृहावर व्यवस्थापक म्हणून रहायला गेलो.

 एका संध्याकाळी गेस्ट हाऊसवर जेवत असताना, वाढणाऱ्या मुलाने चाचरत मला विचारले, "सर, ओळखलं का मला?" मी वर पाहिले. मला खरोखरच ओळख पटली नाही. तेव्हा तोच म्हणाला, "सर, मी तुमच्या वर्गात विद्यार्थी आहे, खांडेकर माझे नांव."
 महाविद्यालयातील विद्यार्थी, इथे गेस्ट हाऊसमध्ये वाढण्याचे काम करतो आहे. एकूण सर्व परिस्थितीची कल्पना येणं कठीण नव्हते. याच कोल्हापुरात माझे वडील अनाथ विद्यार्थी होते. जेवणाची इकडे तिकडे सोय लावून शिकले होते. मी माझी परीक्षा, माझे भविष्य, माझी स्वप्ने यांच्या पलीकडे असलेल्या एका जगाचा पडदा खांडेकरने उघडून दाखवला होता.

 सन १९५७ साली फार आड खेड्यापाड्यांतली शेतकऱ्यांची मुलं महाविद्यालयांत यायला लागली नव्हती. त्यांची फीची जबाबदारी शासनाने घेतल्यानंतर त्यांची संख्या वाढली. तरी दोनतीन मुलांच्या पुस्तकांची फीची व्यवस्था करणे पडले तेवढ्यावरच सामाजिक कर्तव्याची बाजू भागली.

 शिक्षणाचे माध्यम त्यावेळी इंग्रजी होते. भगण्यांचे इंग्रजी आणि मराठीवर सारखेच प्रभुत्व. ते वर्गात दोघांचे मिश्रण करीत. मला हे पटत नसे. मुंबईतही इंग्रजी वक्तृत्वाबद्दल माझी प्रसिद्धी होती. कोल्हापुरात त्याकाळी असे इंग्रजी दुर्मिळच होते. इतर कॉलेजांतले विद्यार्थीही केवळ इंग्रजी ऐकायला येऊन बसत असत. मोराने आपलाच पिसारा खुलवून नाचावे आणि त्यातच समाधान मानावे तसा हा प्रकार. अगदी जाहिरातशास्त्राच्या व्याख्यानातसुद्धा. साहित्य काव्यात्मक इंग्रजी व्याख्यान मी द्यायचो. पाच दहा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दाद मिळे. बाकीचे सगळे, 'अजि म्यां ब्रह्म पाहिले' अशा आविर्भावात बसून रहात. याबद्दल कधी वाईट वाटले तर मी स्वत:ची तुलना माझ्या प्राध्यापकांशी करे. डॉ. मुरंजन, डॉ. रणदिवे कुठे आम्हाला समजले आहे किंवा नाही याचा विचार करीत होते? ते त्यांच्या वेगाने जात. आम्ही त्यांच्यामागे जीव मुठीत धरून धावायचो, दमछाक व्हायची पण हळू हळू दम वाढत गेला. स्वत:च झेप घेण्याची ताकद आली. मग या विद्यार्थ्यांनाचते का जमणार नाही? आवश्य जमेल, आपण आपल्या

अंगारमळा । ६०