पान:अंगारमळा (Angarmala).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाचायला लागायचा.

 प्राध्यापकांबद्दलही असाच दबदबा. साहित्यिक म्हणून गाजलेले गंगाधर गाडगीळ अर्थशास्त्र शिकवायला तर कवि पु.शि. रेगे वाहतुकीचे अर्थशास्त्र शिकवायला. मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बोरकर, डॉ. कान्ता रणदिवे, हरिभाऊ परांजपे ही मंडळी एकावेळी अध्यापक वर्गात होती. रणदिवेबाईंचे आम्हाला खूप कौतुक असे. जॉन रॉबिन्सन आणि चेंबरलेन यांच्या मूल्य विवेचनाचा गणिती भाग बाई तोंडातून शब्दांचा स्त्रोत चालू ठेवत डाव्या हातांनी फळ्यावर उतरवत असत.

 पण खरे दैवत म्हणजे डॉ. एस.के. मुरंजन, सिडनेहॅमचे प्राचार्य. आंतरराष्ट्रीय नाणेतज्ञ म्हणून मान्यता मिळालेली, नुकतेच अमेरिकेहून परतलेले, मराठीत त्यांच्या नाणेव्यवस्थेवरील गाजलेली दोन पुस्तके नुकतीच प्रसिद्ध झाली होती. ही पुस्तके मराठीत लिहिल्याबद्दल तक्रार झाली. त्यांनी उत्तर दिले की, "ज्यांना या विषयाचा इतका उच्च अभ्यास करायचा आहे. त्यांनी मराठी शिकायला काय हरकत आहे." बस्स. या एकाच उत्तरावर आम्ही लट्टू होतो. त्या एका वाक्याने पदोपदी मराठी माणसाचे दैन्य धुतले गेल्यासारखे वाटत होते. मुरंजनांनी आम्हाला बँकिंग काही शिकवल्याचे मला आठवत नाही. पण कांटशी ओळख त्यांनी करून दिली. "I think, therefore, I am." या उक्तीतला सगळा उल्हास आणि आवेग मुरंजनांच्या चेहऱ्यावर अनुभवला. कोणी विद्यार्थी बेशिस्त वागला म्हणजे काही न बघता एका सहामाहीची फी दंड करण्याचा त्यांचा प्रघात असे. जिन्यावरून मुरंजन येत आहेत, हे कळले तरी आमची धावाधाव व्हायची. त्यांची एक 'चलती का नाम गाडी' होती. उद्योगपती पुत्र तिची खूप कुचेष्टा करायचे पण मुरंजनांनी गाडी असल्याशिवाय आयुष्य कसे व्यर्थ आहे, यावरच एक व्याख्यान दिले आणि त्याचा आम्हाला कुणालाच खेद झाला नाही.

 सकाळी अंधेरीहून लोकलने मरिन लाईन्सपर्यंत यायचे आणि तेथून चालत बोरीबंदरला जायचे. आपण आपला आभ्यास. क्रिकेट नाशिकलाच सोडलेले. देशाविषयी, अर्थव्यवस्थेविषयी, समाजातील सर्व संस्थांविषयी आमच्या कल्पना सगळ्या पुस्तकी. धनवानांच जगाचे ज्ञान कितीतरी जास्त व्यापक होते. एकदा विद्यार्थ्यांच्या गटात काही चर्चा चालली होती, समाजातील भ्रष्टाचाराबद्दल. कोणीतरी मराठी मुलानेच मुद्दा मांडला. "पण न्यायव्यवस्था तरी अजून स्वच्छ आहे. अशी माणसे आहेत तोपर्यंत काही आशा करायला जागा आहे." मला वाटते कान्ती पोद्दारनेच मुद्दा फटकारून टाकला, "कोणाला काय पुरवायला लागते, मे मला विचारून घे." एका वाक्यात एक नवे विश्वरूपदर्शन झाले.

अंगारमळा । ५९