Jump to content

पान:अंगारमळा (Angarmala).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुंबई विद्यापीठातील तीनही व्याख्यात्यांच्या शासकीय सेवेतील जागांकरिता निवड झाल्याच्या तारा आल्या. शासकीय जागेकरिताची निवड माझ्यावर सोपविण्यात आली होती. पुन्हा एकदा भणग्यांना सोडून जाण्याचा मोह झाला. भणगे अगदी काकुळतीला आले. अधिकार स्नेहाचा होता. मग थोडा नैतिकतेचाही प्रश्न त्यांनी उठवला आणि मी कोल्हापूरलाच रहावयाचे ठरवले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसताना याचा मला प्रचंड त्रास झाला.नवे काम, नवी संस्था; सिडनेहॅममध्ये दोन-तीन तास घेऊन अभ्यासाला मोकळा झालो असतो; इथे क्षणाचीही फुरसद मिळेना. परीक्षा चालू झाली तरी मला रजा घेणे अशक्य, कोल्हापूरहून संध्याकाळच्या एस.टी.ने निघून पुण्यास यायचे. रात्रीची पॅसेंजर पकडून कुर्ल्याला उतरायचे. सकाळी ६ पर्यंत अंधेरीला मोठ्या भावाच्या घरी जायचे, आंघोळ वगैरे उरकून परीक्षाकेंद्रावर जायचे आणि परीक्षा झाल्याबरोबर बोरीबंदरला धावत जाऊन 'जनता' पकडायची आणि कोल्हापूरला पहाटे पोहचून पहिल्या व्याख्यानाला हजर रहायचे असे पाचही पेपरांसाठी करावे लागले. पेपर अगदी भिकार गेले. उत्तीर्ण होणे अशक्य असे मी मनातल्या मनात समजून चाललो होतो.स्नेहापोटी एक वर्ष गेले. वार्षिक परीक्षा संपल्या की पुण्याला यायचे. सहा महिने पुन्हा झटून अभ्यासाला लागायचे आणि पुढच्या परीक्षेला पुन्हा बसायचे असे मी निश्चित केले. पण नापास होणे ही गोष्ट फार कठीण आहे.

 अशा थोड्या व्यस्त अवस्थेतच मी कोल्हापूरच्या पहिल्या काळात तरी होतो. मुंबईच्या सिडनेहॅम महाविद्यालयात आम्ही मराठी विद्यार्थी म्हणजे निव्वळ कचरा समजले जायचो. कान्ति पोद्दार, ढोलकिया ही आज उद्योगपती झालेली मंडळी त्यावेळी उद्योगपती-पुत्र होते. सन १९५१ मध्ये महाविद्यालयाच्या वार्षिक दिनी चिंतामणराव देशमुख आले होते. त्यांनी म्हटले, "देशात गोळा होणाऱ्या आयकरापैकी २५ % आयकर सिडनेहॅम विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जमा होतो." आठवड्यातील सहा दिवस नव्या गाड्या आणणारे, कँटीनमध्ये पोरींबरोबर आडवे-तिडवे पैसे उधळताना पाहून, अगदी बाळबोध मनालासुद्धा हेवा वाटणारे मला मिळणारे महिन्याचे पाच रूपये ४ दिवससुद्धा टिकत नसत. आताचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवती त्यावेळी आमचा आदर्श होता. एस.एस.सी.ला बोर्डात पहिला आलेला. सकाळी मोटारगाडी त्याला कॉलेजमध्ये सोडायला यायची. हातात पुस्तकांचा गठ्ठा घेऊन तो मान थोडी कलती ठेवून वाचनालयात यायचा, व्याख्यानांचा काळ सोडल्यास मुक्काम संध्याकाळपर्यंत तेथेच. अभ्यासाची पुस्तके वाचायचा कंटाळा आला म्हणजे संस्कृतचे पुस्तक काढून

अंगारमळा । ५८