पान:अंगारमळा (Angarmala).pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विद्या नामे अविद्येचा शिक्षक


 सन १९५७ सालची गोष्ट. मी नुकतीच पदव्युत्तर परीक्षा पहिल्या क्रमांकाने पास झालो होतो. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसायचे ठरले होते आणि त्या दिवसात परीक्षेला बसल्यानंतर उत्तीर्ण होणार नाही, हा विचारही मनाला शिवत नसे. निकाल लागेपर्यत, वर्षभर तरी जाई, त्या काळात काही तरी करावे असे वाटत होते. थोडी फार, स्वत:पुरती का होईना कमाई करण्याची आवश्यकता होती.

 त्या काळी मुंबई विद्यापीठात व्यापार विभागाच्या पदव्या अर्थशास्त्राच्या व्याख्यात्याच्या जागेकरिता अपुऱ्या समजल्या जात. मी बँकिंगचे सुवर्णपदक मिळवलेले. अर्थशास्त्रीय संख्याशास्त्र आणि गुणवत्ता नियोजन तसेच आंतरराष्ट्रीय नाणेव्यस्था असे असाधारण विषय एकत्र केलेले होते. नदीखोरे योजनांवरील माझ्या प्रबंधास मुंबई विद्यापीठाचे पारितोषिक नुकतेच मिळाले होते, तेव्हा अर्थशास्त्राच्या व्याख्यात्याच्या जागेकरिता मी मुद्दाम अर्ज केला होता. त्याबरोबर संख्याशास्त्र आणि व्यापार या विभागातील जागांसाठीही केला होता.

 महाविद्यालय सुरू व्हायच्या आधी आठच दिवस भणग्यांचा निरोप आला. त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात व्यापार महाविद्यालये तीन. त्यातली दोन मुबईत, एक पुण्यात. आम्ही सिडनेहॅमचे विद्यार्थी बाकीच्या दोन्ही महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना तुच्छ मानायचो. भणगे कोल्हापुरला व्यापार महाविद्यालय निघत होते तेथे प्राचार्य झाले होते. तसे कोल्हापूरचे राजाराम कॉलेज जुने आणि गाजलेले. तेथील विधी महाविद्यालय फार जुने. आणखी एक कॉलेज होते, तरीही कोल्हापूरला व्यापार महाविद्यालय ही कल्पनासुद्धा मला हास्यास्पद वाटत होती. भणग्यांना तिथे यायला व्याख्याते मिळत नव्हते. मी आलो असतो तर नवीन कॉलेजची ख्याती बरी झाली असती.

 माझा जीव खरे म्हणजे अर्थशास्त्राच्या व्याख्यात्याच्या जागेवर केवळ जिद्दीपोटी अडकला होता. भणगे म्हणाले, "तू कायम शिक्षणक्षेत्राततर राहणार नाहीस. मग तुला एवढी जिद्द करण्याचे काहीच कारण नाही." त्यांनी मला तीन वर्षांची पगारवाढ आधी देऊ केली. का कोणास ठाऊक मी त्यांचे म्हणणे मानले. भणग्यांच्या मैत्रीखातर? जादा पगारासाठी? कुणास ठाऊक.

 या निर्णयाचा मला पुढे पश्चाताप झाला. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तीन दिवसांनी

अंगारमळा । ५७