Jump to content

पान:अंगारमळा (Angarmala).pdf/179

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सर छोटूरामाप्रमाणेच चौधरी चरणसिंग उत्तरेत-त्यातल्या त्यात जाट प्रदेशांतच अडकून राहिले. हे दोघेही दक्षिणेत कधीच का आले नाहीत?

 चार वर्षांपूर्वी मी चौधरीजींना म्हटले होते, "चौधरीजी, हा निवडणुकांचा नाद सोडा. निवडणुकांचे राजकारण म्हणजे चेटकिणीबरोबर पट खेळणे आहे. पट तिचा, मोहरा तिच्या, सोंगट्या तिच्या, फासे तिचे, एवढेच नाही तर दिवाही तिचा आणि काळे मांजरही तिचे. राजकारणात जे जे काही करायचे ते सर्व तुम्ही करून पाहिले. निवडणुकीचा एक अखेरचा जुगार तुम्ही आता झोकून देऊन खेळू पाहता. यातून काही निघायचे नाही. त्या पेक्षा बाहेर पडा, आम्ही तुम्हाला गावोगाव घेऊन जातो. तुम्ही पंतप्रधान पुन्हा व्हाल किंवा नाही हे मी सांगू शकणार नाही. पण शेतकऱ्यांचा 'प्रेषित' म्हणून तूमचे नांव कायमचे इतिहासांत राहिल एवढी खात्री देतो."

 पण चौधरींना हे पटण्यासारखे काहीच नव्हते. ते जुगार खेळले, हरले. पंतप्रधानपद तर सोडा पण आख्खे मिळून दोन खासदार सुद्धा लोकदलाचे काही निवडून आले नाही. शेतकऱ्यांचे दैवत हे स्थानही डळमळीत झाले. अगदी शेवटच्या दिवसांत चौधरींचा बालेकिल्ला असणाऱ्या बागपतपासून तीस कि.मी. अंतरावर लाखालाखांनी शेतकरी जमले आणि त्यांनी आंदोलन केले. पण चौधरींचे नाव कुठे निघाले नाही. आणि चौधरींच्या मुलाला प्रयत्न करूनही आंदोलनात प्रवेश मिळाला नाही.

 चौधरींची राजकीय कारकीर्द अलीकडच्या काळातील मोठी शोकांतिकाच मानायला

हवी.


(साप्ताहिक ग्यानबा, १४ जून १९८७)

■ ■ 

अंगारमळा । १७९