पान:अंगारमळा (Angarmala).pdf/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करणाऱ्या आलतू फालतू जनावरांचे सुंदर वर्णन केले आहे. पण एक काळ असा होता की चौधरींच्या एका इशाऱ्यावर लक्षावधी शेतकरी जमत होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात शेतकरी म्हणून जाणीव निर्माण करणारा हा पहिला नेता. ग्रामीण भागाच्या दुःखाची आणि यातनांची आर्थिक परिभाषेत सविस्तर मांडणी करण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते. चोवीस मे रोजी म्हणजे चौधरींच्या मृत्यूच्या आधी पाच दिवस उत्तर प्रदेशातील शुक्रताल येथे मी कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण शिबीर घेत होतो. प्रश्नोत्तराच्या काळात कार्यकर्त्यांना मी एक प्रश्न विचारला. "चौधरी चरणसिंगांचे मत आहे की, स्वातंत्र्यानंतर पंतप्रधानपदी जवाहरलाल नेहरू आले आणि शेतकऱ्यांची आणि ग्रामीण भागाची ही धूळधाण झाली. चौधरींच्या या म्हणण्याबद्दल तुमचे काय मत आहे?" दोघा तिघा कार्यकर्त्यांनी चौधरींवर थोडी टिका करायचा प्रयत्न केला. त्याबरोबर बाकीचे कार्यकर्ते इतके काही चवताळून उठले की मलासुद्धा चौधरींबद्दलच्या लोकांच्या मनांतील प्रचंड आदराची साक्षात जाणीव झाली.

 चौधरींच्या आयुष्याच्या शोकांतिकेचे कारण काय ? एका आडवाटेच्या खेड्यातील शेतकऱ्याच्या झोपडीत जन्मलेला हा पोरगा, औटघटकेचा का होईना, पंतप्रधान झाला. इतिहास घडवण्याची चालून आलेली संधी त्याच्या हातून निसटून गेली. एवढेच नव्हे तर आयुष्याच्या अखेरीस ते स्वत: आणि त्यांची मते हास्यास्पद मानली जाऊ लागली.
 हे का घडले?

 मला वाटते याची दोनतीन महत्त्वाची कारणे आहेत. चौधरींचा पिंडच राजकारणी नेत्याचा होता. हे राजकारण चालवण्यातील सोय म्हणून त्यांनी शेतकऱ्यंचा कैवार घेतला. शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र अभ्यासून, विचक्षणा करून ते शेतकऱ्याच्या मागे उभे राहिले नाहीत. ज्या ज्या वेळी जसजसे सोयीस्कर वाटले त्या त्या वेळी तसतशी त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांच्या विचारात प्रचंड गोंधळ होता.

 दुसरे एक महत्त्वाचे कारण, चौधरीजींचा पिंडच आंदोलकाचा नव्हता. या बाबतीत त्यांची स्थिती जुन्या काळातील थोर शेतकरी नेते सर छोटूराम यांच्या सारखीच. शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्याची आणि सोडवण्याची त्यांना माहीती असलेली एकमेव पदत म्हणजे भाषणे करणे, निवेदने तयार करणे, अहवाल लिहिणे, इत्यादी. त्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांवरील अन्याय राजकीय सूडबुद्धीने होत आहेत याची जाणीव नव्हती. योग्य अधिकारी पुरुषांच्या ध्यानात त्यांची दुःखे आणून दिली म्हणजे तो प्रश्न आपोआप सुटेल अशी त्यांची कल्पना.

अंगारमळा । १७८