पान:अंगारमळा (Angarmala).pdf/177

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शांत व मृदू स्वभावाचे चौधरी


 चौधरी चरणसिंग दि. २९ मे रोजी सकाळी शेवटी कालवश झाले. तसे गेले कित्येक महिने त्यांची गणना नसल्यातच होती. शेवटी शेवटी दोन वेळा मी भेटीला गेलो तेव्हा फक्त बेशुद्धीत असलेल्या देहाचेच दर्शन घेऊन आलो होतो.

 मृत्यूसुद्धा चौधरींच्या बाबतीत निर्दय ठरला. इंदिराजींची लोकप्रियता झपाट्याने ढासळत होती. पण त्यांच्या मृत्यूची घटनाच इतकी विलक्षण की त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सगळे हिणकस ते जळून खाक झाले. आणि लक्षावधींच्या मनात शिल्लक राहिली ती फक्त एक उज्ज्वल देदीप्यमान मूर्ती. चरणसिंगाचा मृत्यू इतका गद्यमय झाला की हा माणूस एकेकाळी काय देश हलवून गेला याची कुणाला आठवणसुद्धा येऊ नये.

 चौधरी चालते बोलते असताना त्यांचे आणि संघटनेचे घनिष्ठ संबंध होते. दिल्लीतली काही कामे चौधरींच्या सहकार्याने आम्ही बिनधास्त सोडून देत असू. आमच्यातल्या मतभेदांची दरी खूप मोठी. पण चौधरींना व्यक्तिश: माझ्याविषयी अतोनात प्रेम. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना अर्धवट कौतुकाने, अर्धवट उद्वेगाने म्हणायचे, "जरा देखो तो यह महाराष्ट्रका लडका कैसे काम बना रहा है." मी राजकारणात यावे, लोकदलात नाही तरी कोणत्यातरी पक्षात यावे अशी त्यांची फार इच्छा होती. निवडणुका लढवल्याखेरीज आणि सत्ता हाती घेतल्याखेरीज शेतकऱ्यांचा प्रश्न धसाला लागू शकत नाही अशी त्यांची बालंबाल खात्री होती.

 चौधरींचे व्यक्तिमत्त्व मोठे शांत आणि मृदू होते. हस्तांदोलन करताना त्यांचा हातसुद्धा इतका मऊ लागे की आपण एका म्हाताऱ्यासमोर आहोत याचा विसर पडावा. राजकारणातील अनेक वादळे, मंत्रिमंडळांच्या उलथापालथी, सत्तावीस हजार तलाठ्यांना एका हुकुमात नोकरीवरून काढून टाकण्याची जिद्द हे सगळे या माणसाने केले असेल हे खरे वाटणेच कठीण.

 चौधरीजींना श्रद्धांजली वाहताना सगळ्यांचा एकच सूर, चौधरी शेतकऱ्यांचे कैवारी, ग्रामीण कष्टकऱ्यांचे दैवत आणि सहकारीकरणाचे कट्टर विरोधक. अनेकांनी मृत्यूप्रसंगाच्या गांभीर्याची जाणीवही न ठेवता त्यातल्या त्यात 'केवळ' शेतकऱ्यांचे, 'केवळ' जाटांचे, 'केवळ' उत्तर हिंदुस्थानातील शेतकऱ्यांचे अशी चिखलफेक करण्याचा प्रयत्न केलाच.

 आचार्य अत्र्यांच्या एका व्यंग कवितेत सिंह मरून पडल्यानंतर त्याची कुचेष्टा

अंगारमळा । १७७