पान:अंगारमळा (Angarmala).pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 थोडेसे विषयांतर होते आहे, पण एका नामवंत समाजसेवकाचा एक अनुभव याठिकाणी मला सांगावासा वाटतो. यांच्या 'आदर्श गावाला' मी गेलो. "गावात कोणीही चित्रहार बघत नाही." गावकरी मला सांगू लागले. "का बरे?" मी विचारले. "नटनट्यांचे ते घाणेरडे चाळे काय बघायचे!" "पण एखाद्याला चित्रहार बघायची इच्छा असेल तर?" "तसा काही प्रश्नच उद्भवत नाही. चित्रहार पाहायचा नाही असा आदेशच आहे आम्हाला." हे सांगताना त्या गावकऱ्यांना मोठा अभिमान वाटत होता. हा आदेश कोणाचा? तर या तथाकथित समाजसेवकाचा. असली ही त्यांची हुकूमशाही! आणि हे 'आदर्श गावे' तयार करण्याचे कॉन्ट्रैक्ट घेणार!

 आदर्श गाव ही कल्पनाच absurd आहे. असा कधी कुठे समाज बदलतो का? आज एक गाव आदर्श बनले, उद्या दहा गावे अदर्श बनतील, परवा १०० गावे आदर्श बनतील, असा गुणाकार या लोकांनी गृहीतच धरलेला असतो. प्रत्यक्षात असले गुणाकार कधीच होत नाहीत; पण अशी खोटी स्वप्ने विकण्यात आमचे महापुरुष वस्ताद!

 काही स्वयंस्फूर्त चळवळी समाजामध्ये नैतिकता वाढावी म्हणून काम करीत असतात. यात अनेक गांधीवादी संस्था आहेत. त्यांच्या मते, आपल्या समस्यांचे कारण नैतिक मूल्यांचा ऱ्हास किंवा भ्रष्टाचार हे आहे.

 या नैतिक प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करायला हवा, कारण आपल्या मुख्य विषयाशी हा थेट निगडित आहे.

 नैतिकता ही काय चीज आहे? नैतिकतेचा मार्ग कोणता? महात्माजींना एकदा एकाने विचारले, "शांतीचा मार्ग कोणता?" बापूजींनी उत्तर दिले, "शांतीचा मार्ग नाही, शांती हाच मार्ग आहे." तसेच नैतिकता ही काही विवक्षित अवस्था नाही. नैतिकतेचा काही मार्ग नाही, नैतिकता हाच मार्ग आहे.

 नीतिमत्तेच्या कल्पना वेगवेगळ्या काळांत, वेगवेगळ्या समाजांत बदलताना दिसतात. स्त्रीसत्तेपासून स्त्रीदास्यापर्यंत, ब्रह्मचर्यापासून ते प्रौढसंमतीच्या स्वैराचारापर्यंत सर्व प्रकारचे नीतिनियम इतिहासात सापडतात. अर्थव्यवस्थेच्या विकासाबरोबर नीतिव्यवस्थाही बदलताना दिसते. शेतीप्रधान समाजाची धारणा औद्योगिक समाजासारखी नसते. खासगी मालमत्तेवर आधारलेले समाज, आपली वेगळी नैतिकता तयार करतात, स्थिर समाजाचे नियम लढाया, उत्पात इत्यादींनी वारंवार हादरे खाणाऱ्या समाजापेक्षा साहजिकच निराळे असतात. अर्थव्यवस्था बदलली की नीतिमत्ताही बदलते.

 तरीही बहुतांश समाजांनी मानलेल्या नियमांत एक सूत्र सापडते. स्वार्थाचा त्याग

अंगारमळा । १५७