पान:अंगारमळा (Angarmala).pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चळवळीमुळे कधीच झाले नसते.

 तंत्रज्ञानाने एकूणच कुठल्याही चळवळीपेक्षा मानवी जीवनावर जास्त प्रभाव टाकलेला आहे; जास्त आनंद निर्माण केलेला आहे. आज महाराष्ट्रातील द्राक्षे लंडन-पॅरिसमधील डायनिंग टेबलवर पोचली आहेत व त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या घराततरी समृद्धी यायची शक्यता निर्माण झाली आहे, याचे एक कारण मालाची वाहतूक विमानाने करण्याची तंत्रज्ञानाचे केलेली सोय आणि याचे दुसरे कारण म्हणजे ही द्राक्षे खरेदी करणारे, 'मार्क्स ॲण्ड स्पेन्सर' यांसारखी सुपर मार्केटस्. "गरिबांसाठी मार्क्स आणि एंगल्स यांच्यापेक्षा कितीतरी जास्त कामगिरी मार्क्स ॲण्ड स्पेन्सर या दुकलीने केली," अशी टिप्पणी प्रख्यात व्यंगचित्रकार जॉर्ज निकत्से यांनी केली आहे.

 साहित्यक्षेत्रातही थोडेफार स्वयंस्फूर्त कार्य सुरू असते. या क्षेत्राकडे बघितले तरी एकूण परिस्थिती केविलवाणीच असल्याचे दिसते. आमच्या शेतकरी संघटनेच्या कामामध्ये अक्षरश: लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतात. शेतकरी आंदोलनात जितकी माणसे तुरुंगात गेली तितकी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य आंदोलनातही गेली नव्हती. असे असूनही मराठी साहित्यामध्ये शेतकरी आंदेलनाला काही स्थान मिळालेले नाही.

 डाव्यांच्या चळवळीमध्ये त्यांच्यामागे शेपाचशे माणसेसुद्धा नसली तरी, त्यांची कवने गाणाऱ्यांचा सुंदर ताफा त्यांच्यापुढे असतो. ज्यांच्या आंदोलनात आंदोलकांची संख्या कमी, पोलिसांची जास्त त्या आंदोलनात प्रतिभेचा हा झरा खळाळून वाहताना दिसतो आणि प्रचंड आंदोलने करणाऱ्या शेतकरी संघटनेत, काही अपवाद वगळल्यास, साहित्य, कला, संगीत, शाहिरी, पोवाडे अशा मार्गांनी प्रतिभा दाखविणारे निपजले नाहीत. असे का झाले? एकदा एका कार्यकर्त्याने नानासाहेब गोऱ्यांना प्रश्न विचारला, "शेतकरी संघटना ही अशी रूक्ष, काव्य नसलेली का झाली?" ते म्हणाले, "शरद जोशी हा माणूसच गद्य आहे. त्यांनी जो अर्थशास्त्रीय विषय मांडला तोच रूक्ष आणि गद्य आहे. आंदोलनाचे साहित्य हे कधी अशा गद्य भाषेत तयार होत नाही. आंदोलनात काहीतरी डोक्यात मस्ती चढणारी, झिंग आणणारी गोष्ट असावी लागते. रामाच्या देवळाचे नाव घ्यावे लागते नसलेल्या गोष्टी तयार कराव्या लागतात, सामान्य माणसांचेसुद्धा पुतळे जागोजागी उभे करून त्यांना देवता बनवावे लागते. समाजाच्या हितसंबंधांबरोबरच काही एक पागलपणा केल्याखेरीज आजकाल खरे आंदोलन बनतच नाही आणि शरद जोशींना पागलपणा दाखवता येता नाही."

अंगारमळा । १५६