पान:अंगारमळा (Angarmala).pdf/146

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकरी दाखवायचा म्हणजे एकदाच नांगर घालताना दाखवायचा. आणि लगेच सगळी पिकं लहलहरती. मग पुढे, दहा मुली इकडं तिकडं नाचत जाणार! शेतकऱ्याच्या आयुष्याचं चित्रण हे असं होऊन गेलंय. तुम्ही शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये बारकाईनं का पाहत नाही?  मी शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला नाही; व्यवसायानं मुळात मी शेतकरी नाही आणि तरीदेखील गावामध्ये मी गेलो, की शेतकरी मोठ्या संख्येनं जमतात. कारण मी काय बोलतो ते शेतकऱ्यांना समजतं. मी साहित्यात अडाणी असेन; पण ग्रामीण भागातल्या जनतेच्या, विशेषत: मायबहिणींच्या वेदना मला समजतात. कारण मी माझ्या अनुभवाचं विश्व व्यापक करण्याचा सतत प्रयत्न केला, करतो. मी तुम्हाला प्रेमानं आणि कळकळीनं सांगतो, मराठीतलं जे ग्रामीण म्हणून साहित्य आहे, ते खेड्यांशी संबंधित आहे असं मला खरंच वाटत नाही. तुम्ही संमेलनं घालाल, डेरे घालाल, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य आणि आता आणखी काही साहित्य निघालीत, त्यांची संमेलनं घालाल, त्यांचे मंच उभे कराल, निधी जमवाल; पण तुम्हाला असं वाटत असेल, की यातून मराठी भाषा जगणार आहे तर तो तुमचा भ्रम आहे. याने मराठी भाषा जगणार नाही. मराठी भाषा मोठी करायची असेल तर मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. लहान माणसाची भाषा-मातृभाषा मोठी असूच शकत नाही एवढंच मला सांगायचं आहे.

 समारोपाच्या या भाषणात मी थोडा कुचेष्टेचा स्वर काढला असला तरी ते वेदनेनं बोललो आहे. मला दु:ख पाहवत नाही, हे मी आधीच सांगितले. मराठी भाषेवर माझं अपरंपार प्रेम आहे. काही मोजके लोक सोडले तर, एकाच अर्थाच्या किंवा एकाच वृत्ताच्या कविता म्हणण्याची स्पर्धा लावली तर मी इथल्या सगळ्यांना हरवीन. अशा सहअनुभूतीच्या माणसाच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत, वेदना आहेत त्याच मी इथे मांडल्या आहेत.


 (शेतकरी संघटक, २१ ऑक्टोबर १९९६: चौथे परभणी जिल्हा मराठी साहित्य संमेलन जवळा बाजार १९९५, येथील भाषण)

■ ■ 

अंगारमळा । १४६