पान:अंगारमळा (Angarmala).pdf/137

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागलात?" तेव्हा ते म्हणाले, "आम्ही जे बोलतो ते इंग्लिश नाही, ती अमेरिकी भाषा आहे! आम्ही ही परकी भाषा शिकलो याचे कारण काय? अमेरिकेत आर्थिक वैभव आहे, सुखसंपन्नता आहे, साधनांची विपुलता आहे. त्यामुळे अमेरिकी भाषा खऱ्या अर्थान संपन्न झाली आहे आणि ज्याला जगाच्या सरहद्दीवर. इतिहासाच्या सरहद्दीवर. संशोधनाच्या सरहद्दीवर जायचं आहे त्यांना अमेरिकी शिकण्याखेरीज गत्यंतर नाही."

 साहित्य समृद्ध करायचं तर काय करायला हवं? तुमच्या संमेलनाच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात म्हटलं, "आजची जी काही शिक्षणपद्धती आहे. त्यांतील दोन भाषांचा, तीन भाषांचा ‘फॉर्म्युला' आणि ज्या पद्धतीने भाषा शिकविली जाते हे सर्व पाहता मराठी भाषा लवकर मरेल असं दिसतं." त्याचं कारण एका वाक्यात सांगायचं झालं तर, गरीब लोकांची भाषा श्रीमंत असू शकत नाही. हा विचार तुम्हा साहित्यिकांना पटणार नाही, तरीही मी सांगतो. आज तुम्ही ज्या काळातल्या साहित्याची वाखाणणी करीत आहात, त्या काळातील मंडळींच्या जीवनाकडे पाहा. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वर घ्या. त्यांचा जन्म, मातापित्यांची आत्महत्या, समाजाने घातलेला बहिष्कार या सर्वांमुळे ज्ञानेश्वर सर्व आयुष्य जळत जळत जगले, समाजाने दिलेले सर्व हलाहल त्यांनी पचवले म्हणून त्यांच्या तोंडून अमृतमयी ओवी निघाली. सकाळी कॉलेजमध्ये जाऊन दोनतीन 'लेक्चर'च्या पाट्या टाकून, घरी आलेल्या माणसाच्या हातून, बालपणीच्या संस्कारातून लाभलेली जी काही साहित्याची आणि प्रतिभेची शिदोरी असेल ती संपेपर्यंत साहित्यनिर्मिती होईल; पण त्यानंतर पारितोषिकाच्या लिखाणापलीकडे काही होणार नाही.

 मला संपन्नता म्हणजे काय म्हणायचं आहे ते थोडं स्पष्ट करतो. मला गरिबीचं कौतुक केलेलं आवडत नाही. प्रदेश गरीब असला तरी त्याचं साहित्य मोठं असतं ही गोष्ट खोटी आहे. संख्याशास्त्रीयदृष्ट्या, गरिबीतही एखादा कुणी प्रकांड प्रज्ञेचा मनुष्य निघू शकतो, नाही असं नाही. म्हणजे, तो गरीब असूनही In spite of poverty तसा असतो. पण संख्येनं पाहिले, साहित्याची एकूण निर्मिती पाहिली तर तो अपवाद ठरतो. साहित्य किंवा प्रतिभा कशातून जन्मते? वरून कुठूनतरी एकदम प्रतिभा शिरते, अंगात सरस्वतीचा संचार होतो आणि मग 'जे न देखे रवि, ते देखे कवी' असं म्हणून साहित्य तयार होतं अशी जर कुणाची कल्पना असेल तर मग जन्मांधसुद्धा निसर्गकविता लिहू शकेल! खरं तर तुमच्या शब्दांचा, प्रतिभेचा फुलोरा हा तुमच्या अनुभवाच्या संपन्न भूमीतून वाढत असतो. मग, ज्याचं आयुष्य दरिद्री, पैशानं नव्हे, तर अनुभवानं; ज्याचं आयुष्य अनुभवाच्या विविधतेनं नटलंलं नाही अशा माणसाचं साहित्य हे फक्त मुंबईच्या लोकल

अंगारमळा । १३७