पान:अंगारमळा (Angarmala).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गाडीतील प्रवासातच वाचायच्या लायकीचं होतं आणि आज वस्तुस्थिती अशी आहकी मराठीतील 'मान्यवर' लेखकांचं साहित्य हे लोकल गाडीत जर का खारे दाणे विकत घ्यायला पैसे नसतील तर शेजाऱ्याकडून घेऊन वाचण्यालायक साहित्य झालं आहे.

 माझे एक गुरु डॉ. सुमत मुरंजन. त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेव्यवस्थेमध्ये काम केलं आहे. कोरियाचं युद्ध झाल्यानंतर अमेरिकेनं त्यांना 'अमेरिकेतील चलनवाढ कशी थांबवावी' यावर चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं. अशा या आंतरराष्ट्रीय मान्यतेच्या माणसाने 'आंतरराष्ट्रीय नाणेव्यवस्था' हे पुस्तक मराठीत लिहिलं. लोकांनी त्यांच्यावर फार टीका केली. लोकांनी म्हटलं, 'हे पुस्तक इंग्रजीत लिहायला हवं होतं. मराठीत लिहून काय उपयोग?' ही १९५५ ची गोष्ट आहे. टीकाकारांना डॉ. सुमंत मुरंजनांनी उत्तर दिलं, "माझ्या अनुभवांच्या आधारे ज्यांना आंतरराष्ट्रीय नाणेव्यवस्थेचा अभ्यास करायचा असेल त्याने मराठी भाषा शिकावी अशी माझी इच्छा आहे." इतकी हिंमत दाखविण्यासाठी. तुमचा अनुभव समृद्ध आहे का? कॉलेजच्या या मुलीनं कॉलेजच्या त्या मुलाकडं पाहिल्यानंतर त्या दोघांचे डोळे एकमेकांच्यात मिसळल्यानंतर जी काही किलबिल किलबिल होते त्याची काव्यं किती वेळ लिहिणार? या किलबिलीशिवाय तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने लिहायला नको का? का शंभर वर्षांपूर्वी तुमच्या आजीआजोबांच्या मनांत ज्या किलबिली होत होत्या, त्याच किलबिली अजून चालू आहेत? काही नवीन आणाल तर साहित्य होईल. तीच ती शिळी कढी किती वेळ तुम्ही पुन्हा पुन्हा उकळणार आहात?

 सगळ्या देशातली गरिबी ही कच्च्या मालाचं जाणीवपूर्वक शोषण केल्यामुळे तयार झाली आहे हा माझा अनुभवावर आधारित सिद्धांत आहे आणि तो सत्य आहे यात काही वाद नाही. हा सिद्धांत, त्याचा अभ्यास, त्याची आकडेवारी महाराष्ट्रातल्या शेतकरी आंदोलनाने तयार केली आहे आणि हे सर्व मी मराठीत लिहून ठेवले आहे. माझ्याकडे, अगदी हार्वर्डपासून अनेक विद्यापीठांतले, शेतकरी संघटनेच्या अर्थशास्त्रावरील पीएच.डी.चे अनेक प्रबंध आहेत. ते लिहिणाऱ्यांतले निम्मे तरी लोक परदेशांतले आहेत. ते मला: म्हणतात, “तुम्ही हे सर्व लिखाण कधीतरी इंग्रजीतून करायला पाहिजे.” त्यांना माझंही उत्तर माझ्या गुरूंनी दिलेलं, “शेती अर्थव्यवस्थेचा अभ्यास ज्याला माझ्या मांडणीच्या अंगाने करायचा आहे, त्यांनी मराठी शिकलं पाहिजे."

 साहित्यवेलीला लागलेली कीड जर मारायची असेल तर आधी त्या वेलीवर वेगळी वेगळी पानं येतील असं काही तरी करा. त्यासाठी, काही वेगळे अनुभव येतील असं काही तरी करा. हे काही मी साहित्यिकांवर नुसती टीका करण्यासाठी बोलत नाही;

अंगारमळा । १३८