पान:अंगारमळा (Angarmala).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्याबद्दल? मी एवढंच म्हणेन की, "हे प्रतिभाशाली पारितोषिक विजेत्यांनो! हे पारितोषिक मिळूनसुद्धा तुमची प्रतिभा जिवंत राहो अशी मी आशा व्यक्त करतो." खरं म्हणजे एकदा पारितोषिक मिळालं, की नंतर काही त्या साहित्यिकाचं खरं नसतं ! किंबहुना, राजाश्रय लाभल्यानंतर साहित्यगुण किंवा प्रतिभा कितपत टिकते, हा मोठा वादाचा विषय आहे.

 माझी अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून ओळख असली तरी मी चुकून अर्थशास्त्र घेतलेला मनुष्य आहे. मी मुळामध्ये संस्कृत भाषेचा अभ्यासक आहे. कालिदास हा माझा आवडीचा कवी आहे. आज जर वेळ असता आणि संधी मिळाली असती तर कालिदासाच्या कोणत्याही काव्याचं निरूपण येथे करू शकलो असतो; पण अशा या थोर कवी कालिदासामध्ये पुढे एक मोठा दोष निर्माण झाला. त्यांनी राजाश्रय स्वीकारला आणि त्यानंतर त्यांच्याकडून ठरावीक पठडीतील काव्यच निर्माण व्हायला लागलं. तसं आजच्या या पारितोषिक विजेत्यांचं न होवो! सुदैवाने, भाग्याने यांना लाभलेल्या सरस्वतीचा वरदहस्त शासनाच्या पारितोषिकाला तोंड देऊन अबाधित राहो एवढी शुभेच्छा दोघांसाठी व्यक्त करतो.

 मी तर साहित्यिक नाही, म्हणजे साहित्यिक म्हणून मला मान्यता नाही. तसं कालपरवापर्यंत मला अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही मान्यता नव्हती. मी कुठं अर्थशास्त्रावर बोलायला गेलो, की त्या त्या संस्थांचे प्रमुख आपल्या विद्यार्थ्यांना सांगायचे, "लक्षात ठेवा! आपण अभ्यासक आहोत आणि शरद जोशी आंदोलक आहेत. तेव्हा ते काय म्हणतात त्यानं तुमची डोकी बिथरू देऊ नका!" गमतीची गोष्ट अशी, की आपल्या विद्यार्थ्यांना या तऱ्हेने बजावणारी काही माणसं, मी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये काम करीत असताना त्यांना अर्थशास्त्रासंबंधी एखादी नोकरी मिळावी यासाठी माझा वशिला लावायचा प्रयत्न करायची; पण ते काम सोडून इथं आल्याबरोबर (त्यांच्या लेखी) मी एका दिवसात आंदोलक बनलो! डंकेलसाहेबाने मांडलेल्या प्रस्तावामुळे इतर काही परिणाम झाले त्याचा विचार सोडून देऊ; पण त्या प्रस्तावाच्या विरुद्ध सारा हिंदुस्थान आणि बाजूने मी एकटा अशी मोठी कुस्ती झाली. त्याचा निकाल माझ्या बाजूने लागला हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यानंतर आता ही मंडळी हळूहळू शरद जोशी 'अर्थशास्त्री' नाही; पण निदान कृषिअर्थशास्त्री आहेत असं लाजतकाजत का होईना, म्हणायला लागली आहेत.

 साहित्याच्या बाबतीतही तेच आहे. मी आतापर्यंत अठरावीस पुस्तके लिहिली आहेत. मराठीबरोबर इंग्रजीतही लिहिली आहेत. माझ्या काही पुस्तकांची इतर भारतीय भाषांत

अंगारमळा । १३२