पान:अंगारमळा (Angarmala).pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मी 'साहित्यिक' नाही!


 मी औरंगाबाद येथे उसावरील झोनबंदी विरोधात उपोषणाला बसलो असतांना साहित्य संमेलनाचे संयोजक मला निमंत्रण देण्यास आले होते. तेव्हा पुढील घटना अनिश्चित असल्याने मी ते निमंत्रण स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भत नव्हता; पण मंडळी मोठी चिकाटीची. उपोषण संपल्यानंतर मी जेव्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघालो तेव्हा वसमत मुक्कामी त्यांनी मला पुन्हा गाठलं. खरं तर हे निमंत्रण टाळायचा मी प्रयत्न करीत होतो. म्हणून मी विचारलं, "तुमचं साहित्य संमेलन आहे म्हणजे थोर थोर नेतेगण, पुढारी, मुख्यमंत्री नाही तर निदान एखादे मंत्रिमहोदय येणार असतील? आसपासचा एखादा साखर कारखाना किंवा एखादी सहकारी संस्था शेतकऱ्यांकडून निधी वसूल करीत असणार! तेव्हा अशा संमेलनाला येणं मला थोडं अवघड जातं; कारण एरवी मी त्यांच्याविरुद्ध लढत असतो;" पण माझा अपेक्षाभंग झाला. त्यांनी मला आश्वासन दिलं, की इथे असे कोणी नेते पुढारी येणार नाहीत आणि कुणाकडूनही सक्तीने पैसे वसूल करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्रामध्ये आजकाल दुर्मिळ झालेली गोष्ट म्हणजे ज्याला पुढाऱ्याचा डाग लागलेला नाही असा साहित्याचा मंच; तो इथं उभा राहतो आहे, हे पाहून मी या संमेलनाला यायचं कबूल केलं.

 या संमेलनाच्या समारोप समारंभाच्या आधी श्री. शेषराव मोऱ्यांचे भाषण आणि इंद्रजित भालेरावांचं काव्यगायन आहे असं काल अकोल्याला वर्तमानपत्रात वाचलं आणि दोन तास आधी इथं येऊन बसलो आणि एरवी कधी शक्य नाही अशी संधी घेऊन या दोघांचेही कार्यक्रम ऐकण्याचा लाभ घेतला; कधी मिळत नाही इतका आनंद मिळवला. इंद्रजीत भालेराव तसे माझे मित्र झाले आहेत. बरेचदा ते आपल्या कविता ऐकवायला येतात आणि माझेच अर्थशास्त्र ऐकून परत जातात. म्हणून ही संधी घेण्याचा प्रयत्न केला; पण वेळेच्या आधीच्या माझ्या उपस्थितीमुळे संयोजकांची अडचणच झाली असे दिसते. कारण काव्यगायनाचा रंगलेला कार्यक्रम थांबवून समारोपाचा कार्यक्रम वेळेवर, दोन वाजता सुरू करावा का नाही असा त्यांच्यापुढे पेच पडला. निष्कर्ष एवढाच, की पुढारी राजकीय नसला तरी त्याने, सार्वजनिक जीवनातील माणसाने, रसिकांच्या मेळाव्यात आगाऊपणे जाण्याचा प्रयत्न करू नये.

 इथे दोघांना साहित्यसेवेबद्दल पारितोषिके देण्याचा कार्यकम झाला. काय म्हणावं

अंगारमळा । १३१