पान:अंगारमळा (Angarmala).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अंगठी सापडणे. कष्टाने घाम गाळून कोणीच लक्ष्मी मिळवत नाही, शेतकऱ्याला भाग्य उजळायचे दोनच मार्ग- पुढारी बनणं, नाहीतर शहरात येणे. हे असं का?

 लाखात एकाद्याच शेतकऱ्याच्या पोराला मिळणारी विचार करण्याची, अभ्यास करण्याची संधी तुला मिळाली आहे. ती किमान या एका प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्यासाठी वापर. 'माझ्या आईबापांनी असं कोणतं पाप केलं होतं, की त्यांना चिखलात झिजत राबावं लागतं? त्यांच्या श्रमाचं मोल त्यांना का मिळालं नाही? त्यांच्या घामाचं दाम कोण्या हरामाने हिरावून नेलं?'

 मोहनदास करमचंद गांधी इंग्लंडच्या नव्या ऐश्वर्याला भुलून काही काळ साहेब बनण्याचा प्रयत्नाला लागले; पण त्यांनी स्वत:ला सावरले आणि स्वातंत्र्याचे प्रणेते, राष्ट्रपिता झाले. ते स्वत: इंग्लंडमधल्या सुखात रममाण झाले नाहीत. तुझ्या मायबापांना लुटणाऱ्यांच्या वैभवात बोटे घालून त्यात धन्यता मानण्याचा मोह पडू देऊ नकोस.

 आजची तुझी स्थिती सीतेच्या शोधासाठी गेलेल्या हनुमानासारखी आहे. लंकेचे वैभव, प्रासाद, तलाव, बागबगीचे पाहून हनुमानही विस्मयचकित झाला; पण त्या भिकारड्या रामाची कसली भक्ती करता, या रावणाच्या अजिंक्य, महाबलाढ्य, सुखसमृद्ध ऐश्वर्याचा उपभोग घेऊ असा विचार त्याच्या मनाला शिवलाही नाही. अशोकवनातील विरही, दुःखी सीतेचा शोध त्याने चालू ठेवला म्हणून रामायण घडले.

 आज भूमिकन्या सीता पुन्हा वनवासात आहे. आम्ही भूमिपुत्र तिच्या विमोचनाच्या कामाला लागणार, का लंकेश्वर रावणाच्या वैभवाचे वाटेकरी व्हायला बघणार हा प्रश्न तुझ्याकडे ठेवण्यासाठी हा पत्राचा प्रपंच


 

तुझा,   

शरद जोशी 

(प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश भाग २-प्रथमावृत्ती डिसेंबर १९८५, या पुस्तकातून.)

अंगारमळा । ११०