पान:अंगारमळा (Angarmala).pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गोलाईचे आणि बांधकामाचे वावडे होते आणि अ,ब,ड,ई त्रिज्येच्या वर्तुळाची परिमिती म्हटले, की आपले तर कान बंद. तीच गोष्ट बीजगणिताची. वर्गातला स्कॉलर गुरुजींच्या भूमिती बीजगणिताच्या प्रश्नांना चटाचट उत्तर देऊ लागला की 'हा काय दैवी चमत्कार!' अशी मुद्रा आम्ही करायचो. विज्ञानाने, रसायनाने मातीशी इमान कधी साधलेच नाही. हिंदुस्थानला लुटण्याची यंत्रणा राबवण्याकरिता कारकून तयार करण्यासाठी शिक्षणाची व्यवस्था झाली. इंग्रज गेला तरी व्यवस्था तीच राहिली. आता काळ्या इंग्रजाच्या तैनातीला उभे राहण्याकरता कारकून पाहिजेत, अधिकारी पाहिजेत. ज्या खेड्यांना लुटायचे तेथील शेतकऱ्यांच्या पोरांना जमत असले तर त्यांनी शिकावं! पास व्हावं! सर्वांना समान संधीचं हे लोकशाही युग आहे.

 हे कठीण आहे. महा कर्मकठीण आहे. आज शहराच्या नवलाईच्या दर्शनाने सुखावलो आहोत. आजतरी आपल्या विद्येकरता गावाकडे मायबापे काय उस्तवारी करत आहेत, याचासुद्धा विसर पडतो. त्यांची इच्छा एक, पोरानं परीक्षा द्यावी, पास व्हावं, नोकरी धरावी. घरशेती कर्जातून सोडवावी आणि हे पाहून त्यांनी सुखानं डोळे मिटावेत; पण शेतकऱ्यांच्या पोरांना शहरांतली परीक्षा म्हणजे हत्तीला दोरीवरच्या उड्या मारायला सांगणं आहे. जमावे कसे? दरवर्षी बारावीतले, पदवीच्या शेवटच्या वर्षांतले शेकडो विद्यार्थी कपाळाला हात लावून बसतात. दोन-चार वर्ष चैनीत बरी गेली, परीक्षा हाती पडणं दुरापास्त, नोकरी त्याहून कठीण. आता कोणत्या तोंडानं मायबापापुढं जावं? शेकडोजण पळून जातात, मुंबईला जातात, जे मिळेल ते काम करतात. मायबाप तिकडे पोराचं झालं तरी काय असेल या नव्या चिंतेने तोंडात माती घालून घेतात. नाहीतर शिकलेली पोरं नोकरीबिकरी शोध शोध शोधतात आणि एक दिवस गावाकडं परतात, शेतात खपावसं वाटत नाही. म्हातारे म्हातारी घाम गाळतच राहतात.

 मित्रा, महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात लिहिलेल्या पत्रात इथल्या मुक्कामाच्या शेवटी तुझी जी अवस्था असेल त्याविषयी लिहून तुला नाउमेद करण्याची माझी इच्छा नाही. स्वप्नात मश्गुल राहिलास तर शोकांतिका अटळ आहे.

 हे असे का? गावात जन्मभर शेतीवर राबणाऱ्या मायबापांना एक सुखाचा घास नाही आणि इकडे एक काडीही इकडची तिकडे न फिरवणारी माणसं नोटा उधळू शकतात कशा? इथली नवरा बायको हसून खेळून राहतात, मुलांची कौतुकं करतात, घरं सजवतात. गावातल्या शेतीवर जगणाऱ्यांना हे का जमत नाही? अरबी भाषेतील सुरस कथांत भाग्य फळफळायचे दोनच मार्ग- गुप्त खजिन्याची गुहा सापडणे किंवा जादूचा दिवा किंवा

अंगारमळा । १०९