पान:अंगारमळा (Angarmala).pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यास पत्र


'अंगारमळा', आंबेठाण,

ता. खेड, जि. पुणे.

१४ ऑगस्ट १९८५

प्रिय मित्र,

 हे पत्र तुला लिहितो आहे; पण खरे तर महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात जन्मलेल्या आणि यंदा महाविद्यालयात येऊन पोचलेल्या हजारो विद्यार्थी-मित्रांना उद्देशून लिहितो आहे.

 तसेच नवे वर्ष सुरू झाल्याबरोबर लगेचच तुझ्या हाती पडावे अशा बेताने हे पत्र लिहिण्याचा विचार होता. पण म्हटले थोडे थांबावे. सुरुवातीच्या काळात तुझी खूपच धांदल चाललेली असणार. इतक्या घाईगर्दीत माझे पत्र वाचायला तुला फुरसत कोठून मिळावी? आणि 'पुढे कधी तरी वाचू' म्हणून हे पत्र बाजूला ठेवलेस, की 'पुढे' कधी उगवण्याची खात्री काहीच नाही.

 पहिली गोष्ट, तुझी राहण्याची सोय व्यवस्थित झाली की नाही? कुणा नातेवाईकाकडे किंवा ओळखी-पाळखीच्या माणसाकडे उतरावयाची सोय झाली म्हणजे बरे असते. खर्च कमी होतो हे तर खरेच. पण कपडे अंथरुण-पांघरूण याबाबतसुद्धा काटकसर करता येते. पावसाळ्यात कपडे वाळायची अडचण होते म्हणून नाही तरी अगदी कपड्याच्या एका जोडातही भागवता येते. घरच्या जेवणात खानावळीतला ताट-वाट्यांचा चकचकाट नसतो; पण साध्या स्वच्छ घरच्या जेवणात प्रकृतीला अपाय तरी नाही. खानावळ परवडणे कठीणच. मग एस्टीने घरून डबा मागवता आला तर बरेच. प्रत्येक वेळी डबा उघडला म्हणजे घरच्या सर्वांची भेटच झाल्यासारखे वाटते. पण एस्टीचा भरवसा कमीच. कधी उशीर, कधी काय. सकाळचे रात्री खाण्याची घरी सवय नसले असे नाही. पण शहरातल्या खोलीत सूर्य मावळल्यावरती सकाळचेच समोर वाढून घेऊना जेवायले बसले, की डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहत नाही.

 वसतीगृहात रहायला मिळण्याइतकी ऐपत असलेले भाग्यवानच म्हणायचे. एखाद्या पुढाऱ्याची मुले सोडल्यास वसतिगृहात मुलांना ठेवण्याची शेतकरी आईबापांची परिस्थिती कधीच नसते. बिचारे इकडे तिकडे उधार-पाधार उसनवार करून आणि अक्षरश: आपले

अंगारमळा । १०६