पान:अंगारमळा (Angarmala).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

क्रांतीची स्वप्ने उडून गेली; पण निव्वळ सवयीपोटी उच्चभ्रूची आंदोलने लाल झेंड्याखाली होत राहिली. जिभेला वळण पडले म्हणून शोषणमुक्तीच्या वल्गनांना उच्चार मिळत गेला.

 डॉ. दत्ता सामंत हे खरे तर एका महत्त्वाच्या कालखंडाचे नाव आहे. दहाबारा वर्षांची पोरं मुंबईच्या गिरणीत पंधरापंधरा, सोळासोळा तास काम करीत. पगार तीन आणे; रजा नाही, सुटी नाही, बदलीची सोय नाही, विश्रांती नाही, गिरणीतील मागासमोरच थकून पडणारी. या काळात ना.म.जोशी यांनी कामगार चळवळ उभी केली. श्रीपाद अमृत डांगे यांनी त्याला समाजवादी सिद्धांताचे स्वरूप दिले. 'कामगारांचा लढा पगाराकरिता नाही, पगार हे निमित्त आहे, खरे उद्दिष्ट कामगार क्रांतीचे आहे,' अशी भाषा दिली. गिरणी कामगारांनी डांग्यांनाच तोंडघशी पाडले. कामगार मैदानावर एका संध्याकाळी एक महिनाभर चाललेला गिरणी कामगारांचा संप निर्धाराने पुढे चालवण्याच्या घोषणा टाळ्यांच्या कडकडाटात देण्यात आल्या आणि दुसरे दिवशी सकाळी झाडून सारे गिरणी कामगार कामावर हजर झाले. तत्त्वनिष्ठ कामगार चळवळीचा त्याच दिवशी अंत झाला.

 कामगार चळवळ नंतर व्यावसायिक बनली. आर.जे. मेहता, जॉर्ज फर्नांडिस यांनी संघटित कामगारांच्या दंडेलशाहीचे स्वरूप कामगार चळवळीला दिले. या मालिकेतले डॉक्टर सामंत हे शेवटचे टोक. या चळवळीला आळा घालण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी शिवसेनचा राक्षस पोसला. आज तोच राक्षस काँग्रेसवाल्यांना खाऊन बसला आहे. डॉक्टरसाहेब तर निघून गेले. सुखवस्तू कामगार धर्मवादी, जातीयवादी बनले. असंघटित कामगार आणि शेतमजूरही त्याच दिशेने ओढले जात आहेत.

 कधी नव्हे इतकी एका तरुण दत्ता सामंताची गरज असताना कुणा चारपाच गुंडांनी सुपारी घेतली. सामंतांची गाडी अडवली आणि घरासमोर बेछूट गोळीबार करून एक कालखंड संपवला. कामगार विश्वातील जबरदस्त ताकद समजल्या जाणाऱ्या डॉक्टरसाहेबांना कामगार चळवळीत काय घडते आहे याची जाण आली होती, असे का होते आहे हे समजले नव्हते. आता उरलेल्या डाव्या चळवळीत समजही नाही, जाणही नाही आणि शोधण्याची इच्छाही नाही.


 

(शेतकरी संघटक, ६ फेबुवारी १९९७)

अंगारमळा । १०५