पान:अंगारमळा (Angarmala).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भरवल्या. विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले आणि मुंबईच्या शिवाजी पार्कवर व्ही.पी. सिंग, चंद्रशेखर यांच्यासमवेत एक सभा झाली. त्यात मीही मंचावर होतो. जनता दलाचे सरकार दिल्लीत आल्यापासून एका नव्या अर्थशास्त्रीय चर्चेला तोंड फुटले होते. दुसरे स्वातंत्र्य आणण्याची भाषा चालू झाली होती. हे नवे पर्यायी अर्थकारण ग्रामीण व्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून चालेल असा रागरंग दिसत होता. नंतर थोड्याच काळात सगळेच उलटले. देवीलालांच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेने उचल खाल्ली आणि ते मंत्रिमंडळातून बाहेर पडले. हडबडून गडबडून गेलेल्या विश्वनाथ प्रताप सिंगांनी जातीय आरक्षणाचा झेंडा फडकावला आणि देश एका दरीत ढकलून दिला.

 त्या सभेला सुरवाती सुरवातीला गर्दी बरी होती. शेवटी शेवटी मैदान ओसच पडले. त्या वेळचे दलाचे कोणी दलित समाजातील नगण्य व्यक्तिमत्त्व अध्यक्ष म्हणून बोलायला उभे राहिले तेव्हा मैदानावरच्यापेक्षा मंचावरचीच संख्या अधिक अशी परिस्थिती झाली होती. मंचावर डॉक्टरसाहेब माझ्या बाजूसच बसले होते. ते सारखे चडफडत होते. "या xxx कामगारांना मी दोनदोन तीनतीन हजार रुपये पगारवाढ मिळवून दिली. xxxxx नी संपाच्या वेळी माझ्यामागे आणि मिटिंगांना शिवसेनेच्या. यांचेच संप आम्ही चालवत राहिलो हीच मोठी चूक झाली. आम्ही महाराष्ट्रभर पसरायला पाहिजे होतं. देशभर पसरायला पाहिजे होतं; कामगार चळवळीचा; डाव्या चळवळीचा फायदा या XXXXX नी घेतला. स्वत:ची घरं भरली. बिचारा खराखुरा कामगार तसाच असंघटित राहिला. आमचा सारा हिशेबच चुकला."

 कामगार युनियनची पगार, सोयीसवलती वाढवून घेण्याची चळवळ आणि तिचे समाजवादी क्रांतीतील स्थान या विषयावर भरपूर जडजंबाळ पांडित्य दाखवणारे प्रचंड लिखाण आहे. डॉक्टरसाहेब काही विद्वान मार्क्सवादी नव्हते. ट्रेड युनियन चळवळीत त्यांनी प्रवेश केला तो उत्तर मुंबईतील दगड खाणींच्या आसपासच्या झोपडपट्टीत एक डॉक्टर म्हणून. त्या कामगारांची दु:खे पाहून मन पिळवटले म्हणून ते कामगार चळवळीकडे वळले. चळवळ मोठी झाली; डॉक्टरसाहेबांचे नाव गाजले. आर.जे. मेहता, जॉर्ज फर्नांडिस आणि त्यानंतर डॉक्टरसाहेब यांनी अधिकाधिक झुंजार आणि अधिकाधिक तत्त्वशून्य कामगार चळवळ पुढे चालवली. असंघटित कामगार, शेतमजूर तसेच राहिले. प्रिमिअर, गोदरेज असल्या कंपन्यांचे कामगार सुखवस्तू बनल्यावरही कामगार क्रांतीच्या घोषणा देत राहिले. काहीतरी चुकते आहे याची डॉक्टरसाहेबांना निदान आठ वर्षे आधी जाणीव होती. फक्त सुटावे कसे ते समजत नव्हते. समाजवादाचा भुलभुलैया संपला. कामगार

अंगारमळा । १०४