पान:अंगारमळा (Angarmala).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टक्क्यांखाली नाही. एकदा लायसेंस परमिट मिळाले की ग्राहकाला लुटायला हे XXX मोकळे. ताळेबंदात दाखवणार फायदा २० नाही तर ३० टक्क्यांचा. मला हे माहिताय, की एक दिवसदेखील कारखाना बंद ठेवणे या xxxxx ना परवडणारे नाही. त्यांनी ताळेबंद काढला, की आम्ही त्याच्यावरच हल्ला करतो. पहिल्यांदा ५०० रुपये वाढ मागितली तेव्हा मला उगाचच वाटले आपण फार मागितले; मालक मंडळी हे काही द्यायचे नाहीत आणि संप चालवणे कठीण होऊन जाईल; पण काही नाही xxxx नी पहिल्याच झटक्यात कबूल करून टाकले. मग माझीही भीड चेपत गेली आणि अशक्य वाटणाऱ्या मागण्या केल्या तरी त्या मनवून घेता येतात. कसले हिशेब आणि अर्थशास्त्र! हे xxx दिवसाढवळ्या देशाला लुटून राहिलेत. मी कामगारांकरिता त्यांच्याकडून जितकं काढून घेता येईल तितकं रपाटून काढून घेतो.'

 एकेकाळचे शोषित कामगार आता शोषक वर्गाचे भागीदार बनले आहेत. कामगारांचे संप शोषकशोषितातील संघर्ष नाही. दोन शोषकांमधील वाटणीच्या या लढाया आहेत हा मुद्दा स्पष्टपणे मांडायला मी त्यानंतरच सुरवात केली. यानंतर पुन्हा एकदा सामंतांची आणि आमची एक बैठक झाली तिचा वर्तमानपत्रात बराच गाजावाजा झाला. ती बैठक संपवून माझ्या एका भाचीच्या लग्नाला हजर राहण्याकरिता मी गेलो. माझे मेव्हणे कापड गिरणी क्षेत्रातील मोठे मान्यवर प्रस्थ होते. त्यांच्या मुलीच्या लग्नाला मुंबईतील गिरणीमालक किंवा व्यवस्थापन यांचे झाडून सारे प्रतिनिधी हजर होते. माझी ओळख करून दिल्यावर सगळ्यांनी मला गराडा घातला आणि थोडे घाबरत घाबरतच प्रश्न विचारले, "डॉक्टर साहेबांनी कापड गिरणी कामगारांचा संप जाहीर केला आहे; तुम्ही त्यांचे मित्र आहात. अर्थशास्त्र जाणता. हे असे त्यांनी कसे काय केले? त्यांनी संप जाहीर केल्यामुळे आम्ही सगळे पेढे वाटण्याच्या मन:स्थितीत आहोत. आता गिरण्यांचा आतबट्ट्याचा धंदा राजरोसपणे आम्ही बंद करू शकू. दत्ता सामंत आज आम्हाला देवदूतांसारखे वाटताहेत. हे झाले कसे काय? ठाण्याच्या उत्तरेस असलेल्या कारखानदारीच्या क्षेत्रात आजपर्यंत सामंतांनी काम केले; ही सगळी नवीन कारखानदारी आहे, तेथे भरपूर फायदा आहे म्हणून कामगार आघाडीचे तंत्र यशस्वी झाले; पण कापड गिरण्या आधीच डबघाईला आलेल्या हे डॉक्टरसाहेबांना कोणीतरी सांगायला पाहिजे." हा एक अप्रत्यक्ष पुरावा - इतर कोणी काही म्हणाले तरी डॉक्टरसाहेबांनी गिरणी मालकांकडून पैसा घेऊन संप केला आणि गिरणी कामगारांना तोंडघशी पाडले या आरोपात काही तथ्य नाही, हे दाखवणारा.

 १९८९ मध्ये विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या प्रचंड सभा संघटनेने महाराष्ट्रात

अंगारमळा । १०३