पान:अंगारमळा (Angarmala).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हार गळ्यात घालणे शिडीने शक्य होत नाही. त्याकरिता फायर ब्रिगेडची क्रेन आणावी लागते. ती महानगरपालिकेकडून भाड्याने मिळते. माझ्या आठवणीप्रमाणे एक वेळचे भाडेच पंचवीसतीस हजारांचे होते. महापौर आल्यामुळे क्रेन बिनभाड्याची मिळाली आणि शेवटी प्रत्येक पदाचा काही रुबाब असतोच! छगन भुजबळ आले तेव्हा साहजिकच पत्रकारांचा गराडा तिकडे धावला; कॅमेऱ्याचे फ्लॅश त्यांच्यावरच चमकले; क्रेनमध्ये चढून पुतळ्याला हार घालण्याच्या कार्यकमात सगळ्यांचे लक्ष त्यांच्या फेट्यावरच राहिले. फक्त स्वागताचे भाषण करून त्यांनी दुसऱ्या कामाला निघून जायचे असे ठरले होते. नंतर शेतकरी संघटना व कामगार आघाडी यांचाच मेळावा दीडदोन तास चालला असता. डॉ. दत्ता सामंतांना मंचावर घेणे ठाकऱ्यांना पसंत नव्हते ते त्यांनी स्पष्ट केले. डॉ. दत्ता सामंतांना छगन भुजबळ येणेही पंसत नसावे; पण ते त्यांनी स्पष्ट केले नाही आणि एक युक्ती केली.

 शिवाजी पार्कचे मैदान सगळे भरले होते. मुंबईच्या बाहेरून आलेले शेतकरी बहुसंख्येने होते व अपेक्षेच्या मानाने कामगार आघाडीचे लोक खूपच कमी आले होते, हेही स्पष्ट होते; पण मंचाच्या अगदी समोर महिलांच्या राखीव जागेत कामगार आघाडीच्या ४००-५०० बाया कामगार आघाडीच्या लोकांनी आणून बसवल्या होत्या. छगन भुजबळ उभे राहिले की त्या हुर्योवाडी करायला लागायच्या; घोषणा द्यायच्या. अगदी त्यांच्या मुर्दाबादच्याही घोषणा देत होत्या. छगन भुजबळ निघून जाईपर्यंत हे चालू होते. मंचावर माझ्याशेजारी बसलेल्या डॉक्टरसाहेबांना मी हा प्रकार थांबवण्याची अनेकदा विनंती केली. त्यांनीही थोडे दटावल्याचे नाटक केले; पण सगळा आधी रचलेला बनावच! काही परिणाम झाला नाही. भुजबळ नाराज होऊन गेले. शिवसेनेतून त्यांना फोडण्याचे श्रेय नंतर शरद पवारांना मिळाले; ते १२ डिसेंबर १९८७ ला अनिल गोटे यांनाच मिळाले असते.

 या काळात दोनतीन वेळा डॉक्टरसाहेबांशी चर्चा करण्याचा प्रसंग आला. एकदा मी त्यांना विचारले, "तुम्ही पगारवाढीच्या आणि बोनसच्या मागण्या करता त्या बेहिशेबी आणि काहीच्या बाही असतात असा आक्षेप आहे. आम्ही कांद्याचा भाव मागितला तर मोठ्या शास्त्रीय पद्धतीने त्याचा उत्पादनखर्च काढतो. आम्ही वापरत असलेली पद्धत कृषिमूल्य आयोगाच्या पद्धतीपेक्षाही अधिक शास्त्रीय आणि परिपूर्ण आहे असा आमचा आग्रह आहे. तुम्ही १५०० रु. ची दरमहा पगारवाढ मागितली याला आधार काय?" डॉक्टरसाहेबांनी काही हयगय न करता उत्तर दिले 'कसले हिशेब करता? हे कारखानदार सगळे खोटे हिशेब आणि ताळेबंद मांडतात. मुंबईत एकाचाही फायदा २००-३००

अंगारमळा । १०२