पाणी! पाणी!!/ खडकात पाणी

विकिस्रोत कडून






५. खडकात पाणी



 कराड सुटल्यापासून बसमध्ये आपला नवरा अस्वस्थ आहे, आपल्याशी एक चकार शब्दानंही बोलत नाही, हे सुनंदाच्या लक्षात आलं होतं. पण ठासून भरलेल्या बसमध्ये जून महिन्याच्या रणरणत्या उन्हात कुकरमध्ये बटाटे उकडावेत तशी माणस गदगदत होती. सतत कपाळाचा घाम पुसून सुनंदा रडवेली झाली होती. तशात अंगात लग्नाची नवी कोरी वस्त्रं घामानं घट्ट चिकटलेली. त्यामुळे जीवाची तगमग होत होती. आईनं पाण्याची बाटली भरून दिली होती, पण त्यातलं गरम झालेलं पाणी कोरड पडलेल्या घशाची पिपासा जास्तच वाढवत होतं.

 डोंगर कापीत नागमोडी वाटांनी एस. टी. बस धावत होती. समृद्ध, हिरवा ऊस शेतीनं बहरलेला कराड तालुका मागे पडला होता. आता दुर्गम, दुष्काळी माणप्रांत सुरू झाला होता. एका तासात म्हसवड येईल. तिथून बैलगाडीनं आकाशवाडीला-सासरी जायचं आहे.

 कसं असेल आकाशवाडी गाव? जिथं आपल्याला उभा जन्म काढायचा आहे?


खडकात पाणी / ६३
 नवऱ्याकडे तिनं पाहिलं. सदानंद डोळे मिटून बसलेला होता. तिला वाटलं हलकंच त्याला हलवावं आणि विचारावं... मनात दाटून आलेलं! आपली हुरहूर... आपली भीती...

 सदाला तिची अवस्था माहीत होती. पण तरीही तिच्याकडे दुर्लक्ष करणंच त्यानं पसंत केलं होतं. तिच्या मनात अनेक प्रश्न आहेत, तिला आपल्याला काही विचारायचं आहे, हे सदाला माहीत होतं. पण तिच्या त्या प्रश्नांची उत्तरं आपणाकडे नाहीत हेही त्याला पक्कं ठाऊक असल्यामुळे तिच्याशी तो बसमध्ये बसल्यापासून बोलायचं टाळत होता.

 तिला आपणहून थेटपणे सत्याला - वास्तव परिस्थितीला सामोरं जाऊ दे असंच त्यानं ठरवून टाकलं होतं.

 मांडवपरतणीसाठी बायकोला घेऊन जाण्यासाठी सदा कराडला परवा आला होता. दोन रात्री शृंगाराच्या खेळीतही तो मनोमन अस्वस्थ बेचैन होता. कारण समोरच्या खिडकीतून कृष्णा-कोयनेचा संगम व चांदण्यातलं चमचम करणारं पाणी तो पाहात होता आणि त्याच वेळी आपल्या आकाशवाडीचा कोरडा टिपूस पडलेला तलाव आठवत होता. पाण्याचे दुर्भिक्ष आठवत होतं. टॅन्करपुढे पाण्यासाठी उसळणारी गर्दी दिसत होती आणि सुनंदेचं नदीचं वेड स्मरून तो व्याकूळ होत होता.

 दोन्ही दिवस तिनं त्याला फिरायला नेलं ते संगमावरच. जूनचा पहिला आठवडा असूनही तिथं पाणी खळाळत होतं. मध्येच अवकाळी पाऊस दणकून झाला होता, त्यामुळे पाणी चांगलं होतं. त्याच्या डोळ्यात खळ्ळ्कन पाणी आलं होतं. आपण दुर्दैवी, आपलं गांव दुर्दैवी..... ज्याप्रमाणं विकासानं - समृद्धीनं आपल्या डोंगराच्या माथ्यावर पसरलेल्या, पठारात वसलेल्या आपल्या गावाकडे पाठ फिरवली आहे, तशीच निसर्गानंही. कोणत्या शापाचं ओझं आपले गांववाले शतकानुशतके वागवत आहेत की, का म्हणून? का?

 नदीकाठी सुनंदा लहान बाळ खेळणी दिसताच जसं फुलारून येतं, तशी उत्फुल्ल झाली होती. नदीकाठावर वय आणि नुकतंच झालेलं लग्न व सोबत असलेला नवरा विसरून धांवली होती, पाण्यात भिजली होती आणि त्यालाही तिनं धीटपणान भिजवलं होतं.


पाणी! पाणी!! / ६४
 ही सुनंदा वेगळीच होती. घरी सलञ्जतेनं वागणारी, आपल्या पुराणिक वडिलांच्या मर्यादित वावरणारी सुनंदा ही नव्हती. ही होती निसर्गाशी एकरूप झालेली एक लसलसती देहवेल! सदासाठी हा अनुभव अनोखा होता. त्यानं आकाशवाडीच्या शाळेत मुलांना अनेक निसर्गकविता शिकवल्या होत्या 'निर्झरास - माझ्या गोव्याच्या भूमीत • पाऊस कधीचा पडतो...' पण त्यातलं सौदर्य, जिवंतपणा व एकतानता त्याला आज सुनंदाच्या रूपानं साकार होताना दिसत होती.

 आज सकाळी सासरेबुवांनी दोघांना संगमावर पाठवून नदीची विधिवत पूजा बांधायला सांगितली होती. ही त्यांच्या घराण्याची रीत होती. तेव्हा सुनंदानं सचैल स्नान केलं होतं, त्यालाही करायला लावलं होतं.

 त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शानं तो रोमांचित झाला होता, तृप्त झाला होता. पण त्याच वेळी अतृप्तीची धारदार सुरी त्याला चराचरा कापीत होती....

 तिच्या मिठीत खिडकीतून रात्री चमचमणारं चंदेरी पाणी पाहाताना अंगावर उठलेले रोमांच व आज सकाळची नदीची विधिवत पूजा- याच दोन दृश्यमालिका सदाच्या मनःपटलावर आळीपाळीने उमटत होत्या.

 आकाशवाडीत असं स्नानाचं मनसोक्त सुख गेली कित्येक वर्षे आपल्या वाट्याला आलं नाही. असे चवदार मधुर पाणी जिभेला तोषवून कधी गेलं नाही. कारण आकाशवाडीचं तळं म्हणजे पठाराच्या मध्यभागी नैसर्गिकरीत्या पडलेला मोठा खड़ा होता. त्यात पावसाळ्यात पाणी साठायचं. ते यथावकाश निवळायचं, मग ते पाणी आकाशवाडी आठ महिने पुरवून पुरवून प्यायचं. दर उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष... मग टैंकरसाठी प्रयल... तो रोज येणं म्हणजे भाग्याची परमावधी. त्याच्यापुढे उडणारी झुंबड... दोन घागरी पाणी पदरात पडणं म्हणजे लढाई मारल्याचा आनंद होता.

 कसं होणार सुनंदेचं आकाशवाडीत? कालपरवापर्यंत ही नदीकाठी वाढलेली जलकन्या पाण्याच्या अभावानं, जलाविना माशाप्रमाणे तडफडेल...

 नेमकं आपलं लग्नही मेअखेरीस झालेलं. या माणप्रांतात पाऊस पडायला जुनअखेर किंवा जुलै उजाडतो. आल्या आल्या हिनं घामानं चिक्क झालेलं अंग मोकळे करण्यासाठी स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली, तर पाणी घरी असेल का? ही तर माहेरी उन्हाळ्यात तीन-तीनदा स्नान करते. आजही सकाळी सचैल न्हाली, मग संगमावर पुन्हा पाण्यात डुंबली...

|

खडकात पाणी / ६५
 हा भर दुपारचा कडक उन्हातला प्रवास-जीवाची लाही लाही होतेय. आपल्याला या कडक उन्हाची व दोन दोन दिवस स्नान न करण्याची सवय आहे पण सुनंदाचं काय?-

 या प्रश्नाचं सदाकडे उत्तर नव्हतं - म्हणूनच बसमध्ये तीन-साडेतीन तासांच्या प्रवासात तो तिच्याशी एक चकार शब्दानंही बोलला नव्हता.

 म्हसवड फाट्यावर आपले हळदीने माखलेले पाय घेऊन सुनंदा उतरली, तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. तेथे एका कोपऱ्यात छप्पर घातलेली बैलगाडी उभी होती. सदाच्या हातातून ट्रंक व तिच्या हातातली वळकटी घेणारा हा आपला दीर असावा, हे तिनं अनुमानानं ताडलं.

 त्या भर उन्हात गरम चहा घेणं तिच्या जीवावर आलं होतं. तिनं हळूच नवऱ्याला विचारलं पण होतं, 'इथं चहाऐवजी सरबत नाही का मिळणार थंडगार?"

 त्यानं तिच्याकडे रोखून पाहिलं. क्षणभर ती भेदरली... आपण दीर व इतर लोकांसमोर त्याला बोललो हे त्याला आवडलं नाही का?... अशी तिच्या मनात शंका आली.

 सदाच्या नजरेत व्याकुळता दाटून आली होती. क्षणभर काय बोलावं हेच त्याला सुचेना. मग तो हलकेच म्हणाला, 'सुनंदा, हा दुष्काळी प्रांत आहे. इथं लिंबू दुर्मिळ आहे. झालंच तर इथं बर्फ कुठून आणायचा?'

 'रांजणातलं थंड पाणीही चालतं की, लिंबू नसेल तर कैरीचे पन्हं.' ती पुन्हा भाबडेपणानं बोलली.

 पुन्हा तो स्तब्ध. “कसं सांगायचं हिला? आमच्या गावात पाणी वाया जाऊ नये म्हणून पंचायतीनं रांजण किंवा माठ वापरायचे नाहीत, असा ठराव केला आहे." हा डोंगराळ माळ मुळातच निष्पर्ण आहे, झाडी बेताची, आंब्याची झाडे फारच कमी. जी आहेत, त्याच्या कैऱ्या व आंबे जिल्हा बाजारात विक्रीला जातात. कारण नापीक शेती - बाजरीखेरीज या खडकाळ भूमीत काही पिकतच नाही. तेव्हा कैरी वा अंब्याच्या विक्रीतून सुटणारा पैसा प्रपंचाला - मीठ - मिर्चीला तेवढाच हातभार लावतो... तुझ्या घरीच कितीतरी दिवसांनी सरबत घेतलं...!'


पाणी! पाणी!!/ ६६
 ‘इथं सरबत मिळत नाही.' एवढंच त्यानं रुक्षपणे उत्तर दिलं. मग तिला नाइलाजानं तो कढत चहा घशाखाली उतरवावा लागला. तो गुळाचा चहा होता, ती तो प्रथमच पीत होती. त्याची चव तिला कशीशीच लागली!

 ‘ते आपलं गांव बघ सुनंदा. बैलगाडीचा ऊन लागू नये म्हणून लावलेला पडदा सारीत सदानं तिला हातानं डोंगरमाथ्याकडे दाखवलं.

 त्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशात तो डोंगर ताठ उभा होता. त्याच्या माथ्यावर पठार होतं. त्या पठारात आकाशवाडी वसली होती.

 हे सारं तिला नवलाचं वाटत होतं. त्याचबरोबर मनात एक अनाम ताणही होता. त्याचं नेमकं स्वरूप तिला कळत नव्हतं. त्याला विचारावं, तर धाडस होत नव्हतं. कारण बैलगाडीत दीर होता, गाडीवान होता.

 ‘शंकर, सासरेबुवांनी पाच वाजून पाच मिनिटांनी गावात जोडीनं प्रवेश करावं असं सांगितलं आहे. सदा आपल्या भावाला म्हणाला.' ते ज्योतिष जाणतात. त्यांचं म्हणणं असं आहे की, आजची सात जूनची ही वेळ शुभशकुनाची आहे. तेव्हा इथंच थोडा वेळ आपण थांबू.'

 तिचा दीर व गाडीवान बैलगाडी थांबवून खाली उतरले व एका बाभळीच्या किचित छाया देणाच्या झाडाखाली खांद्यावरचा गमचा टाकून गप्पा मारीत बसले.

 गाडीत ते दोघेच होते. निःशब्द. ती मान खाली घालून गुडघे मोडून बसलेली, तर तो पाय लटकावीत बसलेला... आपल्या गावाकडे दुरून पाहात बसलेला.

 ‘हा आपला स्वभाव नाही आपण आजच असे पुन्हा पुन्हा व्याकूळ का होत आहोत?-' तो विचार करीत होता. आपलं आकाशवाडी म्हणजे माणप्रांतातल्या इतर कुठलाही गावापेक्षा आकाशाला जवळचं. कारण ते उंच डोंगरावरील पठारात वसलेलं; पण इतर गावांशी फटकून वागणारं - अलग राहाणारं. लग्नाला आलेल्या मुंबईच्या कापड गिरणीत काम करणा-या आपल्या मावसभावानं काय बरं शब्द वापरला? हा डिटॅच... सर्वांपासून तुटलेला. आपल्या या गावची, साऱ्यांची वृत्ती अशीच आहे डिटॅच, त्याला आपणही अपवाद नाही. भावनेची गुंतवणूक परवडत नाही; कारण दुष्काळ व दुर्भिक्षाला तोंड देता देता जगणं हेच मुळी कठीण आहे. मग अशा भरल्या देहाला शोभणाऱ्या मन-मानसाच्या गोष्टी कशा परवडणार?


खडकात पाणी / ६७
 याच्या उलट आहे सुनंदाचं आजवरचं व्यतीत झालेलं जीवन, समृद्ध कराडला तिचं आयुष्य गेलं. नदीकाठच्या देवळाचे तिचे वडील पुराणिक, खाऊनपिऊन सुखी. खरं तर तिथंच कुठेतरी तिला उजवायची, पण लग्नगाठी स्वर्गात पडतात, असं जे म्हटलं जातं ते खोटं नाही म्हणायचं. त्याखेरीज का ती आपल्याला सांगून आली? दोघांचा कडक मंगळ ही एकच बाब हे लग्न जुळायला कारणीभूत ठरली.

 कशी जुळवून घेईल ही आकाशवाडीत? तिला माहीत आहे का बाजेवरची आंघोळ? बाजेवर बसून स्नान करायचं व स्नानाचं पाणी टोपलीत साठवायचं, ते मग वापरण्यासाठी उपयोगात आणायचं !

 ...सदाला आपल्या विचारांचा भार पेलेना. तो खाली आला व आपल्या भावाकडे गेला आणि गप्पांत स्वतःला रमवू लागला.

 पावणेपाचला त्यांची बैलगाडी आकाशवाडीकडे चालू लागली.

 ‘दादा, आजचा दिवस शुभ खरा. कारण आज मृगाचा पहिला दिवस!' शंकर म्हणाला.

 'खरंच की, आज सात जून! मृगनक्षत्राचा पहिला दिवस. पावसाचा दिवस पण छे - या भागात गेल्या कित्येक वर्षात या दिवशी पाऊस झाला नाही. तो येतो जूनअखेर किंवा जुलैमध्ये...

 ‘पण पाऊस थोडाच पडणार आहे शंकर...!' किंचित खिन्न हसत सदा म्हणाला.

 ‘पडेलही. आमच्या वहिनीचा पायगुण म्हणून...' शंकर आपला अधोमुख वहिनीकडे पाहात म्हणाल्या.' आपल्या आकाशवाडीत आपल्या पिढीत भरपूर पाण्याच्या भागातून आलेली एकच सून आहे, ती म्हणजे आमची वहिनी.. देव करो व तिच्या पायगुणानं पाऊस पड़ो!'

 सदा मांडवपरतणीसाठी कराडात गेल्यावर गावात बेडकाची यात्रा काढली होती. त्या दिवशी टँकर आला होता त्या पाण्यानं सचैल स्नान करून पांच सुवासिनीसह बेडकाची यात्रा काढून देवीच्या मंदिरात पावसासाठी प्रार्थना केली होती. दरवर्षीचा आकाशवाडीचा तो रिवाज होता. कारण पावसावरच त्यांचं सारं काही अवलंबून होते.


पाणी! पाणी!! / ६८
 शकंरला जेव्हा आपली वहिनी कराडची आहे हे समजलं होतं, तेव्हा त्याच्या मनात हाच विचार तरळून गेला होता. आताही बोलताना सहज ते ओठातून बाहेर पडलं होतं.

 सदा पुन्हा खिन्न हसला - आपल्या साऱ्यांच्या बोलण्या - चालण्यात पाण्याचे संदर्भच ठासून भरलेले आहेत.

 सुनंदानं ते ऐकलं आणि तिच्या मनावर जो न समजणारा ताण मघापासून पडलेला जाणवत होता, त्याची दिशा स्पष्ट झाली होती.

 पुराणिकाची मुलगी आपण. बाबांनी पसंत केलेल्या मुलाचा गळ्यात डोळे झाकून माळ टाकली. पण तो प्राथमिक शिक्षक आहे. मॅट्रिक करून डी. एड. झाला आहे व बाहेरून बी. ए. करतो आहे, ही माहिती तिला सुखावून गेली होती. आठवीनंतर बाबांनी आपली शाळा बंद केली. नवऱ्याची मागेपुढे तालुक्याच्या गावी बदली झाली तर शिकताही येईल.. तो शिकवेल आपल्याला... ही कल्पनाच तिला बेहद्द आवडली होती व मनाला गुदगुल्या करून गेली होती.

 पण नवऱ्याच्या आकाशवाडीत पाण्याचे दुर्भिक्ष आहे, हे समजताच तिचा विरस झाला होता. जाणत्या वयापासून खळखळा वाहणारी कृष्णामाई तिची मैत्रीण होती. तिला या लग्नामुळे अंतरावं लागणार व अशा गावी जावं लागणार - जिथं सध्या पाणीटंचाईमुळे टैंकर चालू आहे - हे नवऱ्याच्या आपल्याशी व बाबाशी झालेल्या संभाषणात तिला समजून आलं होतं आणि मनावर ताण पडला होता.

 तो आता दिराच्या बोलण्यानं पुन्हा जास्तच ताणला गेला होता.

 ‘उगी भाबडी आशा आहे ही शंकरा.' सदा म्हणाला ‘पायगुण वगैरे झूट आहे - हा निसर्गाचा शाप आहे बाबा - आपलं गावच कमनशिबी आहे.'

 'बरं ते जाऊ दे. गावात तुझ्या शाळेचा बँड घेऊन गावची पोरं व इतर मंडळी स्वागताला सञ्ज आहेत!' शंकरनं माहिती पुरवली.

 “अरे, पण मी का पुढारी - अधिकारी आहे बँड वाजवून माझं स्वागत करायला? झालंच तर - लग्न करणं म्हणजे काही पराक्रम नाही. ती साऱ्यांचीच होतात.'


खडकात पाणी /६९
 ‘पण दादा, या गावात जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली ती तुझ्यामुळे - चांगले तालुक्याच्या जागी होतास, पण इथं आलास - गावची मुलं शिकावी म्हणून या आकाशवाडीत कोण यायला तयार होतं.?

 “अरे, हे माझं गाव आहे. कसंही असलं तरी. मी काही विशेष केलं नाही.

 ‘पण गावाला वाटतं ना - म्हणून ते तुझ्या व नव्या वहिनीच्या स्वागताला सज्ज आहे. सरपंच - पोलिस पाटील पण स्वागताला येणार आहेत....!'

 आकाशवाडीच्या सीमारेषेवर शाळेच्या बाजूला सारं गांव जमलं होतं. सदानंदचे वडील तात्या, सरपंच व पोलिस पाटील, गावचा रेशन दुकानदार ही खाशा मंडळी होती. शाळा एकशिक्षकी होती, म्हणून तिथे एकच खुर्ची होती ती बाहेर आणून ठेवली होती, तीवर सरपंच बसले होते. बाकीची मंडळी सोयीप्रमाणे उकिडवं बसली होती वा गटागटानं उभी होती.

 दूर डोंगराच्या पायथ्याशी एक बैलगाडी वर येताना दिसली. ती तरुण पोलिस पाटलाच्या तीक्ष्ण नजरेनं नेमकी टिपली. तो म्हणाला, 'तात्या, मंडळी येताहेत- पंधरा-वीस मिनिटात ते इथं येतील.'

 तात्यांनी अधू नजरेनं डोळे ताणून पोलिस पाटलानं दाखवलेल्या दिशेनं बराच वेळ पाहिलं, पण मंद दृष्टीला सरपंचानी सजवून पाठवलेली गाडी काही दिसली ना त्यांनी काही वेळानं तो नाद सोडून देत म्हणलं, 'जाऊ दे बाबा नजर आंधळी झालीय तू पाहिलंस ना मग ठीक !'

 ...आणि वाऱ्याची एक सुसाट लाट आली, धुळीचा लोळ उठला. टळटळीत ऊन मंदावलं. आकाशात ढग आले होते काळे काळे!

 सरपंचाचा अनुभवी रापलेला चेहरा उजळून आला. आपल्या भर गलमिशा कुरवाळीत ते म्हणाले, 'तात्या म्या काय म्हणलो व्हतो- तुमची सुनबाय पान्याच्या देशातली - सकुन घिऊन इल - पघा, पघा - आकाशात ढग आल्येत. काळे काळे.... आज मिरगाचा दिस.... पाणी पडेलसं दिसतंया........

 ‘तुझ्या तोंडात साखर पडो बाबा-' तात्या म्हणाले. 'परवाच्या बेडकाच्या यात्रेनंतर काल व आज टँकरच आला नाही, पाणी नाही..... आज पाऊस पड़ला तर बहर होईल....!'



पाणी! पाणी!! / ७०
 जमलेल्या साऱ्या मंडळीत उत्साहाची लाट पसरली. साऱ्यांच्या नजरा कधी आकाशात दाटी करून आलेल्या ढगाकडे तर कधी दुरून येणाऱ्या बैलगाडीकडे जात होत्या.

 गाडी सीमारेषेवर आली व थांबली. गाडीतून प्रथम उडी मारून शंकर बाहेर आला व तात्यांकडे जात म्हणाला, 'आम्ही आलो तात्या, पण नव्या वहिनीच्या वडिलांनी बरोबर पाच वाजून पाच मिनिटांनी या गावच्या भूमीवर पाय ठेवायला सांगितलंय जोड्यानी - हा शुभमुहूर्त आहे म्हणे. म्हणून थोडं थांबावं लागेल!

 ‘हात तिच्या मारी थांबू की !' सरपंच म्हणाले, 'तात्या म्या सूनबाईच्या बापाला जानतो. आमचे मोहिते अन्ना त्येंना इचारूनच विलेक्शनचा फॉरम मुहुर्तावर भरायचे......!..

 साऱ्यांची अधिरता उत्कर्षबिंदूला पोचली होती. त्या तृषार्त जनतेला पाण्याच्या समृद्ध हिरव्या प्रदेशातून आलेल्या गावच्या सुनेला पाहायचं होतं... आणि तिचा पायगुण पाहायचा होता.

 वास मंदावला होता, पण आकाशात ढगांची दाटी झाली होती.

 बरोबर पाच वाजून पाच मिनिटांनी सुनंदानं त्या आकाशवाडीचा भूमीवर पाय ठेवले. गावक-यांना हिरव्या शालूतली एक नवोठी तरुणी दिसली, त्यांच्या डोळ्यातली हिरवी स्वप्ने गडद करणारी.....

 तिनं वर आकाशाकडे पाहिलं.... आणि तिच्या तप्त चेहऱ्यावर पाण्याचा एक टपोरा थेंब पडला. ती शहारली...... आणि दूर कुठे तरी वीज कडाडली. आणि भुरभुऱ्या पावसाला सुरुवात झाली. काही क्षणांतच पावसाने जोर पकडला. पाहाता पाहाता सारेजण भिजू लागले.


 सर्वप्रथम भानावर आला तो तरणा पोलिस पाटील. त्यानं लेझीम व लगी घेऊन येणाऱ्या शाळेच्या मुलांना इशारा दिला - 'अरे, बघता काय - वाजवा रे वाजवा...!'

खडकात पाणी / ७१
 आणि लेझीम खळखळू लागले... हलगी तडतडू लागली... शाळेची मुलं व तरणीताठी पोरं मनसोक्त नाचू लागली व पावसात भिजू लागली.

 आकाशवाडीची नवी सून - सदा गुरुजीची पत्नी गावासाठी शुभशकुनाची ठरली होती, येताना माहेरच्या गावच पाणी घेऊन आली होती.

 दुस-या दिवशी सदानं सुनंदाला गावच्या मध्यभागी असलेलं तळं पाहायला नेलं. ते लाल पाण्यानं तुडुंब भरलं होतं त्यांच्यासोबत सरपंचही होते. ते म्हणाले,

 ‘पोरी, हे आक्रीतच म्हनायचं. गेल्या अनेक वरसात पयल्या पान्यानं असं तळे भरलं नव्हतं. तू गावासाठी शकुनाची ठरलियास माये...!'

 ‘हे, हे असं पाणी तुम्ही पिता?' तिनं त्या लालतांबड्या पाण्याकडे पाहात शहारून विचारलं.

 “हो, अगं हे नैसर्गिक तळे आहे दोन दिवसात पहाशीलच पाणी कस नितळशंख होतं ते', सदा म्हणाला. 'पाणी इथं नैसर्गिकरीत्या फिल्टर होतं असं म्हटल पाहीजे....."

 आणि तिला त्याचा प्रत्यय आला. चार दिवसांनी ती हट्टानं स्वतःहून पाणी आणायला तळ्यावर आली, तेव्हा ते शांत, निळसर पाणी पाहून तिला खात्री पटत पाणी पण चवीला बरं होतं - अर्थात, कृष्णामाईच्या पाण्याची त्याला सर नव्हती म्हणा!

 हळूहळू तिला गावच्या पाणीटंचाईचा आवाका समजत गेला आणि त्यात व्यापकता पाहून ती सुन्न झाली!

 त्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशात मध्येच डोंगराचा हा सुळका घट्ट पाय ताठ उभा होता. आणि त्याच्या डोक्यावर अडीच-तीन मैलाचं पठार होतं, त्याव गाव वसलं होतं. डोंगरपायथ्याचं मूळ गाव सरळ सव्वा किलोमीटर दूर होत, नागमोडी वळणानं ते सहा-सात किलोमीटर पडायचं.

 इथं पाऊणशे घराची वसती होती आणि जमिनीत पावसाच्या पाण्यावर कशीनिशी बाजरी व हलगी पिकायची. मात्र गावात पशुधन बरंच होतं. कारण डोंगरावर पावसाळ्यात काहीबाही हिरवं तरारून येतं, ते जनावरांना पुरतं! मात्र तरुण पिढी गाव सोडून मुंबई व जिल्ह्याच्या गावी नोकरी - धंद्यासाठी पळत होती.

 सदा खरं तर तालुक्याच्या गावी शिक्षक होता. पण गावात शाळा असावी गावची मुलं शिकावीत हा त्याचा ध्यास होता. त्यानं सतत खटपट करून गावात शाळा


पाणी! पाणी!! / ७२
मंजूर करवून घेतली होती. तिथं कुणी शिक्षक म्हणून जायला तयार नव्हतं, म्हणून स्वतःहून सदानं तिथं जायची संमती दर्शवली. गेली चार वर्षे तो इथं गावात मुलांना शहाणं करीत होता, प्रौढांसाठी साक्षरतेचे वर्ग चालवत होता.

 पण पाणीटंचाईनं तो अस्वस्थ व्हायचा. पण डोंगरपठारावर विहीर घेणं शक्य नव्हतं. आणि खालच्या पायथ्याच्या गावातून पाणी पाईपलाईनद्वारे वर आणणं फार खर्चिक काम होतं. गावची दोन - अडीचशेच्या वस्तीला पिण्याचे पाणी आणण्यासाठी एवढा खर्च करणं सरकारच्या नियमात बसत नव्हतं.

 म्हणून तळ्याचं पाणी आटलं की समस्या गंभीर रूप धारण करायची. मग दरवर्षी टँकर सुरू व्हायच्या. पण टँकर वर आणणंही अवघड होतं. कारण रस्ता हा कच्चा व खडकाळ होता. दरवर्षी हमखास एकदा तरी टँकर बंद पडायचा. टँकरचं पाणी जेमतेम पिण्यासाठी पुरायचं; पण आंघोळीसाठी व इतर कामासाठी फार काटकसरीनं वापरावं लागायचं.

 पण हे साल बरं गेलं. कारण पाऊस उत्तम झाला होता. जवळपास मार्चपर्यंत पाणी पुरलं होतं. याचं सारं श्रेय गावकरी सुनंदाच्या पायगुणाला द्यायचे.

 एप्रिल उजाडला आणि तळ कोरडे पडू लागलं. इतके दिवस सुरू असलेली पंचायतीची पाणी वाटप समिती खाडकन् जागी झाली. तिनं रेशनिंग करून पाणी वाटप करायला सुरुवात केली.

 इतके दिवस तिच्या घराच्या मते तिची दररोज चालणारी आंघोळीची चैन बंद झाली. आणि ती तगमगू लागली. एक दिवस मग तिनं खाटलंस्नान केलं. बाजेवर बसून अंगाखांद्यावर चार-सहा तांबे पाणी घेऊन अंग विसळून घेतलं. ते पाणी खाली ठेवलेल्या टोपलीत जमा झालं होतं, पण बरंचसं आजूबाजूला सांडलं होतं. तो पाहून कधी नव्हे ती तिची सासू कडाडली,

 “अगं, किती पाणी वाया गेलं जमिनीत जिरून, जरा नीट खाटलंस्नान करत जा!'

 सदानं तिची समजूत काढीत म्हटलं, “अगं आई, तिला हा प्रकार नवा आहे. हळूहळू ती शिकेल सारं!'

 ती विलक्षण शरमिंदी झाली होती.

 ‘हे खरं स्नान नाही- हे तर अंग विसळणं झालं' तिच्या मनाला उभारी येत नव्हती. त्या सर्वांच्या त्या दिवशीच्या आंघोळीनंतर जमा झालेलं पाणी वरकामाला वापरताना तिला किळस वाटली होती, पण त्यामागची मजबुरी पण ती समजू शकत होती.

 या अशा आकाशवाडीला उभं आयुष्य कसं काढयचं? हा प्रश्न जेव्हा तिच्या मनाला पडला, तेव्हा ती मूळासगट हादरून गेली होती. पण हा प्रश्न मनाचा तळाशी तिनं निग्रहानं दडपून टाकला होता.

खडकात पाणी / ७३
 आता शाळेला सुट्या लागल्या होत्या. शाळेचा ग्रंथालयातील काही पुस्तकं वाचण्यासाठी सदानं घरी आणली होती. तिला वाचनाची आवड होती. अशाच एके दुपारी सदा जेवणानंतर झोपला होता व ती एक पुस्तक वाचीत मधल्या अंगणात भिंतीच्या सावलीत बसली होती.

 कडक ऊन, वारा मुळीच नाही. वाढतं उष्णतामान..... दोन दिवस स्नान नसल्यामुळे घामाची वाळून शरीरावर चढलेली पुटं - आपला घाम पुसताना त्याची तुरट लागणारी चव.... मन मिटून जावं, कोषात दडावं असं वातावरण; पण प्रयत्नपूर्वक ती त्या गुलजार कादंबरीत स्वतःला रमवत होती.

 आणि कसलासा आवाज झाला, म्हणून ती पुढे झाली. दारात एक जीप थांबली होती. तिनं घाईघाईनं नव-याला उठवलं. तो शर्ट अंगात चढवीत पुढे झाला.

 'अगं, ही तर बी. डी. ओ. ची जीप आहे तो पुटपुटला. 'इथं कशासाठी आले असतील ते कळत नाही."

 तो सामोरा जात म्हणाला, 'नमस्कार साहेब, मी इथल्या प्राथमिक शाळेचा शिक्षक सदानंद कुलकर्णी....!"

 'नमस्कार....! मी तुम्हाला ओळखतो कुलकर्णी सर! तुमच्या लग्नात मी होतो' बी. डी. ओ म्हणाले, “मी सुनंदाचा राखीभाऊ आहे, माझी बहीण आहे ती"

 सुनंदा पुढे झाली. हा तर अभय होता. तिचा मोठ्या भावाचा वर्गमित्र तिच्याकडून दरवर्षी राखी बांधून घ्यायचा. हा केव्हा बी. डी. ओ. झाला?

 'अगं तुझ्या लग्नाच्यावेळी माझी गटविकास अधिकारी म्हणून नुकती निवड झाली होती. ट्रेनिंग झालं व इथं पंधरा दिवसांपूर्वी पोस्टिंग झाली.' अभय म्हणाला.

 'आधी आत ये ना दादा....!' ती म्हणाली.

 'हो हो, आत या साहेब' सदा म्हणाला.

 'पण मी बोलण्याच्या नादात विसरून गेलो माझ्या जीपमध्ये कोण आहे पाहिलंस का?' अभय म्हणाला.

 तिनं जीपमध्ये डोकावून पाहिलं आणि तिचा विश्वासच बसेना. तिच्या गावचे आबा गुरुजी होते.

 ‘आबा तुम्ही? इथं? माझा विश्वासच बसत नाही.' तिला आनंदाने शब्द फुटेना. 'या - या आत या?'

 'अगं पोरी, हा जीप घेऊन आला, तेव्हा विचार केला... तुला भेटून यावे - तुझ्या बापानंही मला आग्रह केला - एकदा जाऊन पोरीचा संसार पाहून ये म्हणून '

 "इतक्या दिवसांनी आठवण झाली आता आपल्या लेकीची.... ।' फुरंगटत ती म्हणाली.

 'अगं हो- जरा दमानं ! मला घरात तर घे!' आबा म्हणाले, 'काय जावई बापू - आज तुमचा पाहुणचार घ्यायला आपणहून आलोय न बोलवता, चालेल ना?"

पाणी! पाणी!! / ७४
 हे काय बोलता? मला लाजवू नका.' सदा म्हणाला. 'हे तुमच्या लेकीचंच घर आहे. या आत!'

 ‘पण मी थांबू शकत नाही. एक अर्जट मिटिंग आहे.' अभय म्हणाला. 'मी आता जातो व उद्या येतो - उद्या चवथ्या शनिवारची सुट्टी आहे. निवांत बोलता येईल ना मग मी गुरुजींना परत घेऊन जाईन...!' आणि अभय जीपनं निघून गेला.

 सुनंदा फुलारून आली होती. तिचे धर्मपिता - तिचे गुरुजी तिचा संसार पाहायला आले होते. तिचा राखीभाऊपण आला होता. इतक्या दिवसांची कसर भरून निघाली होती.

 सदाची व आबा गुरुजीची तार चांगलीच जुळली होती. रात्रीचं जेवण आटोपून ते बाहेर मोकळ्यावर बाज टाकून गप्पा मारीत बसले. सुनंदाही त्यात सामील झाली.

 आणि बोलण्याच्या ओघात सदानं आकाशवाडीच्या पाण्याच्या दुर्भिक्षाबद्दल कल्पना दिली. झालंच तर सुनंदाच्या पायगुणानं यावर्षी नेहमीपेक्षा तळ्याचं पाणी दोन महिने जादा कसं पुरलं, हेही सांगितलं.

 ‘या गावात पाणीच नाही आबा, काय करणार? हा प्रश्न आमच्या पाचवीला पुजला आहे....!' सदाचा वैताग शब्दाशब्दातून प्रतीत होत होता. 'डोंगरावरचा हा पठारी मुलूख' इथल्या मातीत खडकच जास्त आहे. पाण्याचे झरेच नाहीत, असंच जी. एस. डी. ए. वाले सांगतात, त्यामुळे इथं नळयोजनाच होऊ शकत नाही....!'

 अचानक सुनंदाला स्मरण झालं की, आबा जमिनीतलं पाणी हेरतात, दाखवतात. ते जन्मतः म्हणे पायाळू होते. केवळ कान लावून, पदस्पर्शित जमिनीखाली पाणी आहे की नाही, हे सांगतात आणि त्यांचं अनुमान नव्वद टक्के प्रकरणात खरं ठरलेलं आहे. त्यांना विचारावं का, या गावात कुठे पाणी आहे का हे तपासून पाहायला....

 ‘आबा, मी तुमचा लौकिक जाणते. तुम्ही जमिनीखालचं पाणी खात्रीनं आहे की नाही सांगता. मग उद्या या गावात चक्कर मारून सांगा ना - कुठे पाणी लागेल का?-

 सदा तिच्याकडे खुळ्यागत पाहात राहिला. 'अगं हे काय? भूगर्भशास्त्रज्ञांनी इथे पाणी नाही, असं सर्व्हे करून जाहीर केले. तेथे आबा काय सांगणार?'

 'तसं नाही जावई बापू हेही आमचं शास्त्र आहे.' आबा गंभीर होत म्हणाले, फार तर म्हणा की - परंपरागत शास्त्र आहे. पायाळू माणसाला एक अतिरिक्त ज्ञानेंद्रिय असतं . मलाही ते आहे व त्यामुळेच जमिनीखाली पाणी आहे की नाही हे मी सांगू शकतो. आणि दहामधील नऊ प्रकरणात माझा अंदाज आजवर खरा ठरलेला आहे....!'

 दुस-या दिवशी आबा व सदा आकाशवाडीचा फेरफटका मारायला निघाले. मध्ये मध्ये ते थांबत, पायातली वहाण काढून पायाने जमिनीवर थपथप करीत, कुठे उकिडवे बसून जमिनीला कान लावत. 'नाही इथं नाही....' असं ते पुटपुटत. असं जवळपास घंटाभर चाललं होतं. सदा कंटाळला होता, पण सुनंदानं त्याला आबाबद्दल इत्थंभूत सांगितल्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं.

खडकात पाणी / ७५
 असं करीत करीत ते तळ्याजवळ आले. तळे कोरडं पडलं होतं. सदाचा आधार घेत आबा गुरुजी तळ्यात उतरले. तिथं गोल गोल फिरले, तिथल्या ओलसर मातीला कान लावले, क्षण, दोन क्षण ते तसेच होते आणि मग ओरडून म्हणाले,

 'इथं - इथं पाणी आहे. या तळ्याच्या खाली जिवंत पाझर आहे आणि ते पाणी अक्षय आहे....!'

 ‘पण आबा, या तळ्याखाली तर प्रचंड खडक आहे."

 'तो फोड़ा, पाणी लागेल!'

 ‘पण ते किती कठीण - खर्चिक आहे. पुन्हा जी. एस. डी. नं इथं या गावात पाणी नसल्याचं सर्व्हेक्षणाअंती जाहीर केल्यामुळे शासन काहीच करू शकणार नाही.

 'ते मला माहीत नाही; पण माझ्या आजवरच्या अनुभवाच्या आधार सांगतोय, इथं या तळ्याखाली खडकाच्या आत पाणी आहे, हे निश्चित !'.

 सुनंदा ते ऐकून हर्षभरित झाली. 'माझी खात्री आहे, आबा म्हणाले म्हणजे तिथं पाणी नक्की असणार आहे....'

 पण त्यानं शासकीय अडचण सांगितली, तेव्हा ती झटकन म्हणाली, "पण आता इथं अभयदादा बी. डी. ओ. आहे, तो हा प्रश्न सोडवील ना!'

 दुपारी अभय आला, तेव्हा भोजनानंतर हा विषय निघाला. तो या तालुक्याचा गटविकास अधिकारी असल्यामुळे त्याला आकाशवाडीच्या भीषण पाणीटंचाई जाणीव होती. त्यामुळे आबांनी तळ्याच्या खाली पाणी असल्याचं सांगितलं तेव्हा तो म्हणाला,

 'आबा गुरुजींना मी मानतो कुलकर्णी सर... कारण मी प्रत्यक्ष अनुभवले आहे जिथं जी. एस. डी. ए. नं पाणी नाही म्हणून सांगितलं, तिथं आबांनी पाणी असल्याचं सांगितलं व तिथं खरंच पाणी लागल्याचं मी पाहिलं आहे. पण आता मी बी. डी. ओ. आहे, मला जी. एस. डी. ए. चा सल्ला धुडकावता येणार नाही - तर ही पाहातो काय करायचं ते!'

 सभापतींना अभयनं ही बाब एकदा चर्चेच्या ओघात सांगितली. तर सभापती हसून म्हणाले, 'मला माहीत आहेत आबा गुरुजी - ते पाणीवाले गुरुजी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते म्हणताहेत तर रिस्क घ्यायला हरकत नाही.....!',

 अभयनं आकाशवाडीच्या तळ्यात 'इनव्हेल बोअरिंग घेण्याचा निर्णय घेतला आणि तिथं बोअरिंग मशिन येऊन दाखल झाली.

 कामाला प्रारंभं करण्यापूर्वी सरपंचांनी सुनंदाला बोलावून घेतलं. 'पोरी इथं आलीस ते सकुन घेऊनशानी - तुच नारळ वाढव इथं बोअरिंग होण्यापूर्वी...

 तिनं हात जोडून, डोळे मिटून देवाचं स्मरण केलं. आणि नारळ फोडला तिच्या डोळ्यापुढे कृष्णामाई होती!

 जवळपास दीडशे फुटावर खडक फोडून जमिनीचा वेध घेतल्यावर बोअरिंगवाल्यानं जाहीर केलं, 'चमत्कार म्हणायचा हा! इथं चांगलं तीन ते साडे इंच पाणी लागलंय....!'

पाणी! पाणी!! / ७६
 पुन्हा एकदा गाव आनंदानं बहरून आलं.

 पाणी खेचण्याची कुप नलिका बसवली गेली. पुन्हा एकदा सरपंचांनी सुनंदाला हुकूम सोडला, ‘पोरी, - पयल्यांदा तूच खेच पंप आणि पानी आलं की, न्हाऊन पूजा कर. सदा, तुम्ही जोडीनं उभं राहा.... हे - सारं, पोरी तुझी पुण्याई म्हणायची.... तुझ्यामुळेच गावची पाणीटंचाई कमी होतेय....!'

 सुनंदानं पंपानं पाणी खेचायला सुरू केलं आणि दोन - चार खेचण्यातच तोंडावाटे भळ्ळकन पाण्याची सोंडेएवढी धार बाहेर पडली....!

 मग सदानं पंप खेचून तिला सबंध गावासमक्ष सचैल स्नान घडवलं साऱ्यांच्या नजरेत तिच्याबद्दल आदरभावच होता.

 दोघांनी ओलेत्यांनी त्या इनव्हेलपंपाची विधिवत पूजा केली.

 ‘कृष्णामाई, मी माहेरी येईन तेव्हा तुला खण - नारळाची ओटी वाहीन. तुझ्या अमृतमय पाण्यावर हा देह वाढला, मोठा झाला.....' सुनंदानं हात जोडले होते, ‘वाटलं होतं, मी तुला लग्नानंतर पारखी झाले - पण नाही कृष्णामाई तू माऊली आहेस माझी. इथं खडकातही तुझी कृपा मला सचैल न्हाऊ घालतेय... तुझी अमृतधार देतेय!'

☐☐☐




खडकात पाणी / ७७
पाणी! पाणी!! / ७८

6s.