चिमुकली इसापनीती/देव आणि उंट

विकिस्रोत कडून

एकदा उंटाने देवाजवळ तक्रार केली की, देवा, तू बाकीची जनावरे किती चांगली केली आहेस; कोणाला नखे दिली आहेस, कोणाला सुळे दात दिले आहेस आणि कोणाला शिंगे दिली आहेस, यामुळे ती जनावरे आपापले रक्षण करितात; पण मला तेवढे काहीच दिले नाहीस; मग मी आपले रक्षण कशाने करावे? बरे तर देवा, मला निदान शिंगे तरी दे.देवाने सांगितले की, बाबा रे, तू चांगला मोठा आहेस. तुला पाहूनच दुसरी जनावरे भिऊन पळून जातील; तुला शिंगे काय करावयाची आहेत? देवानी अशी समजूत घातली; पण उंट आपला हेका सोडीना. अखेर देवाला कंटाळा आला तरी उंटाची कुरकूर चाललीच होती, हे पाहून देवाने उंटाला शिंगे तर दिली नाहीतच; पण मूळचे उंटाचे मोठाले कान बरीक कापून टाकले. उंटाचे कान लहान असतात याचे कारण हेच. मुलांनो, हा अधाशीपणाचा परिणाम बरे! यासाठी नेहमी समाधानाने रहावे.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.