चतुःश्लोकी भागवत/हरिकृपा

विकिस्रोत कडून

जंव हरी हदयीं कृपा न करी । तंव अनुताप नुपजे शरीरीं । त्याची पूर्ण कृपा ज्यावरी । तो विषयीकांकुरीं वीतरागी ॥७२॥
विवेकाविण वैराग्य उठी । तें अपायीं घाली कडेकपाटीं । कीं वैराग्यविण विवेक उठी । तो जन्मला पोटी नपुंसक ॥७३॥
विवेकाविण वैराग्य आंधळे । वैराग्याविण विवेक पांगुळें । हें एकएका अवेगळें । झाल्याविण नकळे परमार्थ ॥७४॥
जे कृष्णकृपा पूर्ण घडे । तै विवेकवैराग्य समपाडें । हदयी वाढती वाडेंकोडें । तै ब्रह्म आतुडे तत्काळ पूर्ण ॥७५॥
वैराग्यविण जे स्थिती । त्यांतें गिळी विषयशक्ती । विवेकहीन वैराग्यस्थिती । ते जंतू पडती अंधत्वें ॥७६॥
जें कृष्णकृपा पूर्ण आकळें । तें विवेक वैराग्य एके वेळे । जें हदयी वाढे प्रांजळें । तें परब्रह्म लोळे दोंदावरी ॥७७॥
तेणें श्रीनारायणें आपण । ब्रह्मयावरी कृपा केली पूर्ण । कमळासनीं बैसोनि जाण । झाला विवेकसंपन्न वीतरागी ॥७८॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.