चतुःश्लोकी भागवत/ब्रह्मदेवाची कथा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

आदिकल्पाचिये आदीं । एकार्णवजळामघी । ब्रह्मा झाला जडमूढबुद्धी । सृष्टिसर्जनविधि स्फुरेना ॥३२॥
यापरी केवळ अज्ञान । नाभिकमळीं कमळासन । विसरलां आपणा आपण । मी हें कोण स्फुरेना त्या ॥३३॥
यालागीं श्रीनारायण । द्यावया निजात्म शुद्ध ज्ञान । आपुली निजमूर्ती चिदधन । तिचे दर्शन देऊं पाहे ॥३४॥
श्रीनारायणाची दिव्य मूर्ती । देखतांची स्फुरे स्फूर्ती । तोचि इतिहास परीक्षिती । ज्ञानगर्भ स्थिती शुक सांगे ॥३५॥
अज्ञानें जीवा जीवभाव । त्यासि द्यावया निजात्म ठाव । शुक सांगे सुगम उपाव । इतिहास पहाहो हरिविरंचींचा ॥३६॥
जें श्रीमुखें श्रीभगवतें । सांगीतलें विधातयातें । संतोषोनि उत्तम वृत्तें । निजरुपातें दावोनि तेणें ॥३७॥
जीवासी दृढ देहबुद्धी । भगवंतहि देहसंबंधी । तै त्यांचे भजने मोक्षसिद्धी । नघडे त्रिशुद्धि जीवासि या ॥३८॥
ऐसी उठों पाहे आशंका । तेविषयीचे उत्तर आइका । जीवा आणि जगन्नायका । देहसमत्व देखा नघडे ॥३९॥
जाति पाहतां दोन्ही दगड । परी रत्नगार नव्हे पडिपाड । तेवीं देवाजीवा समत्व दृढ । हें केवळ मानिती मूढ न ज्ञाते ॥४०॥
धूम्र ज्वाळा पाहतां दोन्ही जन्मती एके स्थानी । तम निवारे ज्वाळांपासुनी । धूमा नमानी तम दाटे ॥४१॥
जीव ज्ञानस्वरुप सत्य ज्ञानी । परी तो झाला देहाभिमानी । ज्ञान वेंचलें विषयध्यानीं । यालागी दृढबंधनीं तो पडला ॥४२॥
आपणियाचि सारिखा देख । हरि मानी पंच भौतिक । त्या परममूर्खातें देख । आकल्प दुःखसरेना पैं ॥४३॥
ऐसेहि जे जडमूढ मूर्ख । भावार्थे झाल्या भजनोन्मुख । त्यांचें निःशेष झडे दुःख । ते निजात्मसुख पावती देखा ॥४४॥
भगवद्देह चैतन्यघन । तेथें वसेना देहाभिमान । यालागी करितां त्याचें भजन । अज्ञान जन उद्धरती ॥४५॥
आनंदोनि बोले शुकमुनी । परीक्षिती भक्तशिरोमणी । जो निजदेहीं निरशिभानी । तो मी मानी परमेश्वर ॥४६॥
जो निः शेष निरभिमान । त्याचा देह तो चैतन्यघन । त्याचे करितां भजन । जडमूढ जन उद्धरती ॥४७॥
निरभिमानाहोनी परता । ठाव नाहीं गा परमार्था । तो तैच ये आपुल्या हाता । जें अनन्यता हरिभक्त ॥४८॥
हा मुख्य भगवंत भजतां । जीवासी केवी उरे अहंता यालागीं भजनीं मुक्तता । जाण तत्त्वता परीक्षिती तूं ॥४९॥
भगवद्देहाचें श्रेष्ठपण । विशेषेंसी अतिगहन । त्या देहाचें होतां दर्शन । जडमूढ जन सज्ञान होती ॥५०॥
ऐसें निजदेहाचें लक्षण । जाणोनियां नारायण । हरावया ब्रह्मयाचें अज्ञान । निजात्मदर्शन देऊं इच्छी ॥५१॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.