चतुःश्लोकी भागवत/तप आरंभिलें

विकिस्रोत कडून

कामक्रोधनिरसनार्थ ब्रह्मदेवानें तप आरंभिलें
मनुष्याचा जो जाणिजे मास । तो देवांचा एक दिवस । ऐसी संख्या सहस्त्रवरुष । तपसायास करी ब्रह्मा ॥१५॥
ऐसी सहस्त्ररुषेंवरी । ब्रह्मया कमलासनी तप करी । त्याच्या तपाची थोरी । व्यासमुनीश्वरीं वर्णिली ॥१६॥
हे आदिकल्षींची जुनाट कथा । होय श्रीव्यासचि वक्ता । तेणें आणोनियां वेदार्था । यथार्थ वार्ता निरुपिली ॥१७॥
तीच श्रीशुकें परीक्षिती । निरुपिली कृपामूर्ती । या विंरिचीचीं तपप्राप्ती । उत्कृष्ट स्थिती अवधारा ॥१८॥
तपः प्रभावानें ब्रह्मदेव अंतर्ब्राह्य बदलला
ब्रह्मा कमलासनीं तप करी । नवल त्याचे धारिष्टाची थोरी । नानाइंद्रियविकारी । परी झाला अविकारी निजनिष्ठ ॥१९॥
शमदमांचेनी निजमेळें । जिंतिले मनपवनांचे उल्लळे । इंद्रियांचें अपार पाळे । तेणें तपोबळें आक्रमिले ॥२०॥
मन अमन पाहों आदरिलें । तंव तें चंचलत्व विसरलें । चित्त विषयचिंते मुकलें । चित्ती विषयचिंते मुकलें । चित्तीं चिंतलें चैतन्य पैं ॥२१॥
बुद्धीनें दृढबोध धरिला । तेथें अहंकार कांपिन्नला । तेणें सोहंभाव बळकावला । तेव्हां प्राण परतला दचकोनी ॥२२॥
देही दशधा धांवत होता । तो एकवटुनी आंतौता । धरुनि सोहंचा सांगाता । पश्चिमपंथा चालिला ॥२३॥
यापरी मनपवनांसी । जिंतिलेंसें निजनिष्ठेसी । तंव बहिरिद्रियांसी । दशा आपैसी बाणली ॥२४॥
डोळ्यां डोळे देखणें झालें । तेणें दृश्याचें देखणें ठेलें । श्रवण अनुहतध्वनी लागले । तंव शब्दा वरिलें निः शब्दें ॥२५॥
स्पर्शे स्पर्शावें जंव देही । तंव देही देहत्व स्फुरण नाहीं । देहींच प्रगटला विदेही । तेथे स्पर्शे कार्ड्र स्पर्शावें पै ॥२६॥
चित्कळा वोळली वोरसें । गोडी रसनेमाजी प्रवेशे । रसना लाजे विषयतोषें । सर्वांग तेणें रसे अतिगोड ॥२७॥
घ्राणी घेऊं जातां गंधासी । प्राण चालिला पश्चिमेसी । मार्गे कोण सेवी गंधासी । एवं विषयाची विरक्ति स्पष्ट ॥२८॥
मनाची गति थांबून तें निर्विषय झालें
मन इंद्रियद्वारें विषयी धांवे । त्यासी प्रत्याहार लाविला सवें । यालागीं तें जीवेंभावें । झालें निजस्वभावें निर्विषय ॥२९॥
ज्ञानेंद्रियें जिंकिली ऐसी । तें कर्मद्रियांची स्थिति कैसी । तेंही सांगेन तुजपाशीं । ऐके राजर्षि नृपवर्या ॥३०॥
जेवीं धूर जिंकिलिया रणी । कटक जिंकिले तेचिक्षणीं । तेवीं मनोजयाची बांधावणी । तोचि करणीं सर्व विजय समजे ॥३१॥
विजय बांधावा राजद्वारीं । तंव गुढिया उभविजे घरोघरी । तेवी मनोजयाची थोरी । तेंचि इंद्रियद्वारी नांदत ॥३२॥
वाचा वदली सत्यासत्य । तिसी रामनामें दिलें प्रायश्चित । वाच्यवाचक स्फुरेना तेथ । वाचा स्फुरत तच्छक्ती ॥३३॥
जें भेटोंनिघे मना मन । तैं हात मोकळे संपूर्ण । तेव्हां क्रियेमाजी अकर्तेपण । आपुलें आपण हातावरी ॥३४॥
क्रिया रतली चिच्छक्ती । तेणें ज्ञानगम्य चरणांची गती । तेव्हां गमनप्रत्यावृत्ती । समाधान स्थिती आसनस्थ ॥३५॥
यापरी जिंतूनी चरण । दिव्यसहस्त्र वरुषें जाण । द्रुढ घालूनियां आसन । प्राणापान वश्य केले ॥३६॥
मनी कामाचा अतिसाटोप । तेणें खवळला उठी कंदर्प । तें मन चिती जैं चिद्रूप । तैं कामकंदर्प असतांच नाही ॥३७॥
मन चिद्रूप झाल्यावर कामभावना संभवतच नाहीं
जेथे मन असे इंद्रिये उरलें । तेथें कंदर्पाचें चालोंशकलें । चित्त चिद्रूपध्यानी गुंतलें । तैं कांही नचले काम कंदर्पाचे ॥३८॥
देखोनी रंभेचा साटोप । शुकापोटी नुठे कंदर्प । ज्याचे हदयी नुठे कामसंकल्प । तो निर्विकल्प सर्वागीं ॥३९॥
काम तापसांचा उघड वैरी । मन जिंकोनेणे त्यातें मारी । जे गुंतले चिदाकारी । त्यांचे तोडरी अनंग रुळत ॥४०॥
गुदेंद्रियाचा स्वभाव क्षर । तंव ध्यानबळें साचार । क्षरी प्रगट होय अक्षर । क्षराक्षर नुरवुनी तेथें ॥४१॥
ज्ञानकर्मेंद्रियें दाही । अकरावें मन ते ठायी । यापरी उभयेंद्रियें पाही । जिंतूनी दृढदेही तो झाला ॥४२॥
अंतरीं निग्रहू दृढ केला । शम शब्दें तो वाखाणिला । बाहयेंद्रिया नेम केला । तो दन बोलिला शास्त्रसी ॥४३॥
हदयीचेंनी विवेकमेळें । वैराग्याचे अनुतापबळें । शमदमाचेनी निखळें । तप प्रांजळें दृढ केलें ॥४४॥
परी तैं तप जाहून कैसें । लोक प्रकाशे निजप्रकाशें एवढी महिमा आली दशे । त्रैलोक्य भासे त्या तपामाजीं ॥४५॥
ऐसा निष्ठेचा निजप्रताप । तेणें तप जाहलें सफळरुप । ब्रह्मा जाहला सत्यसंकल्प । तपवक्त्याचें रुप देखोनियां ॥४६॥
यालागी सफळदर्शन । विरिंचीचें तें तपाचरण । आच रला निजांगें जाण । ब्रह्मा आपण नेमनिष्ठा ॥४७॥
तपाचे निजनेंमेंसी कष्ट । साधिले स्वनिष्ठें चोखट । यालागी तो अतिश्रेष्ठ । जाहला वरिष्ठ तपस्व्यांमाजी ॥४८॥
देखावें तपवक्त्याचें रुप । ऐसा ब्रह्मयाचा पूर्वसंकल्प । यालागी बैकुंठपीठदीप । कृपाळू सत्यसंकल्प स्वरुप दावी ॥४९॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.