चतुःश्लोकी भागवत/गुरुचें लक्षण

विकिस्रोत कडून

शिष्यें करावें माझें भजन । ऐसें वांछी जरी गुरुचें मन । तो गुरुत्वां मुकला जाण । अभिमानें पूर्ण नागवला ॥९५॥
जगीं दाटुगा ज्ञानाभिमान । धनालागी विकती ज्ञान । ते जाण शिश्नोदरपरायण । तेथ अर्धक्षण ज्ञान नथारे ॥९६॥
मुख्यत्वें गुरुचे लक्षण । ज्ञान असोनि निरभिमान । सर्वांगी शांतीचें भूषण । तो सदगुरु पूर्ण परब्रह्म ॥९७॥
त्या सदगुरुची निजभक्ती । सद्भावें करुनि प्रजापती । पावला स्वस्वरुपप्राप्ती । स्वानंदस्थिती निजबोधें ॥९८॥
यापरी चतुरानन । नारायणवचनें जाण । सांडूनि देहाभिमान । ब्रह्म परिपूर्ण स्वयें जाला ॥९९॥
येवढें पद प्राप्त जालें । परी न ह्नणे नवें आजि आलें । अनादिसिद्ध आपुलें । स्वतः सिद्ध संचलें रुप माझें ॥७००॥
ऐसे अनुभावाचे पूर्णोदगार । जाणोनि सुखावे उपेंद्र । जैसा देखोनियां पूर्णचंद्र । भरितें समुद्र उल्हासे ॥१॥
बालका कीजती सोहळे । तेणें माउलीचे निवती डोळे । तेवीं शिष्य निजबोध आकळे । तव सुखाचे सोहळे सदगुरुसी ॥२॥
सेवक परचक्र विभांडी । राजा हर्षाची उभवी गुडी । शिष्य स्वानंदीं दे बुडी । तेणें सुखोर्मी गाढी सदगुरुसी ॥३॥
तेणें सुखें नारायण । चारी भुजा पसरोन । आलिंगिला चतुरानन । परमानंदें पूर्ण सुखावोनी ॥४॥
आधींच प्रीती पुत्रावरी । तोही जाला ब्रह्माधिकारी । तेणें पूर्णानंदें श्रीहरी । निजहदयावरी आलिंगी ॥५॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.