करुणादेवी/शिरीषचे प्रयाण

विकिस्रोत कडून
शि री ष चे
प्र या ण

♣ * * * * * * ♣







 शिरीष करुणेची समजूत घालीत होता. परंतु तिचे अश्रू थांबत ना. “करुणे, किती रडशील ! जाण्याशिवाय गत्यन्तर नाही. पुढे मी तुला नेईन. सुखी करीन.”

 “ पुढे काय होईल, कोणास माहीत ? मोठ्या शहरात मोह असतात. शिरीष, मी खेडवळ. मी तुला मग आवडणार नाही. मुख्य प्रधानाची बायको मी शोभणार नाही. माझ्यामुळे तुला कमीपणा येईल. मला न्यायची तुला लाज वाटेल.”

 “ माझ्यावर तुझा विश्वास नाही का ? तुझे प्रेम का मी विसरेन ? तुझे प्रेम बळकट असेल तर ते मला ओढून आणील. ते आपली ताटातूट करणार नाही. उगी. आता उजाडेल. चल, आपण बागेत जरा फिरू. ”

 दोघे बागेत गेली. एक सुगंधी फूल तोडून करुणेने शिरीषला दिले आणि शिरीषने एक फूल तोडून तिच्या केसात खोवले. इतक्यात मित्र प्रेमानंद आला.

 “ ये; प्रेमा, ये.” शिरीष म्हणाला.

 “ शिरीषला नका हो जाऊ देऊ. तुम्ही त्याचे मित्र. शिरीष माझे ऐकत नाही. परंतु तुमचे ऐकेल. सांगा त्याला.” करुणा केविलबाणे म्हणाली.

 “ पत्नीपेक्षा का मित्राचे प्रेम अधिक असते ?” प्रेमानंद हसून म्हणाला.

 “ हो. मित्र सर्वाहून जवळचा.” ती म्हणाली.

 “ करुणे, तू खुळी आहेस. ” शिरीष म्हणाला.  “ खुळ्या बायकोला तू कशाला उद्या नेशील? खरे ना हो, प्रेमानंद ? प्रधान झाल्यावर शिरीष मला नेईल का ?”

 “ नेईल. त्याने न नेले तर तुम्ही जा.”

 “ त्याने घालवले तर ?”

 “ राजाजवळ दाद मागा.”

 “ पतिपत्नीची ताटातूट करणारा राजा न्याय थोडाच देईल ?”

 “ करुणे, राजा यशोधर थोर आहे. पुण्यश्लोक राजाला नावे नको ठेवूस.”

 “ प्रेमानंद, मी तर आता जाईन. माझ्या वृद्ध आईबापांची तू काळजी घे. करुणा आहेच. ती त्यांचा सांभाळ करील.परंतु तुझेही लक्ष असू दे. तुम्ही दोघे आहात. म्हणून मला चिंता नाही. करुणे, त्या उगवत्या सूर्यनारायणास साक्षी ठेवून शपथ घे, की सासूसासऱ्यांची मी सेवा करीन.”

 “ शिरीष, शपथ रे कशाला? तुझा शब्द मला वेदवाक्य. आणि मी कधी तरी त्यांची अवज्ञा केली आहे का ?”

  “ तरीही शपथ घे.”

 “ घेते हो. ‘उगवत्या सूर्यनारायणा, तू जसा कधी उगवायचा चुकत नाहीस, त्याप्रमाणे मी सासूसासऱ्यांची सेवा करायला कधी चुकणार नाही. तुझी शपथ. जर मी शपथभ्रष्ट झाल्ये तर तू माझे भस्म कर !' झाले ना शिरीष समाधान ? ”

 इतक्यात घोडेस्वार आले. शिरीष करुणेसह घरी आला. प्रेमानंद बरोबर होता.आईबाप रडू लागली.

 “ आई, नको रडू. बाबा रडू नका. करुणा तुमची काळजी घेईल. सारे मंगल होईल.” शिरीष म्हणाला.

 “ बाळ, पुन्हा कधी रे भेटशील ? कधी दिसशील ?” माता म्हणाली

 “ सुखदेव, सावित्रीबाई रडू नका.शिरीष मोठा होईल. प्रधान होईल. आपल्या गावाचे नाव होईल. शिरीष, प्रधान झाल्यावर गावाला विसरू नकोस हो !” शेजारी म्हणाले.

 “ नाही विसरणार. माझ्या आईबापांना सांभाळा, करुणेला मदत करा. ” तो म्हणाला.  “ काळजी नको करू.” लोक म्हणाले.

 आईबापांच्या पाया पडून व करुणेचा आणि प्रेमानंदाचा निरोप घेऊन शिरीष निघाला. तो घोड्यावर बसला. गेले घोड़े. शिरीष मागे वळून पाहात होता. गेले घोडे. वाऱ्यासारखे गेले. लोक आपापल्या घरी गेले. सुखदेव व सावित्री घरात आली. करुणा घरात आली. ती रडत होती.

 “ करुणे, रडू नकोस.” प्रेमानंद म्हणाला.

 “ मी एकंदरीत दुर्दैवीच आहे !” ती म्हणाली.

 “ करुणे, अशुभ मनात आणू नये.” तो म्हणाला.

 “ परंतु येते त्याला काय करू ?” ती म्हणाली.

 “ कर्तव्य करणे एवढे आपले काम.” असे म्हणून प्रेमानंद निघून गेला.







शिरीषचे प्रयाण * १९