आपले आभाळ पेलताना/तीन गज की ओढनी....

विकिस्रोत कडून

तीन गज की ओढनी....


 वयाची पन्नाशी उलटून गेली तरी माहेरच्या दिशेने ओढ घेणारे मन कधीच वयस्क होत नाही. आईवडिलांच्या निर्व्याज प्रेमाची शाल.. त्यांचा सहवास पन्नाशी उलटेपर्यंत लाभला. तर, माथ्यावरचे केस चंदेरी झाले तरी अंगभर बालपण हुंदडत राहाते. मी त्या बाबतीत भाग्याची. कालपरवापर्यंत आई-पपा होते. त्यांना भेटायला धुळ्याला जाताना, तिरवीच्या तलावाभोवतालचा हिरवा डोंगर लागला की माझे मन थेट घराच्या पायऱ्या चढत असे. भर उन्हाळ्यातही खानदेशी गरम वारे तनामनातला वसंत फुलवीत. आई खूप आजारी होती. मी पळतच तिथे पोचले. चार दिवस निवांतपणे राहिलं. माता माहेरी गेले बने बाजारात भटकणे आलेच. बॉम्बे कटपीस सेंटर हे आमचे गेल्या २०/२५ वर्षांपासूनचे लाडके दुकान. तिथे जाऊन तऱ्हेतऱ्हेच्या कापडाचे तुकडे सरकवण्यात नि त्यातून हवे ते तुकडे निवडण्यात दोन तास दहा मिनिटांगत अपुरे पडत. त्याही दिवशी पाय त्या दुकानाकडे वळले. पण दुकानाचा बाज आता पार बदलला होता. कटपीसचे दुकान - एका तुकड्यात वसवले होते आणि उरलेल्या मोठया भागात तयार कपड्यांचा देखणा विभाग थाटाता उभा होता. सुरेख झगे दिसाले म्हणून आत शिरले. एक झगा न्याहाळते आहे तोच खूप आनंदाने रसरसलेली हाक ऐकू आली. 'भाभी !! दीदी !! तुमी ? कवा मालात ?..' माहेरच्या अंगणात मला भाभी म्हणणारी कोण असा विचार करीत आवाजाच्या दिशेने नजर टाकली तर काजळभरल्या डोळ्यांची टवटवीत नंदा मला हाक देत होती. काही उमजायच्या आत धावत येऊन कडकडून भेटलीही नि तेवढ्या गर्दीत 'पाँव लागू' ही झाले. मग अंबाजोगाईतील सर्वांची खुशाली विचारली. नंदाच्या आवाजातला नम्र गोडवा खूप खूप दिवसांनी ऐकायला मिळत होता. तोच गोडवा दुकानाच्या मालकांना विचारीत होता.

 'पिताजी, या भाभी, माझ्या दीदी पण, अंबाजोगाईतल्या भाभी. यांच्याच संस्थेत मी शिवण, भरतकाम, पिको..फॉल लावायला शिकले. आपले वकील आहेत ना, प्रकाश भाऊ? त्यांची मोठी बहीण. मी त्यांना घरी नेऊन आणते. तासभर सुट्टी देता ? संध्याकाळी जास्त थांबेन ?' आता कोणते पिताजी या भावूक विनंतीला नकार देगार?

 सुमारे पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. धुळ्याहून, तेथील महिला संस्थेस,
त्यावेळी सहकार्य करणाऱ्या वकील महिलेचे पत्र आले होते. नंदा नावाच्या तीन चिमुकल्यांची आई असलेल्या परित्यक्तेला, शिवण प्रशिक्षणासाठी दिलासा घरात प्रवेश हवा होता. धाकट्या मुलाला घेऊन ती येणार होती. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध जीव झोकून काम करणाऱ्या विजयाताईच्या संस्थेतून येणारी महिला नक्कीच अडचणीत असणार. तिला पाठवून देण्याबाबत तात्काळ पत्र पाठवले. एका संध्याकाळी नंदा छोट्या केतनसह दिलासा घरात दाखल झाली.

 नंदा जेमतेम पाच फूट उंचीची. नाजूक चणीची. मासोळीच्या आकाराचे काजळभरले डोळे. भांगात सिंदुराची ठाशीव सरळ रेघ. माथ्यांवर पदर. पायात छमछमणाऱ्या घुंगराच्या बिछुड्या म्हणजे जोडवी. बोलण्या-चालण्यात गरब्याचा अदृश्य ठेका.

 'प्रणाम दीदी. माधुरीताईने लेटर दिया है. घरमे सब खुशहाल है. केतन दीदी को प्रणाम करो..' अस म्हणत तिने केतनला माझ्या पायावर आडवा घातला. गंगामावशीला प्रणाम केला. नंदाच्या बोलण्यातला गोडवा पहिल्या क्षणीच सर्वांना भावून गेला. प्रत्येक प्रांताचे, भाषेचे, समाजाचे काही पारंपारिक वेगळेपण असते. नंदाच्या वागण्याबोलण्यातून ते जाणवत असे.

 धुळ्याच्या सातव्या गल्लीतील हनुमान मंदिराचे पुजारीपण परंपरेने तिच्या वडिलांकडे आले होते. मंदिराच्या भवताली गुजराथी मारवाड़ी समाजाची वस्ती. भाविक लोक देवाला रोज काही ना काही उपहार चढवीत. साणवार व्रतांची उद्यापने यासाठी सन्मानाने जेवायला बोलवीत. नेहमीच गोडाधोडाचे जेवण, चांगले कपडे आणि पुजारीबाबांची मुलगी म्हणून चारजाणीत विशेष मान. तिला पूजापाठ सांगता येत असे. कोणत्या विधीसाठी काय सामान लागते ते माहीत असे. स्तोत्रं सुरेख म्हणत असे. लग्नात वा इतर संस्काराचे वेळी म्हणायची गाणी येत. ती सातवीत असतांनाच नहाण आले. पुजारीबाबांनी जावई शोधण्याची मोहीम सुरू केली. मुळात पुजारीपण करणाऱ्यांची जात लहान. खात्यापित्या घरी लेक जावी हा आईचा हेका. सुरतेच्या पुराणिकांच्या घरातल्या धाकट्या मुलाशी -जीवनधरशी- नंदाचा विवाह झाला. साल होतं १९८१. जीवनधर १० वी पास होता. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या कारागिरीत तरबेज होता. दिवसाला ऐंशी नव्वद रुपये मिळत. नंदा दिसण्यात गोड. नवरा नव्या नवरीचे भरपूर लाड करी. तऱ्हेतऱ्हेच्या
साड्या, डोक्याच्या पिना, बांगड्या यांची खैरात तरी. वयाच्या सोळाव्या वर्षाच नंदा आई झाली. लग्नानंतर अवघ्या पाच वर्षात दोन मुली नि धाकट्या केतनला जन्म दिला.

 दर बाळंतपणात शरीर थकत गेले. लहान मुलांकडे लक्ष देण्यात आणि घरकामात ती एवढी अडकून जाई की नटण्यामुरडण्याकडे लक्ष द्यायला वेळच उरत नसे. घर आणि मुलं यांची देखभाल करण्यात जीव इतका गळून.. थकून जाई. मग जीवनधरच्या हौशीमौजीत सहभागी होण्याचा उत्साह येणार तरी कुठून ? - मग चिडचिड, रुसवेफुगवे, रडारड, भांडणे. त्यातूनच हाणामारी सुरु झाली. जीवनधरला पते आणि दारुची चटक लागली. तो शुद्धीवर असाला को नीट वागत असे. पण अशी वेळ कमीच, नंदाची मोठी जाऊ म्हणजे तिची सख्खी मोठी बहीण. तिच्या नवऱ्याने धाकट्या भावाला वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. वेगळे घर केले तर संसाराची जबाबदारी उचलावी लागेल आणि मग घरात गुंतेलं. बाकीचे नाद आपोआप कमी होतील असे वाटले. पाण वेगळे घर केल्यापासून नंदाचे हाल अधिकच वाढले. जुगाराबरोबर दुसराही नाद लागला. घरातले दागिने नाहीसे होऊ लागले. जीवनधर घटस्फोटाची भाषा बोलू लागला. नंदाने राजीखुशीने सही न दिली तर मुलांसह नंदाला मारुन टाकण्याचे बेत तो बोलू लागला. स्वत:च्या मुलांच्या जीवाला धोका पत्करण्याची तयारी कोणती आई दाखवेल ? नंदाच्याच भाषेत सांगायचे तर ते असे.

 "अपने पतीको वेश्याके घर तक सन्मानसे ले जाने वाली पतिव्रता या अपने लाडले बेटे को मारकर उसकी सागुती अतिथीके लिये बनानेवाली आदर्श गृहिणी पौराणिक किताबोंमेही होती है... स्वत:च्या नवऱ्याला वेश्येच्या दारात नेऊन घालणारी पतिव्रता पत्नी आणि अतिथीला पोटच्या लेकरांची भाजी करुन खाऊ घालणारी आदर्श गृहिणी पुराणातल्या गोष्टीतच भेटतात. त्या 'माणूस' नसतातच. पण माणसाचे शरीर धारण करणाऱ्या आम्ही. त्यांनी कसे अनुकरण करायचे ? नि का करायचे?"

 नंदा व तिच्या बहिणीने विचारपूर्वक निर्णय घेतला. मोठ्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी बहिणीने घेतली. धाकटा केतन आणि मधली वैशाली यांना घेऊन नंदा धुळ्याला आली. नंदाने नवऱ्याचे घर सोडून कायमचे माहेरी येणे वडिलांना पटले नाही. परंतु भाऊ आणि आई यांनी
तिची बाजू उचलून धरली. वडिलांनी जावयाला पत्र पाठवून चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. नंदाच्या भावाला त्याला आणण्यासाठी सुरतेला पाठवले. पण जावयाला पैशाची धुंदी चढली होती. तो दुसऱ्या लग्नाची भाषा अधिक जोरात बोलू लागला.

 नंदा सातवीपर्यंत शिकली होती. समज चांगली होती. स्वत:च्या पायावर उभे राहून मुलांना शिक्षण द्यावे असे तिला मनापासून वाटे. हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या कारागिरांबद्दल तिला सहानुभूती वाटे. ती म्हणे, हिऱ्याला पैलू पाडणाऱ्याला पैसा भरपूर मिळतो. पण त्या माणसाचे डोळे अर्ध्या वयातच निकामी होतात. ऐन चाळिशीत अनेकजणांना धंद्यातून बाहेर पडावे लागते. पैसा आला की बारा वाटांनी निघून जातो. वाईट सवयी पैशाच्या नावाने लागतात. मग त्यांच्या मुलांनाही तरुण वयात शिक्षण सोडून वडिलांच्या धंद्यात पडावे लागते. तिला आपल्या मुलांना या धंद्यापासून दूर ठेवायचे होते.

 धुळ्यात आल्यावर विजयाताई चौकांबद्दल तिने ऐकले. ती त्यांना भेटली. त्यांना सहकार्य करणाऱ्या वकील ताईंना ती भेटली. वडिलांच्या आटोकाट प्रयत्नांमुळे जीवनधर एकदा धुळ्याला गेला. पण त्याला दुसरीशी लग्न करायचे होते. नंदाने घटस्फोटाला मान्यता दिली तरच तो मुलांच्या नावाने दोन पाच हजार बॅंकेत ठेवणार होता. अर्थात नंदाने व तिच्या भावाने त्याला नकार दिला. पाचसहा महिने धुळ्यात माहेरी काढल्यावर नंदाही खूप अस्वस्थ झाली. तिची अडचण सामाजिक आणि मानसिक होती. भोवताली व्यापाऱ्यांची वस्ती. स्त्रियांना पुढच्या बैठकीत येण्याची परवानगी नसे. बहुदा तिथे दुकान थाटलेले असे. तिथे जाण्याचा प्रसंग दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने येणार. सुनांना तर हातभर घुंगट काढून तिथे जाता येई. लेकींची बात मात्र न्यारी. त्यांना कुठेही प्रवेश असे. त्याही सठीमासी चार दिवस येत. माहेरी मनभरुन श्वास घेऊन परत सासरी जात. तर असे हे भोवताली वातावरण. घरातल्या स्त्रियांना मोकळेपणी जाता येण्यासारखे ठिकाण म्हणजे हनुमान मंदिर. घरात भांडयाला भांडे लागून आवाज होणारच. असे आवाज झाले की सासवा नाहीतर सुना नंदाच्या आईकडे येत. निमित मंदिरात जाण्याचे. तिथे चार घरच्या चार जणी जमत. गप्पा रंगत. अर्थात गप्पा घराच्या चौकटीतल्या. हिने हे केले, तिने ते केले. ही अशी, ती तशी, कुणाचे सासरी पटत नाही, कुणाच्या नवऱ्याचं लफडं कुठे आहे वगैरे..वगैरे. अशा वातावरणात नंदा माहेरी चार महिने राहाताच, आडून विचारणे सरू झाले. "इता दिन क्यान रख्या ससुरालवालोंने ?.. ठिक
तो चाल्यो हो ना?"

 हा प्रश्न अनेकांच्या तोंडून येण्याआधीच नंदाने चारसहा महिन्यासाठी एखादा व्यवसाय शिकण्यासाठी इतरत्र जाण्याची इच्छा विजयाताई चौकांकडे व्यक्त केली. आणि त्यांनीच तिला मनस्विनी महिला प्रकल्पाच्या दिलासा घरात केतनसह पाठविण्याचा निर्णय घेतला. तिच्या केतनची जीभ थोडी जड होती. ऐकू चांगले येत असे. त्यामुळेच तो चांगले बोलू शकेल अशी आशा वाटे. केतनला उपचार करण्यासाठी परगावी नेले आहे अशी हूल उठवून नंदा अंबाजोगाईत पोचली.

 आल्या दिवसापासून ती सर्वांच्याच मनात शिरली. ती आली त्याच वेळी संस्थेच्या स्वयंपाकघरात डिझेल आणि लाकडाच्या तुकड्यांपासून तयार होणाऱ्या गॅसवर चालणारी शेगडी आणली होती. लाकडाचे तुकडे तयार करण्याच्या हात यंत्रावर काम करण्यास दिलासातील महिला तयार नसत. खरे तर ते काम युक्तीचे होते. शक्तीची गरज नसे. पण युक्ती समजावून घ्यायला लागते. त्यासाठी मन स्थिर ठेवावे लागते. ठेंगणी नंदा हे काम हौशीने आणि सफाईने करी. फॉल लावणे, पिको करणे हे काम ती सहजपणे शिकली. शिवणकाम, भरतकामात तरबेज झाली. केतनला जिभेसाठी डॉक्टरांनी विशिष्ट व्यायाम सांगितला होता. तसेच ठराविक जागी चोळायला सांगितले होते. नंदा हे सारे नियमितपणे करी. केवळ केतनकडेच नाही तर दिलासातील इतर महिलांच्या मुलांकडे ती लक्ष देई. उजव्या हाताने न सांडता, एका जागी बसून जेवावे. संडासात शी करावी. हात साबणाने धुवून पुसावेत. जेवणात पालेभाजी, कोशिंबीर, उसळी असाव्यात यावर तिचा भर असे. यामागचे कारण एकच. वर्तमानपत्र, मासिके, पुस्तके वाचण्याचा नाद. गाण्यात तर एकदम तरबेज. राजस्थानी, गुजराती लोकगीते छान म्हणायची. मराठी बोलताना अडखळे. पण हिंदी मात्र विलक्षण गोडव्याने बोले. आणि त्यामुळेच तिला मराठी गाण्यांपेक्षा "तीन गज की ओढनी" हे गाणे फार आवडे. दर बुधवारी महिलांच्या बैठकीत हे गाणे म्हटले जाणारच.

 ...तीन गज की ओढनी,
 ओढनी के कोने चार, चार दिशाओंका संसार......

 बाईचे सारे आयुष्य ३ वाराच्या ओढणीत बांधलेले. चार दिशा सुद्धा ओढणीच्या घुंगटातून दिसणार. घुंगटातली घूटन...... गुदमर बाईच्याच वाट्याला.


कोठरीके चार कोने
हर दो कोने बीच दिवार... sss

दिवार बना है घूंगट
घूंगट भीतर घूटन
घूटन भरी है जिंदगी - .....sss

ओढनी है जिंदगी
जिंदगी है ओढनी
ओढनी .... जिंदगी .....sss


हे गीत गातांना प्रत्येक कडव्यानंतर अत्यन्त उदास .. करुण स्वरातले उकार असत. गाता गाता नंदाचे डोळे वाहायला लागत. एवढे वाईट वाटतें, दुःख होतें तर कशाला हे गाणे म्हणायचे ?, असे मी म्हणताच मला नंदाने उत्तर दिले होते, "भाभी, हे गाणं म्हणताना विहिरीला पाण्याचे फुटवे फुटतात ना तसे डोळ्यातून पाणी वाहाते. पण त्यामुळे मन खूप शांत होते. काही नवे करण्याची इच्छा पण जागी होते."

 आजही खिचडी करताना मम्मीला नंदा आठवतेच. तिच्या खिचडीत वांगी नि बटाटे असणारच. कढीसाठी पीठ दळून आणताना त्यात पसाभर उडीददाणे नि वाटीभर धणे भाजून घालणारच. शिवाय फोडणीत चार मेथीदाणे टाकायला तिनेच नकळत शिकविले.

 नंदा दिलासात असतांनाच जीवनधरचे पत्र आले. पहिल्या वाक्यातच "आय लव्ह यू, डू यू लव्ह मी ?" असा प्रश्न होता. नंदाची समजूत घालण्याचा त्यात प्रयत्न होता.. दुसरी बाई सोडून गेली होती. मुलाला भेटण्याची आग्रही विनंती पत्रात होती. पण त्यातील एकाही अक्षराने नंदा विचलित झाली नाही. ती म्हणे की मी गेली ८ वर्षे या थापांना भुलले. जिवावर दगड ठेवून, मुलांच्या भल्यासाठी घराबाहेर पडले. त्याला यायचेच असेल तर
धुळयात यावे. आणि नंदाच्या कुटुंबात .... घरात राहावे. कामधंदा करावा, दारू, जुगार, पत्ते चालणार नाही. आता घर नंदाचे, तिच्या मुलाचे असेल. ही तिची ठाम भूमिका होती.

 ज्येष्ठी पौर्णिमेस नंदाचा उपास होता. मी न राहवून विचारलेच. "नंदा, आम्हाला पता न लागू देता वटसावित्रीचा उपवास करतेस. करवी चौथ केलीस. तीजेला पिंडा करून, केतनच्या हाताने तो कापून सर्वांना देतेस. मग जीवनधरकडे जायचे नाही असे का म्हणतेस ?" .......मी विचारले.

 दिलासा घरात येईपर्यंत नवऱ्याच्या जाचाला आणि माराला कंटाळलेल्या मनातही 'पती हाच परमेश्वर' हे वाक्य गोंदलेले होते. माझी बाई मला इथे येईपर्यंत जतावून सांगत होती ती, नंदू तुझ्या पतीची बुद्धी काही काळापुरती फिरली आहे. पण हनुमानजी त्याला परत ठिकाणावर आणतील. तुझा परमेश्वर पतीच. त्याला दुवा देत जा. मला कळायला लागले तेंव्हापासून, पती हाच देव आणि त्याच्या दारात, पती आगोदर मरणारी बाई सर्वात भाग्यवान हेच ऐकलेले. जोरात बोलले वा दणदण पाय वाजवीत चाललं की बाई ओरडे....ए हलक्या आवाजात बोल. सासरी अशी वागलीस तर आमची अब्रू बाहेर टांगशील.... पापड आवाज न करता, तोंडातल्या तोंडात खायचा. शिळी भाकरी आवडीने खायची. जाता येता खायचे नाही. या साऱ्या गोष्टी तिने लहानपणापासून शिकवल्या. थेंबभर दुधाचा चहा अधूनमधून प्यायला लावी. का तर हालाची आताच सवय व्हावी.

 ....मेंदूचा डबा बुडाशी भरलेला असतानाच झाकण गच्च बसवून टाकले. तो डबा कधी भरलाच नाही. पण इथे दिलासात आल्यापासून क्षणोक्षणी विचार करायला शिकले. मोर्चात सामील झाले. जगात काय घडतय, देशात काय घडतंय हे वाचण्याची संधी मिळाली. मला वाचनाची खूप आवड. पण पुडीचा कागद वाचूं लागले तरी पिताजी रागवत. शिकलेल्या बाईचा संसार चांगला होत नाही असे ते म्हणत. पण इथे आल्यावर मेंदूच्या डव्याचे झाकण कधी मोकळे झाले आणि उघडले ते कळलंच नाही. माझ्यापेक्षाही दुःखी, अडचणींना व अत्याचारांना बळी पडलेल्या मैत्रिणी भेटल्या. त्यांच्याकडे पाहून माझे दुःख फिके वाटू लागले आहे. त्या परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत माझ्यात आली. स्वत:च्या कष्टाने घर
उभारण्याची जिद्द उभारली.

 ....पण तरीही ... भाभी, लहान वयात झालेले संस्कार.... तेव्हा मिळालेली शिकवणूक अंगावर उठलेल्या फोडांसारखी असते. फोड फुटून बरा झाला तरी वण कायमचे राहातात. मनाला कितीही पटले तरी व्रत वा उपवास केल्याशिवाय आंघोळ केल्यासारखे वाटत नाही. भाभी, कुणी सांगावं, आणखीन पाचदहा वर्षांनी हे वणही साफ होतील.

 एवढे रामायण घडून गेल्यावर, मी जेव्हा नव्याने घर उभारीन ते माझे नि मुलांचेच असणार. मुलांच्या पप्पांनी यायचे तर जरुर यावं. पण, माझ्या घराच्या चौकटी मान्य करून. एकोणनव्वदच्या अखेरीस आलेली नंदा नव्वदच्या ऑगस्ट मध्ये बोलणाऱ्या केतनला घेऊन माघारी धुळ्याला गेली. आज तिचे घर उभे आहे. जीवनधरला त्या घराच्या भिंती भावल्या नाहीत. तो त्या घरात आला नाही. आज नंदा दुकानात काम करते. उरलेल्या वेळात फॉल पिकोचे काम करते. अधूनमधून पत्र येते. त्यात लिहिलेले असते,
"मेरा और केतन का ऑल मानवलोक फॅमिली को धुलीया से अंबाजोगाई तक साष्टांग प्राणाम पहुँचे. मेरे घर आना.

बीच मे है देवल, आजू बाजू मे गुलदस्ते
खत लिखना समाप्त हुआ, फिरसे कहेती नमस्ते...."

आपकीही नंदा. 


नंदासारख्या हजारो... लाखोजाणी. ओढणीच्या घूटनमध्ये गुदमरणाऱ्या. त्यांना त्यांचे घर, जे त्यांच्या जोडीदाराचेही असेल, ते कधी मिळणार?