आपले आभाळ पेलताना/उगवाईच्या दिशेने जाणारी शांतू.

विकिस्रोत कडून
उगवाईच्या दिशेने जाणारी शांतू.


 "ताई बाहेर या s s " अशी हाक ऐकून आले. तर दारात पोस्टमन दादा उभे. मनात आले. कुणाचे नॉट पेड पत्र आले ? को चक्क धनलाभ ? ... मनिऑर्डर ?

 पोस्टमन हातात कार्ड घेऊन अगदी हसऱ्या उत्सुकतेने माझी वाट पाहात होता. मी दिसताच म्हाणाला, 'बाई तुमच्या मनोशिनी लेकीचं, दस्तुरखुद्द हातांनी लिहिलेलं टपाल आणलंय. चहाचं इनाम हवं, मुद्दाम शेवटी आलोय इथं'

 हा पोस्टमन माझा विद्यार्थी आहे. हे इनाम थंडीच्या गारठ्यात हक्कानी मागाणारच तो! पत्र होते शांतूचे. लोणावळ्याहून आले होते. शांतूच्या अक्षरातले. "शयीला ल्लया, मनोशिनी, अंबाजोगाई." आणि त्या खाली नवशिक्या विद्यार्थ्याची टीप. 'हे पत्र भाभीजवळ जरुर पोचवणे' अशी.

 चहा घेऊन पोस्टमन गेला. मला मात्र आनंद लपवता येईना. मीही पत्र हातात घेऊन 'मनस्विनी' कडे सुटले.

 शांता आमच्या 'दिलासातली पहिली कन्या.' चौऱ्याऐंशीच्या एप्रिलमध्ये दिलासाची रीतसर सुरुवात झाली. दिलासाघर जानेवारीत सुरु झाले तरी त्यात यायला कोणी तयार होईना. घरातून हाकलून दिलेली मुलगी नदीचा डोह जवळ करील, स्वत:ला पेटवून घेईल किंवा झाडाला टांगून घेईल. पण एखाद्या संस्थेत जाणे कमीपणाचे वाटत असे. आजही थोडीफार स्थिती तशीच आहे. दिलासा घर सुरू झाल्यावर आम्ही सर्वत्र निरोप दिले होते. गरजू एकाकी स्त्रियांना कायद्याची मोफत मदत देऊ, वकील लावून देऊ, तिला काही नवीन कला शिकवू ... वगैरे वगैरे, सारे तपशील भरुन, निरोप दिले होते. पण उत्तर साधारणपणे एकच असे "आमच्या गांवात आठ-दहा जणी अशा आहेत हो. पण संस्थेत जाण्यापेक्षा भावाच्या दारात कष्ट केलेले परवडतात त्यांना. भावाच्या दारात अन्नावारी मरेस्तो काम केले तरी अब्रू चार जाणात झाकलेली राहाते. संस्थेत जायचे म्हणजे चार माणसांत भावाला नि सासऱ्याला कमीपणाचे." ही अशी भूमिका सर्वांना मान्य असणारी.

 पहिले दोन तीन महिने असेच गेले आणि एक दिवस एक तरणीताठी बाई, धरधरीत नाकाची विचारीत आली. "लुह्याबाई हितचं राहातात का? मला हस्तंकीणबाईनी पाठवलीया. हाईत का घरात ? " बोलण्यातही साधासरळ रांगडे पणा होता. लोहियाबाई ती मीच, असे सांगताच पुन्हा पट्टा सुरु झाला.

 "मी शांता. तोरगावची जातीनं कुंभारीण हाय. नवऱ्यानं टाकलेल्या बायांना वकील देता म्हनं तुमी फुकतात. मला बी त्या शी भांडान धरायचं हाय. ऱ्हायला यावंच लागल का हितं ?. आठ घरी धुणी भांडी घासत्ये मी. हरेक घरी दोन इसा म्हाणजे चाळीस रुपये मिळतात. हितं फुकटात रहायला द्याल पर चोळी बांगडीला वर पैसे बी लागत्यालंच. ते देणार का? नि काम काय करावं लागेल? हस्तकीणबाईकडे बी भांडी घासत्ये मी. त्यांनी तुमचा जिम्मा ... (खात्री) दिला म्हून हितवर आले. काय त्ये लवकर सांगा. मला कामाला जायाचं हाय!" धडाक्यातले बोलणे संपले नि पाणी मीच प्याले....

 दिलासात राहाण्यासाठी येणाऱ्या महिलेला जेवण, राहाणे आदी मिळेच. शिवाय वरखर्चासाठी पंचाहतर रुपये दरमहा देत होतो. त्यामुळे शान्ताने दिलासा घरी येण्याचे ठरवले.

 दुसऱ्याच दिवशी शांता दिलासा घरात राहायला आली. उंचनिंच, थोराड बांधा, भव्य कपाळ, धरधरीत नाक, पाणीदार डोळे, चालण्यातही वेग आणि झोक. बोलण्यात शब्दांना वजन. अशी ही शांता मनाने मात्र अत्यन्त कोमल होती. ती आली नि तिच्या पाठोपाठ सोना, निर्मला आल्या. 'दिलासा घर' भरून गेले.

 शांताला ना शिवणात रस ना खडू तयार करण्यात लक्ष तिला पाणी भरणे, स्वच्छ झाडलोट करणे यात विशेष आनंद मिळे. पापड लाटण्यातही मजा वाटे. खूपदा सांगूनही शिवाणाच्या वाटेला ती फिरकली नाही. बालसदनच्या मुलींना खसखसून आंघोळ घालाणे, त्यांच्या तेल चोपडून वेण्या झालाणे यात मात्र ती मनापासून रमून जाई. चौघडीच्या पातळ चपात्या करायचे जमत नसे पण थपाथपा भाकरी थापण्यात कोणालाही हार जात नसे. शांताचे मन अतिशय नितळ, खडकातून उसळ्या मारीत वाहात
जाणाऱ्या पाण्यासारखे. बालसदनातल्या नंदा, कमल, संगीता तिच्या लाडाच्या. त्यातही नंदीवर तिची जास्त माया. नंदा भोकऱ्यासारख्या मोठ्या ...टपोऱ्या डोळ्यांची. रंग काळा कुळकुळीत. नाक सदा वाहाणारे नि भोळीशी. कमा नि संगी तिच्यावर दाब टाकीत. अशा वेळी नंदाची बाजू घेणारी शांता.

 शांता धागोऱ्याच्या कुंभाराच्या घरात जन्मली. सर्वात धाकटी. वर बरीच भावंड. आज पाच शिल्लक आहेत. गावाजवळून झरा वाहात असे. तिथून माती आणावी. त्यात घोड्याची लीद कालवावी. मळूमळून मऊसूत केलेल्या मातीचे मोठे मोठे रांजण करावेत ति कधी देवळ्याच्या तर कधी पाटवद्याच्या बाजारात जाऊन विकावेत. शांतूच्या वडिलांच्या घरी च धंदा होता. अंगावर सावकाराचा बोजा नव्हता. घरात तीन सुना आल्या होत्या. मोठ्या तिघींचे ... लेकींचे संसार रांगेला लागले होते. काळजी होती धाकट्या शांतूची. शांतू थोराड हाडाची. नाकीडोळी नीटस. पाचव्या वर्षापासून भाकरी भाजायला शिकली. बापाला वाटे की आपले हातपाय थकले. आपल्या माघारी पोरांचा कारा भरोसा ? जीव धड आहे तोवर ज्याची वस्तू त्याच्या घरात ढकलून मोकळे व्हावे. असे मनांत येतेय तोवर जावई दारात चालून आला. चार कोसावरच्या बोरगावच्या कुंभाराचा धाकटा ल्योक. लातुरात मशिनीवर कपडे शिवायला शिकत होता. सातवी पास होता. चौदा वर्षाची उमर होती. मग बैठक झाली. बैठकीत ठरले की पोरीच्या बापानी नवरा, नवरीचे कपडे द्यायचे. सहा माशाची मुदी जावयाला द्यायची नि लगीन लाउन द्यायचं. मानकरणीचं एक हिरवं इरकली लुगडं सासूला नेसवायचं. पोरगी आठाची झाली की पुढच्या तुळशीच्या लग्नानंतर लेकीचा बार उडवायचा. सारं.. काही पक्व ठरलं. शांतूला लगीन म्हाणजे छान छान कपडे दिसत. गळ्यात सोन्याची बोरमाळ. ढीगभर पाहुणे नि गोडाधोडाचं जेवण, एवढेच कळे. त्या साली पाऊस पडलाच नाही. पोळा उलटून गेला तरी आभाळ कोसळलं नाही. सारीच रानं उजाड.... रिकामी. कुंभाराचा धंदा तरी कसा होणार? कधी नाही ते सावकाराच्या दारात जावं लागलं. इकडचं तिकडचं करुन मार्गशीर्षात लगीन पार पडलं. पण सहा माशाच्या मुदीचा वायदा काही पाळता आला नाही. पटक्यात... डोक्यावरच्या फेट्यात हात बांधून शांतुचा बाप व्याह्यासमोर उभा राहिला नि विनवणी केली. लेक शहाणी झालेली नाही. शाणी झाली की नांदाया पाठवू. तवा सहा माशाची मुदी नि लोखंडी पलंग, गादी पाठवू. एवढी वेळ निभावून घ्या. सासऱ्यानं मानलं. 'सासू शहाणीसुरती बाई. त्यातून हवं तसं इरकली लुगडं मिळालं म्हणून खुशीत
होती. ती तोंडभरून म्हणाली, "ईवाईदाहा, तुमचा मान ठिवला आमी. सोईनं मुदी करा. बरीक ईस कॅरिट सोनं घाला. चौदा कॅरिट नको. आमच्या सुनला स्वारिक खोबरं खाऊ घालून, लवकर आमच्या घरी पोचती करा."

 शांतू बापाच्या घरी, धानोऱ्यातच, होती. लागोपाठ दोन वर्षे पाऊस पडला नाही. गांवातली अनेक माणसे पै-पैशासाठी.... मजुरीसाठी शहराकडे धावली. आधीच थकलेला बाप एक दिवस सकाळी उठलाच नाही. आई तर शांतूला आठवतंच नाही. बापाचाही आधार उठला. मोठा भाऊ मुंबईला गेला. गांवात धाकटा राही. एक बहीण बाळंतपणात खर्चली. तशात शांतू शहाणी झाली. भावाने सासरी सांगावा धाडला. शांतूचा मोठा दीर आईला घेऊन आला. शांतूच्या भावाने सांगितले की, तो काही सहा माशांची अंगठी मुदी करू शकत नाही. चोळी बांगडी करुन तो बहिणीची बोळवण करील. दीर मुदीचा हट्ट सोडाला. शेवटी सासू मध्ये पडली. लोखंडी कॉट नि गादी, जावयाला टॉवेल टोपी नि शांतूला लुगडं चोळी करायची. मुदीचा वायदा पहिल्या डोहाळजेवाणापर्यंत पुढे ढकलला. भावानेही बहिणीच्या नांदणुकीसाठी थोडीफार अडचण सोसून, तिची पाठवणी केली. शांतू सासू सोबत बोरगावला गेली. पण नवरा मात्र लातूरहून यायला तयार नव्हता. सासू मडकी, पणत्या, भावल्या, बैल आदी खेळणी करण्यात तरबेज होती. शांतू सासूच्या हाताखाली सारे शिकू लागली. मोठा दीरही लेकराबाळांसह पुण्याकडे मजुरीसाठी गेला होता. बोरगावात फक्त शांतू नि सासूबाई .मिळकत बरी होती. शांतूचा कामाचा आवाका जबरदस्त होता. नदीवर जाऊन माती आणणे, वनस्पती तोडणे, माती मळणे आदी सारी कामे ती जीव लावून करी. सासूही सुनेवर बेहद खुश होती. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी शांतूं सुरेख दिसू लागली. तेज चेहऱ्यावर उमटू लागले. अशावेळी गावातल्या गुंडाची नजर तिच्यावर पडणार या कल्पनेने सासू हैराण होई. शेवटी तिने एक दिवस बैलगाडी केली. लोखंडी कॉट, गादी नि शांतू यांना त्यात कोंबून ती थेट लातूरला आली. नवरा आता चांगला थोराड दिसू लागला होता. बाविशी पार केली होती. आईने लेकाला बजावले. "तुझा माल तुझ्या दारात टाकाया आले. लई दीस सांबाळलं मी. आता तू नि तुजी बायको. कायबी करा."

 असे सांगून निघूनं पण गेली. त्या रात्रीची हकीकत शांतूनं
सांगितली ती अशी.

 "भाभी मनाला लई आशा होती. भीती वाटत होती. शिनीमातला परसंग डोळ्यासमोर येई नि लाज वाटे. रातच्याला मी गोडा भात रांधला. वेणी फणी केली, डोळ्यात काजळ घातलं. कुंकवाचं बोट व्हटाला चोपडलं. पन काय सांगू ? रात्री लई उशिरा त्या दादाप्पा ढूस पिउन आला अन् मला सोन्याची मुदी काढ म्हनू लागला. मी रडाया लागले तर पलंगाच्या लोखंडी दांडीनं मरुस्तो मारलं मला. नि ढाराढूर झोपून गेला.".

 दुसऱ्या दिवशी शांतू उठली ती थेट सासूच्या दारात उभी राहिली. नंतर दोन वर्ष सासू सुना एकत्र राहात, कमवत, खात. सासूही थकली होती. शेवटी एक दिवस सासून शांतूला अंबाजोगाईला मोठ्या बहिणीच्या दारात आणून टाकले. राहीबाईला सांगितले की सांभाळ तुज्या बहिणीला. सासू दोन दिवस राहून पुण्याच्या लेकाकडे निघून गेली. शांतूच्या आयुष्याला नवे वळण लागले. नवऱ्याने मारले तरी मनात त्याच्याविषयी ओढ होती. दोघी बहिणींनी ठरविले की, शांतूने भरपूर काम करून पैसे साठवायचे. सहा माशाची मुदी नि शर्टचा पीस घेऊन नांदायला जायचे. त्यातच पाठक बाईंचे ... शाळेतील शिक्षिके काम मिळाले. शांतु विश्वासाने बाईकडे पैसे जमा करी. बहिणीचा बारदाना मोठा होता. मेहुणा शाळेत चपराशी, पण चोवीस तास दारुत बुडालेला. त्यात पेन्शनला आलेला. दोन मुकी मुलं नि चार बोलकी मुलं. असा आठजणांचा संसार. कितीही कष्ट केले तरी मिळकत पुरत नसे. तरीही दोन वर्षात हजार रुपये साठले. त्यात थोडी पाठकबाईंनी भर घातली. बहीण, मेहुणा शांतूला घेऊन लातूरला गेले. बरोबर सोन्याची मुदी होती. शर्टपीस होता. पण तिथे वेगळाच डाव मांडलेला होता. शांतूच्या नवऱ्याच्या घरात दुसरीचं बाई त्याची बायको म्हणून उभी होती. ती आई होण्याच्या रस्त्यावर होती. मुदी नवऱ्याच्या अंगावर फेकून शांतू संतापाने जळत परत माघारी आली. पाठक बाईंनी तिला मानवलोकच्या मनस्विनी महिला प्रकल्पाचा पत्ता दिला नि शांतू दिलासा घरातली पहिली मानकरीण झाली.

 शांतूने लिहायवाचायला शिकावे असा वैदेहीचा ... मनस्विनीतील संवादिनीचा नेहमी आग्रह असे. पण या बाईसाहेबाचं मन त्यात कधी रमलंच
नाही. दिलासात सहा महिने राहिल्यावर आम्ही तिची नेमणूक स्वयंपाक विभागात केली. आमच्या मम्मी... गंगामावशी आता थकल्या होत्या, त्यांचा भारही हलका होणे आवश्यक होते. त्यातून शांतूला बालसदनातील मुलांचा लळा लागला होता. ती त्यांची काळजी घेऊ शकत होती.

 शांतूची विचार करण्याची ताकद विलक्षण होती. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तिच्याजवळ तयार असे. दिलासातील महिला एका मुलीची आई होती. मुलगी मामाजवळ होती. जांबुवंतीला शरीरातील भोग छळत. बाई माणूस आहे. तिलाही शरीर वासना... भावनांची ओढ असते. संस्थेत एक तरुण वॉचमेनचे काम करी. पहाटे पाच वाजता मम्मीला जागे करून तो झोपत असे. जांबू त्याची खोली झाडायचे निमित्त करुन तिथेच रेंगाळत राही. रात्रभर जागलेल्या त्याला तिचे रेंगाळागे, वेगळ्याच नजरेने पहाणे अस्वस्थ करी. शेवटी त्याने त्याची अडचण मला सांगितली. ही अडचण डॉ. लोहियांकडे -बाबूजींकडे सांगायचा संकोच वाटला. माझ्या मनासमोर नवाच प्रश्न उभा राहिला. शरीराच्या नैसर्गिक मागण्या संपन्नतेने पूर्ण करणाऱ्यांनी कोणत्या भाषेत त्यागाच्या नि उपवासाच्या प्रतिष्ठेच्या कहाण्या सांगायच्या? मी बेचैन होते. माझी व्यथा मी शांतूसमोर मांडली. शांतूचे धडक विधान. "आन त्यात काय काळजी हो ? अन् एवढं काय मनाला लावून घेता ? ज्याच्या त्याच्या कपाळाची पाटी वेगवेगळीच लिहिली जाते."

 ..तिने जांबूला समजावले ते असे. "जांबू ! यकांदा जिलबी खाल्ली काय नि रोज खाल्ली काय तिची चव येकच की। तुज्या नसीबात रोजची आठवन आली तर चव आठवावी नि समाधान मानावं. अगं तुला तरी पोटची लेकं आहे. तुजं आजचं आयुष्य शिक्षान नाही म्हणून नासंलं. लेकीला शिकीव. पायावर हुबी कर. त्यासाठी लई कस्ट करावे लागनार. अशी इंकडे तिकडे हुंगत बसलीस तर पोरीचं जीवन बी नासून जाईल. जरा शानी हो. दिलासात आलोय आपन. नामी संधी मिळाली. तिचा फायदा घे नायतर तुझ्या 'माझ्यासारख्या कितीतरी बायां ढोराच्या मौतीनं मरताहेत.... चल लाग कामाला.!"

 अशा या शांताने आपल्या मोठ्या बहिणीचे घर पूर्णपणे बदलून
टाकले. राहीबाई खूप कष्टाळू. नवऱ्याला सतराशे रुपये पगार असला तरी तो सारा दारुतच जाई. दोन मुलं मुकी. दोन वेळेला हातातोंडाची गाठ पडण्याची मारामार असे. शांतूने मुलांना शाळेत घालायला लावले. मुक्या मुलाचे नाव मूकबधिर विद्यालयात घालायला लावले. मुकी भाची शिवण शिकायलाही येत असे. बालसदनच्या मुलांची माया करतांना ती त्यातच रमत असे... एक दिवस आमच्याकडे लोणावळ्याहून पत्र आले की तेथील बालग्राममध्ये माता हवी आहे. शांतू जाण्यास उत्सुक होती. पण ना लिहिता येतं की वाचता येतं. मग हिशेब कशी लिहिणार ? तरीही आम्ही तिचे नाव पाठवले आणि तिची निवडही झाली. जाण्यापूर्वी तिच्या नवऱ्याविरुद्ध केलेली केसही जिंकली. पण शेवटी तिलाच त्याची कीव आली. त्याने शांतूला भरपाई म्हाणून अवघे पाच हजार रुपये दिले. कायदेशीररीत्या शांतू वेगळी झाली. तिचे म्हागाणे असे, "त्या गाडवाने तिलाबी फशीवलचं की. मी तिला कसा दोस देऊ? तिचं लगीन तिच्या भावानं लावलं. मला न का मिळेना सौंसार कराया. तिने तरी लगनाची बायकू म्हणून राहावं. तुमीच सांगितलं न्हवं? की पयल्या लगनाची बाईच खरी बायकू असते. दुसरीला ठिवलेली म्हनतात. भलेही द्येवासमूर हार घातले असतील. मी सोडचिठ्ठी मान्य केली तर तिचं लगीन खरं मानतील नव्हं? मी मायबाप नसलेल्यांचा सौंसार करेल. मायबापाविना वाढनाऱ्या लेकरांची माय होयाला आवडल मला."

 शांतू लोणावळ्याच्या आंतरभारती बालग्राममध्ये खूप चांगल्या रीतीने राहिली. गेल्या दोन तीन वर्षापूर्वी त्यातील एकाने बालग्राम भाज्याला सुरू केले आहे. त्या बालग्राममध्ये शांतू केवळ 'बालसदनमाता' म्हणून काम करीत नाही तर त्या संस्थेच्या कार्यकारिणीची ती सन्माननीय सदस्या आहे. तीन वर्षापूर्वी आदर्श सदनमातेचा पुरस्कारही तिला मिळाला आहे.

 राहीबाईचा दारुडा नवरा आता या जगात नाही. राहीच्या मूकबधिर मुलाला पनवेलच्या मूकबधिर विद्यालयात घालण्याचे काम शांतूने केले. उरलेल्या मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी घेतली. शांतू दिलासात आली, त्याला दहा वर्षे झाली आहेत. शांतू एकटीचं उगवाईच्या दिशेने प्रवास करीत नाही तर अनेकांपर्यन्त ही उगवती दिशा तिने पोहोचवली आहे. या दहा वर्षात शांतूचे जग बदलले आहे. कालपर्यंत ती जगासाठी होती. आज जग तिचे आहे. आभाळ तिच्यासाठी आहे.