पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारण तो दलित. सवर्णांच्या हाती बागायती, डेअरी, सोसायटी, कारखाने, गिरण्या, बँका. सबसिडी त्याला... मजूर शेतकऱ्याला कायम सापशिडी! विजयेंद्रसारखा तरुण या परिस्थितीतही बदलासाठी 'मंथन' संस्था काढतो. शेतकऱ्याची हलाखी संपवण्याचे हरएक प्रयत्न करतो. पण पैसा मोठा, माणूस छोटा झालेल्या जगात त्याचं स्वप्न हवेत विरतं. पण वाचकाला एकच वाटत राहतं, 'सूरत बदलनी चाहिए।' असा आशावाद, आत्मविश्वास जागवणारी ही कादंबरी!

 या कादंबरीचा मराठी अनुवाद व्हायला हवा. ही कादंबरी प्रत्येक वाडी, वस्ती, बांधावर पोहोचायला हवी. कारण ती शेतकऱ्यांचे केवळ दैन्य, दुःख, आत्महत्या, निराशा चित्रित करीत नाही. खरं चित्र सांगत नवा आशावाद जागवते, सांगते. शेती पोट भरण्याचे साधन असेल तर परंपरेतून तिची सुटका करायला हवी. व्यवसाय म्हणून तिच्याकडे पाहायला हवं. खेड्याची जीवनशैली काटकसरी व्हायला हवी. शेतकरी व्यसनमुक्त हवा. जंगलावर शेतकऱ्याचा अधिकार हवा. 'जल, जंगल, जमीन पर सर्वाधिकारी किसान'. बाजारभाव बांधून हवेत. असं झालं तरच आत्महत्येचा फास ढिला पडेल. अन्यथा, तो रोज आवळत जाऊन आत्महत्येचा फास सगळ्या भारताला विळखा घालेल. आज तो फक्त महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगढपर्यंतच आहे. आधीच उशीर झालाय. अधिक उशीर म्हणजे कृषिप्रधान भारताचं दफन! संजीव यांनी हे सर्व विलक्षण तळमळीनं मांडलंय. उत्तर प्रदेशातला हा लेखक. त्याच्या डोळ्यांत अश्रू मात्र महाराष्ट्राचे. आश्चर्य वाटते या परकाया प्रवेशाचे नि आत्मीयतेचे!

◼◼

वाचावे असे काही/८८