पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शहारे आणतात.

 या गुलाम, काळ्या, वेठबिगारांना तक्रार करायचा अधिकार होता. पण न्यायालयात कधीच कोण्या गोऱ्या अधिकाऱ्याला शिक्षा झाल्याची नोंद नाही. वकील, न्यायाधीश, पोलीस, साक्षीदार; सारे गोरे असत. अपराधी फक्त काळा. तीन पुरुष वा स्त्रियांना १२ फूट बाय ८ फुटाची बरॅक राहायला दिली जाई. त्यात जात, धर्म, वय काही पाहिले जायचे नाही. सारा व्यवहार त्यांना दिलेल्या नंबरावर चालत असे. ठेकेदाराकडून आठवड्याचे राशन पोटी दर दिवशी १० छटाक पीठ, २ छटाक तूरडाळ, अर्धा छटाक तूप या प्रमाणात दिले जाई. आठवड्याचे राशन चार दिवसात संपत असे. मग उसनवारी करून जगायचे. म्हणजे मिळणाऱ्या मजुरीत कपात व्हायची. घरी चार पैसे पाठवण्याचे स्वप्न घेऊन आलेला मजूर रिकाम्या हातानीच घरी जायचा. त्याची फसवणूक दोन्ही बाजूने व्हायची. तिकडे हे अत्याचार. तर इकडे स्वदेशी, स्वगृही आल्यावर त्याला समाज बाटलेला मानून अस्पृश्य करायचा. हा वेठबिगार 'धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का' व्हायचा.

 फिजीद्वीप में मेरे २१ वर्ष' हे तोताराम सनाढ्य यांचे अवघे ३० पानांचे आत्मचरित्र आहे. ते www.hindisamay.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ते तोताराम सनाढ्य यांनी पदरमोड करून प्रकाशित केले. भारतीय गुलामांवरील अत्याचाराविरुद्ध जनजागरण करायचे म्हणून कुंभमेळा, काँग्रेस अधिवेशने यांमधून मोफत वाटले. त्यामुळे भारतीय काँग्रेसने ठराव करून वेठबिगारिवर बंदी आणली. जे मजूर मॉरिशस, फिजी, त्रिनिदाद, सुरिनाम, दक्षिण आफ्रिकेत राहिले त्यांच्या त्या बलिदानाचे सार्थक म्हणजे त्यांची उत्तराधिकारी पिढी आज त्या देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती झाले आहेत. असे जगात असंख्य देश आहेत. महात्मा गांधींनी सुरू केलेली स्वातंत्र्य चळवळ खरे तर याच गुलामीविरुद्ध होती.

◼◼

वाचावे असे काही/७४