पान:वनस्पतिविचार.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



वनस्पतिविचार.
---------------
प्रकरण १ लें.
---------------
सजीव व निर्जीव वस्तूंची मीमांसा

 पृथ्वी कांहीं विशिष्ट वस्तूंची बनली आहे व प्रत्येक वस्तु तीन स्वरूपांमध्यें असू शकते. ही स्वरूपें वायु, द्रव व घन होत. ही स्वरूपें प्रत्येक वस्तूस कमीअधिक उष्णतेच्या मानाने प्राप्त होतात. नेहमीचे उदाहरण-पाणी हे घ्या. ह्यास ही तिन्ही रूपे कमी अधिक उष्णतेप्रमाणे देता येतात. पाण्याचें बर्फ, त्याची वाफ, अगर वाफेचे पाणी, अथवा पुनः बर्फ, इत्यादि रूपे पाणी ह्या वस्तूस फारच थोड्या प्रयासाने देता येतात. आतां पृथ्वीवरील सर्व वस्तूंचा विचार केला असतां आपणांस असे आढळून येईल की, कांहीं वस्तु वायुरूपांत, कांहीं द्रवरूपांत व कांहा घनस्थितीत असतात. उदाहरणार्थ, वातावरण, समुद्र, डोंगर, वगैरे.
 पुष्कळ शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की, हें सर्व विश्व प्रथम अत्युष्ण वायुरूपीं होतें व ह्या वायुरूप विश्वास चक्रगति प्राप्त झाली होती. चक्रगतीबरोबरच केंद्रोत्सारिणी ( Centrifugal ) शक्ति उत्पन्न होत असते. शेतकरी गोफणींत दगड घालून दोन तीन वेळां गोफण फिरविल्यावर आंतील दगड फार जोराने फेकू शकतो. प्रथम शेतकरी गोफणीस चक्रगति देतो. जसजसा चक्रगतीचा जोर अधिक होतो, त्या प्रमाणात केंद्रात्सारिणी शक्ति अधिक वाढते. ह्या नियमान्वये गोफणींतील दगड वेगाने दूर जातो. तद्वतच ह्या अत्युष्ण चक्रगति प्राप्त झालेल्या वायुरूप गोलापासुन शेंकडों लहान लहान वायुरूपीं गोल दूरवर फेंकिले गेले. अशा दूरवर फेंकिलेल्या गोलांपैकी पृथ्वी हा एक गोल आहे.