पान:वनस्पतिविचार.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     वनस्पतिविचार,     [ प्रकरण
-----

 सृष्टिनियम असा आहे की, प्रत्येक वस्तूंतून उष्णता आकाशांत सर्व दिशेला जाते. यामुळेच सुर्यमंडळापासून सर्व दिशेला उष्णता जात आहे. ह्या नैसर्गिक नियमान्वयें त्या दूर फेंकिलेल्या वायुरूपीं पृथ्वी-गोलापासून उष्णता आकाशांत Space नाहीशी होत गेली. अशी उष्णता जात चालल्यावर त्या गोलावरील ज्या वस्तूंना वायुरूपांत राहण्यास उष्णता कमी झाली, त्या वस्तु द्रवरूपांत जाऊ लागल्या. अशा द्रवरूप पावलेल्या वस्तु गोलाच्या मध्यभागांकडे जमत जाऊन, त्यावर द्रवरूपी नवीन आवरणे येत चालली. ह्यांपैकी कांहीं आवरणांना कालांतराने घनस्थिति येत गेली. पृथ्वीचा पृष्ठभाग ह्याच आवरणांपैकी घनत्व पावलेला जड भाग होय. पृथ्वीच्या पोटांत वरील जाड कवचाखाली अजूनही अत्युष्ण द्रवरूप वस्तु आहेत. हे ज्वालामुखी पर्वत, त्यांतून वाहणारा पाषाणरस, भूकंप, इत्यादि प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टींवरून स्पष्ट व्यक्त होत आहे. सारांश, पृथ्वी ही पूर्वी वायुरूपांत असून नंतर जशी जशी उष्णता कमी झाली, तशी तशी ती द्रवरूपांत जाऊन मागाहून घनरूपांत येत गेली. हल्लीच्या उष्णतेच्या मानाने जे पदार्थ वायुरूपांत राहणे शक्य आहेत, ते त्या स्थितीत आहेत. त्या पदार्थांचेच पृथ्वीसभोवतालचे वातावरण झाले आहे. जे पदार्थ द्रवरूपांत राहणे शक्य आहे, ते आपण द्रवस्थितीत पाहतों; जसे पाणी वगेरे, तसेच राहिलेल्या पदार्थांचे डोंगर, जमीन, वगैरे पृथ्वीचे घनरूप भाग होत.

 एकंदरीत आपली पृथ्वी विशिष्ट रूपांत असलेल्या निरनिराळ्या वस्तूंची बनली आहे. वरील सर्व वस्तूंचे बारकाईने निरीक्षण केले असता त्या दोन प्रकारच्या आहेत असे आपणांस आढळून येईल. १ निर्जीव वस्तू व २ सजीव वस्तु. दोहोंमध्ये पुष्कळ फरक आहे. निर्जीव वस्तूचे पुष्कळ कण एके जागी जमून ती वस्तु वाढत असते. वाळू ही निर्जीव वस्तु आहे. वाळूचे कण एके ठिकाण मिळून त्यांचा दगडासारखा थर बनतो. नवीन कण सारखे जमत गेले असता थरांवर थर होत जातील. असे थर जमून एक मोठा पाषाणसमुच्चय तयार होईल, भूकंप, तसेच पृथ्वीच्या कवचांतील अंतर घडामोडीने हा समुच्चय वर उचलला जाऊन टेकडी अथवा डोंगरही तयार होतील. असे डॉगर जवळ जवळ तयार झाले, तर पर्वतांची रांग अगर ओळ बनेल. त्याचप्रमाणे उलटपक्षी भूकंप, भूगर्भातील अंतर घडामोडी, सूर्यकिरणें, पर्जन्य, हवा, थंडी, इत्यादि