पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महाराष्ट्रात ‘झुणका-भाकर' योजना राबवून जाती-भेद दूर करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनाच बोलावून सहभोजन योजले होते. त्यांच्या नि नानांच्या मातोश्री भागीरथीबाई गद्रे यांनी बत्तीसाव्या वर्षी वैधव्य येऊनही न डगमगता कोकणात 'मातृमंदिर' स्थापून स्त्री आरोग्याचा श्रीगणेशा केला. नानांनंतर त्यांचे चिरंजीव व कुटुंबीय आजही दातृत्व व मातृत्वाचा दिवा विझू नये म्हणून प्रयत्नशील आहेत. नानांचे चिरंजीव चंद्रकांत गद्रेही असेच उदार. त्यांनी इथल्या सागर शिक्षण मंडळाच्या हायस्कूलला बाबूराव धारवाडे यांच्या विनंतीवरून २५ लक्ष रुपयांचे साहाय्य केलं. पन्नास द्यायचे होते. पंचवीस दिले. नावाची अट नाकारली. असं औदार्य गद्रे कुटुंबीयच करू शकतात. बाबूराव धारवाडे यांनी नानांच्या नावे हायस्कूल सुरू करून जिवंत स्मारक उभारले आहे.
 नाना, भाऊ, बापू, सर्वांवर महात्मा गांधीचा फार मोठा पगडा नि प्रभाव होता. तिघांनी टोपी कधी सोडली नाही की बदलली नाही. तिघेही मातृहृदयी. नावांचं सामाजिक वजन इतकं मोठं होतं की ते फोनवर बँकेचे लक्षावधीचे व्यवहार करत. चेक नंतर पोहोचायचे. पैसे अगोदर मिळायचे. इथल्या समाजजीवनात शब्दप्रामाण्य, मूल्यनिष्ठा, सचोटी, समाजशीलता, उपजत दातृत्व नि मातृत्व यांचा एक कधीही न आटणारा एक झरा नानांच्या रूपाने सतत झरायचा. तो निमाला. आज त्यांचं स्मरण कृतीसाठी आपणा सर्वांना खुणावतंय! आपणही समाजकार्यासाठी आपल्या कष्टातला एक रुपया रोज देत राहिला पाहिजे.

***

जाणिवांची आरास/८८