पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माध्यमिक तर सोडाच, चक्क उच्चशिक्षण घेतात. आमच्या महावीर महाविद्यालयानं बंदीजनांसाठी (नव्हे या बंधूजनांसाठी!) इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरू केलं आहे. पुढच्या वर्षी अनेक बंदीबांधव पदवीधर होतील. ज्याचा पदवीदान समारंभ तुरुंगात हाईल. तो तुरुंगात संपन्न झालेला जगातला पहिला पदवीदान समारंभ ठरेल. इथे लवकरच सुसज्ज रुग्णालय सुरू होत आहे. इमारत बांधून केव्हाची तयार आहे, पण शासन डॉक्टर, कर्मचारी केव्हा देतात कुणास ठाऊक? इथं लवकरच द्रुतगती न्यायालय सुरू होईल. त्वरित न्याय हा तुरुंगातील बांधवांचा सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय. पालकभेट, पत्रे, बातमी यांची कोण ओढ असते बंदीबांधवांत. इथले तुरुंग अधिकारी आता'शोले'तले ‘अंग्रेजों के जमाने के जेलर' राहिले नाहीत. ते ‘समाज शिक्षक' होत आहेत. महाराष्ट्रातील तुरुंगात बंदीबांधव जी विविध उत्पादनं करतात, त्यातून येणारं उत्पन्न कित्येक कोटींच्या घरात आहे. बंदीजनांच्या संख्येच्या मानानं काम कमी पडतं. कारण आपण त्यांच्या उत्पादनांच्या खरेदीस प्राधान्य देत नाही. बनियन, चादर, सतरंजी, टॉवेल, फर्निचर, फळफळावळ, भाजी, अंडी, फुलं अशा कितीतरी वस्तूंचे उत्पादन इथं होतं. बंदीजनात डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर अन् हो वकीलही असतात. ते एकमेकांस उपचार, सल्ला, शिक्षण देत चार भिंतीतलं आपलं जीवन एकमेकांच्या साहाय्यानं सुसह्य करतात. मला खात्री आहे, हे सर्व वाचून तुम्हास आपणही तुरुंगात एकदा जाऊन आलं पाहिजे असं वाटेल. तुरुंगातील बंदीजनांचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून तुरुंग प्रशासन, मानवाधिकार आयोग खूप प्रयत्न करत आहे. पण तुरुंगात कुणासच जाऊ लागू नये असं सामाजिक स्वास्थ्य निर्माण व्हायला हवं. ती समाज सुधारल्याची खरी खूणगाठ ठरेल.

***

जाणिवांची आरास/५२