पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आठवणींचे पाझर

 माणसाचं सारं जीवन आठवणींच्या पाझरांनी चिंब भिजलेलं असतं. हे सारे आठव माणसास सतत सजीव, रसरशीत बनवत असतात. माणसाच्या काही आठवणी त्याची जीवनभर सोबत करतात, तर काही क्षणिक! काही आठवणींना सुगंध असतो तर काहींना सल असते! आठवणींनी कधी डोळे पाणावतात तर कधी ते शून्यात हरवतातही! आठवणींची सोबत तशी सार्वकालिक असते. भर गर्दीतही आठवणी आपला पिच्छा पुरवत असतात ना? आपण एकटे असलो की त्या नुसत्या उच्छाद मांडतात! मी वयाची छप्पन्न वर्षे मागे सारली तरी या आठवणी काही माझा पाठलाग सोडत नाहीत. उलट त्या वय वाढेल तशा अधिक आक्रमक, सजग होत आहेत असं मला वाटतं.
 परवा मी एका विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या लग्नाला म्हणून बार्शीला गेलो नि माझ्या बालपणीच्या आठवणींचं मोहळ उठलं. मी दुसरीत असताना बार्शी-वैरागजवळ असलेल्या मालेगावमध्ये मे महिन्याची की दिवाळीची सुटी घालवली होती. माझी मावस-मानलेली बहीण तिथं राहायची. ती सुटी लक्षात राहायचं एकच कारण. मी माझ्या जीवनातलं पहिलं खेडं तिथं पाहिलं- अनुभवलं होतं. बार्शीला गेलोय तसा मी नंतर अनेकवेळा! प्रत्येकवेळी मालेगावच्या आठवणींचा भुंगा गुंजारव करत असायचा. या वेळी गाडी हाताशी होती. शोधून काढायचा हिय्या केला नि यश आलं. तीव्र इच्छेस अपयश असत नाही हेच खरं!
  मी पहिलं शेत इथंच पाहिलं होतं. हुर्डा खाल्ला होता इथंच. गाई, म्हशी, बैल, कुत्री, मांजरं, कोंबड्या, शेळ्यांच्या सहवासातले ते दिवस

जाणिवांची आरास/५३