या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
माना... असं सांगत सद्सद्विवेकबुद्धी हिरावून घेऊन माणसास अस्तित्वहीन, सदाशरण करून टाकतात तसे वर्तमानात घडते आहे.
शिक्षण, प्रशासन, सहकार, माध्यम, बँक, उद्योग, व्यापार जिथे म्हणून विचार करून व्यवहार करायची शक्यता असते तिथे सत्यअसत्याशी मन केले ग्वाही, नाही मानियले बहुमता' असा स्वतंत्र विचार व कृती होणार नाही हे निरंतर डोळ्यात तेल घालून पाहिलं जाणं यासारखं मनुष्य विकास खुटविणारं दुसरं अस्त्र-शस्त्र नाही. ज्या देश, समाजात सार्वजनिक सत्ता, संपत्ती, साधनांवर अगदी वैध मार्गांनी एकाधिकार मिळवून व्यक्तिगत प्रतिष्ठा, वर्धन, प्रतिमापूजन होत राहणे हे काही समाजहिताचे असत नाही. सत्-असत्, न्याय-अन्याय, नैतिक-अनैतिक, विधी-निषेध यात तारतम्य नि विवेकाधारे फारकत करण्याचं स्वातंत्र्य असणं म्हणजे ती व्यवस्था अंतिमतः मनुष्य कल्याणकारी असणं होय. आपण इतिहासाच्या प्रवासात राजेशाही, हकूमशाही, सरंजामशाही, जमीनदारी नष्ट करून राजा जागी प्रजा आणली. याचा अर्थ बहुमत मान्यता व सन्मान आणला. जर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात घराणेशाहीमार्गे तेच जुने तंत्र येणार असेल तर तो प्रबोधनपर्वाचा पराभवच मानायला हवा. आदर्श समाजरचनेत सर्वसामान्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीस शाबूत ठेवण्याचे आश्वासन असतं. तिथे मग सत् असत्मधून तर्क, विवेक, बुद्धीच्या आधार नि कसोट्यांवर निर्णय शक्यता निर्माण होते. माती जागवेल त्याला मत' अशी व्यवस्था असली की आत्महत्येची वेळ येत नाही. माझ्या मना बन दगड' असं बुद्धीजीवी वर्गाला वाटू लागणं म्हणजे विचारप्रक्रिया कुंठित होणं. 'मुठी वळू नका, मनगटे सरसावू नका' असे सांगितले जाऊ लागले की, समजावे ‘मुकी बिचारी कुणी हाका'चा काळ येतो आहे. सामान्य माणसाचं मन प्रफुल्लित, आश्वासक राहणं हे। समाजजीवनात अत्याधिक महत्त्वाचं असतं. ते व्यापक हित धोरणातूनच शक्य असते. त्यासाठी समाजधुरीण, सत्ताधारी, साहित्यिक, संपादक, शिक्षक, कलाकार या सर्वांचा सद्सद्विवेक समानपणे जागृत व सक्रिय असणे तितकेच महत्त्वाचे असते.
जाणिवांची आरास/१५८