पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






विवेकबुद्धी


      हे काय प्रकरण आहे? ही क्षमता आहे, वृत्ती आहे, व्यवस्था आहे की काय आहे? सत्, असत्, विवेक नि बुद्धी अशा चार वेगवेगळ्या स्थिती, घटकांचा संयोग म्हणजे एक सार्वजनिक विचार, व्यवस्था होय. ती भूतकाळात होती, वर्तमानात आहे नि भविष्यातही राहील. विज्ञान अनेक चमत्कारिक शोध लावतो आहे. ते मनुष्यहितकारी असतात तोवर ठीक; पण अशी कल्पना करा की, मानवी कल्पात (क्लोन) फेरफार करून विज्ञानाने माणसाची मतीच गुंग करून टाकली तर? मग सत्, असत्, विवेक, बुद्धी हे सारे शब्द, त्यांचे अर्थ, संदर्भ मुळासकट संपून इतिहासजमा होतील ना? पण तसे काही होण्यापूर्वीच वर्तमानात एक चाणाक्ष यंत्रणा विज्ञानाच्या आधाराशिवाय असा कायाकल्प घडवून आणत असल्याचे लक्षात येते. या यंत्रणेचा लक्ष्य गट आहे बुद्धिवादी वर्ग. म्हणजे उदाहरणार्थ शिक्षक घेऊ, त्याला तुम्ही सेवाशाश्वती दिली की, तो स्वप्रज्ञ होतो. त्याला मत, मन, मनगट येतं. म्हणून मग काय करायचं तर त्याची शाश्वतीच हिरावून घ्यायची. शासन, संस्था, सत्ता अशा मोक्याच्या जागेवर बोक्यासारखं लक्ष ठेवून सतत ते सर्व आपल्या मुठीत राहील असं पाहायचं. सार्वजनिक पैसा, साधन, संपत्ती अगदी लोकशाही मार्गांनी अशी कवेत ठेवायची की, त्याने श्वासही आपल्याला विचारूनच घ्यायचा. सर्वत्र जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पाठीचा कणा नसलेले, मतांचा विकास होणार नाही असे लीन संप्रदायी समाज निर्माण करायचे. बाबावाद जसा डोळे मिटा, हात जोडा, नतमस्तक व्हा, विचार करायचे सोडा, फक्त मी तुमच्या ध्यानी, मनी, रंध्रा, श्वासात आहे असे कल्पा. स्वविसर्जन करा ‘तो’ ‘मीच' ओ


                          जाणिवांची आरास/१५७