पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नॅनोचं वादळ

 टाटाची 'नॅनो' मोटार गाडी बाजारात आली. तिनं मोटारीच्या बाजारात जसं एक नवं वादळ आणलं तसं सामान्यांच्या मनातही तिनं नवं स्वप्नवादळ निर्माण केलं आहे. 'नॅनो'मुळे बाजारात अशाच लहान मोटारींचा सुळसुळाट होणार हे उघड आहे. 'मारूती'मुळे भारतात छोट्या गाड्यांचं युग सुरू झालं. त्यामुळे मोटार ही मोठ्यांची मिरासदारी न राहता सामान्य मध्यमवर्गीयांच्या ती आवाक्यात आली. तरी ती किमतीच्या अंगाने उच्चवर्गीयांचीच राहिली. नॅनोमुळे शिक्षक, लेखनिक, पोलीस, कनिष्ठ अभियंते, प्रोग्रामर असे निम्नमध्यवर्गीय मोटारमालक होतील हे उघड आहे. दोनचाकीची जागा चारचाकी घेणार हे नवे सामाजिक प्रश्न निर्माण होणार हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.
 तिच्यामुळे रस्ते, पार्किंग, प्रदूषण, मोटारींच्या किमतीचे युद्ध, पेट्रोलचा प्रश्न अशा समस्या निर्माण होतील. सध्याचे आपल्या शहरातील गावातील रस्ते इतके अरुंद आहेत की गावच्या लोकसंख्येनुसार गावातील रस्त्यांची रुंदी, लांबी, वळणे, कुंपणांची उंची, दुभाजक, पादचारी मार्ग याबाबत राष्ट्रीय धोरण व नियोजनाचा प्रश्न वादळाचे रूप धारण करील. मी या मोटारींचा विरोधक नाही. पण मोटारींची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेता रस्त्यांचे नियोजन हा कळीचा मुद्दा बनेल.
 दुसरा प्रश्न वाहतुकीची कोंडी आणि त्यातून होणारी दिरंगाई हा असेल. जुन्या रस्त्यांच्या रुंदीकरणाबरोबर उपनगरातील व नव्या वसाहतीतील रस्त्यांची रुंदी आत्ताच वाढवली पाहिजे. रस्त्यांवर दुभाजक, नियंत्रक, सिग्नल,

जाणिवांची आरास/१२३