पान:गांव-गाडा.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८      गांव-गाडा

 ष्ट्रारच्या गैरहजरीत ज्यांपैकी एकजण ख्रिस्ती आहे अशा वधूवरांचे लग्न लावले तर तो दहा वर्षेपर्यंत सक्तमजुरीच्या शिक्षेस पात्र होतो. सोलापूर जिल्ह्यांत एका महार मुरळीने आपली नात ख्रिस्ती शाळेत घातली, व तिचा बाप्तिस्मा झाला. ती उपवर झाल्यावर जातीच्या विचाराने तिने तिचे लग्न दुसऱ्या एका महार मुरळीच्या मुलाशीं गांवभटाकडून लाविलें. बाप्तिस्मा झालेल्या लोकांचें नांववार सर्क्युलर गांवच्या चावडीस लागत नसते, आणि त्यांची दौंडीही पण देत नाहीत. तरी पण ' शांतिरस्तु पुष्टिरस्तु' गांवभट, नवरानवरीचे आप्त, जातभाऊ वगैरे मांडव साजरा करणारी सर्व मंडळी गुन्ह्यांत सांपडली. परंतु युरोपियन माजिस्ट्रेटानें सारासार विचार पाहून खैर केली व भटजीचे चौथ्या प्रहरी धिंडवडे झाले नाहीत.

 जातींतल्या लोकांवरील जें प्रमुखत्व जातीने आपणाकडे ठेविलें, त्याचा अंमल जोपर्यंत जातीची संख्या थोडी आणि वस्ती लहानशा प्रदेशांत होती तोपर्यंत सबंध जात एकत्र जमून करी. जसजशी वस्तिवाडी वाढली आणि लोक दूरदूर ठिकाणी जाऊन राहूं लागले तसतसें सबंध जात गोळा होणं अवघड पडू लागले. तेव्हां जातींतील मुरब्बी व शिष्ट माणसें गोळा होऊन जातप्रकरणाचा निवाडा करीत व तो सर्व जात मान्य करी. कालांतराने सबंध जातींतील शिष्ट किंवा पंच गोळा करणं सुद्धां अडचणीचे होऊ लागल्यावर जातीजातींनी आपापल्या प्रमुख घराण्यांतून काही अधिकारी नेमले, आणि जेथे जेथे जातीची वस्ती असे तेथे तेथे त्यांनी सोयीप्रमाणे सबंध जात अगर पंच गोळा करून जातप्रकरणांचा निकाल करावा, असा त्यांस अखत्यार दिला. अशा प्रकार स्थानिक जातपंचायतीकडून ज्या वादांचा निर्णय लागत नसे त्यांचा निर्णय लग्न अगर दिवस अशासारख्या प्रसंगी अनेक ठिकाणचे पंच जमवून लावीत. जातीने जे अंमलदार नेमले त्यांत जातपाटील, जातचौगुला हे प्रमुख होत. ब्राह्मण व क्षत्रिय वर्णात मोडणाऱ्या जातीत जातपाटील वगैरे अधिकारी दक्षिण प्रांती फारसे दिसून येत नाहीत. स्थान-