पान:गांव-गाडा.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९६      गांव-गाडा.

ल्यास हा खुशाल त्याची शिफारस करणार. त्यांतून ह्याने जर कां कर्ज घेणारापासून पानसुपारी खाल्ली असली अगर तो ह्याच्या नात्यांतला असला तर मग शिफारस म्हणजे सोळा आणे उतरावयाची. समाजाच्या ह्या वर्तनानें सावकारांना फाजील दक्ष रहावे लागते, आणि आपल्या पैशासाठी शिकस्तीची मजबुती करून ठेवावी लागते. व्याजाचे दर भारी होण्यास किंवा सावकारी हिशेबांत खोटेपणा शिरण्यास आमच्यांतली नेकीची वाण हे एक कारण असावें. जेव्हां पैसा एकट दुकट सावकाराचा नसतो आणि जनसमूहाचा समाईक म्हणजे सार्वजनिक असतो, तेव्हां तो वाटेल तसा वेडावांकडा खर्च करण्याची लोकांना दिक्कत वाटत नाही. त्यांत कोणी कासाविशी करूं लागला तर त्याला धडधडीत म्हणतात की, 'वाहत्या गंगेत हात धुवून घे, खर्चणाराचे खचते आणि कोठवळ्याचें कां पोट दुखतें ?' ह्याचा अर्थ इतकाच की, पैसा स्वतःचा नसला म्हणजे त्याच्या योग्यायोग्य खर्चाकडे कोणी प्रामाणिकपणाने व बारकाईने पाहूं नये. म्हणूनच आमच्या सार्वजनिक व्यवहारांत ठोकरी बसतात. ही खेदजनक स्थिति नाहीशी करण्याला पतपेढी ही उत्कृष्ट दवा आहे. तिचें वर्मच हे की, उच्चनीच भाव न धरितां एकमेकांस नडीच्या वेळी कर्ज देऊन साह्य करावयाचे, आणि बोलीप्रमाणे पैसा बिनतक्रार परत करावयाचा, म्हणजे सर्वांनी बंधुत्वाने समसमान वागावयाचें. कळाची लायकी, ऐपत ह्यांचा विचार कर्ज देतांना किंवा वसूल करतांना न केला तर स्वतःचे भांडवलाला धक्का बसणार. तेव्हां मिंधेपणा, कोडगेपणा आणि परवित्ताविषयीं औदासीन्य वगैरे जे वैयक्तिक व सामाजिक दुर्गुण आमच्या बहुजनसमाजाच्या हाडांमासांत खिळले आहेत ते पतपेढ्यांमुळे नाहीसे होऊन लोक स्वाभिमानी, दक्ष आणि जरूरीप्रमाणे स्पष्टवक्ते व नेटदार झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी उमेद धरण्यास पुष्कळ जागा आहे.

 व्यापारी कसबाकडे आमच्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे आमची निष्कांचन स्थिति झाली आहे. ज्या वर्गाची व्यापारी दृष्टि समूळ नाहींशी