पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४१ )
व्यंकटराव नारायण.

घेण्यास ते कबूल झाले.आपणाप्रमाणें संभाजीमहाराजही शककर्ते शिवाजी महाराज यांचे नातूच आहेत, त्यांसही राज्य म्हणून उपभोगण्यासाठीं कांहीं मुलूख दिला पाहिजे, असें शाहूमहाराजांच्याही मनांत आले आणि त्यानीं कृष्णा-वारणेपासून तुंगभद्रेपर्यंतचा मुलूख संभाजी महाराजांस 'दिला'. यावरून सातारा व करवीर हीं दोन एकमेकांपासून अलग व स्वतंत्र राज्यें झालीं असें मात्र कोणी समजूं नये. दोन्ही राज्यांवरची सार्वभौम सत्ता शाहूमहाराजांकडेच राहिली व युवराजास राज्य करण्यासाठीं जसा कांही प्रदेश द्यावा त्याप्रमाणें करवीरच्या राज्याची स्थिति राहिली. अलीकडच्या शब्दांत दृष्टांत द्यावयाचा तर हल्लीं ब्रिटिश साम्राज्यांत अंतर्गत स्वराज्यें आहेत त्या नमुन्यावर हें करवीरचे राज्य निर्माण झालें. शाहूमहाराजांमागे त्यांच्या राज्यांतले अधिकारी औपचारिक रीतीनें कां होईना, पण संभाजीमहाराज व त्यांचे वंशज यांचा धनीपणाचा दर्जा व नातें मान्य करीत गेले; हा या दुसऱ्या दृष्टांतांत समाविष्ट न होणारा विशेष आहे. व दोन्ही राज्यें पस्परांपासून भिन्न नसल्याचें तें एक प्रमाणही आहे. ही राज्याची वांटणी झाली त्या वेळीं शाहूमहाराजानीं जो तहनामा ठरवून दिला त्याला कृष्णा वारणेचा तह असें म्हणतात. हा तह झाल्यामुळें स. १७३० पासून करवीरचें राज्य मराठी साम्राज्यापासून अलग व स्वतंत्र झालें असें ग्रेहामसाहेब म्हणतात तें चूक आहे. हिंदू राज्याची वांटणी होऊं शकत नाही व हा राज्याच्या वांटणीचा तहही नव्हे. याचें स्वरूप केवळ घरगुती करारपत्राचें आहे. हा तह असा-

 तहनामा चिरंजीव राजश्री संभाजीराजे यांसी प्रती राजश्री शाहूराजे यांणीं लिहून दिल्हा. सुरूसन इहिदे सल्लासीन मय्या व अल्लफ.स. १७३०फ.११४० छ० १६ साबान विरोधिकृत संवत्सरे (शके १६५३ इ. स. १७३० तारीख २५ माहे मे. ) चैत्र वद्य २. बितपसीलः-