पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१७४)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

त्यासंबंधी पुष्कळ भवति न भवति होऊन शेवटीं स.१८४७ त इंग्रजसरकारानें असा निकाल केला कीं, इचलकरंजी संस्थान हें करवीरकर छत्रपतींच्या ताबेदारीतलें आहे.
 शाहूमहाराजांच्या व पेशव्यांच्या कारकीर्दीतल्या दाखल्यांचा कांहींच विचार न करितां ज्या अर्थी इलाखाप्रकरणाचा अशा प्रकारें निकाल देण्यांत आला आहे, त्या अर्थी हा निकाल अन्यायाचा तर आहेच; पण शिवाय या प्रकरणीं सरकारानें जें त्या वेळेपर्यंत वर्तन केलें त्याशीं अत्यंत विसंगत आहे! कारण कीं निपाणकराकडून इचलकरंजीकरांस गांव परत देण्याच्या कामीं पेशवाईत खुद अल्पिष्टन् साहेबानींच इचलकरंजीकर हे करवीरकरांचे ताबेदार नाहींत ही गोष्ट कबूल केली आहे व इंग्रजी कारकीर्द सुरू होतांच पटवर्धनांप्रमाणें तुम्हीही तह करून घ्या असें इचलकरंजीकरांशीं बोलणें केलेलें आहे. त्यानंतर पुढच्या अंमलदारांनींही इचलकरंजी संस्थान हे फक्त कंपनीसरकारच्या परवर्षीतलें आहे असें वारंवार म्हणून त्या संस्थानास तसेंच वागविलें आहे. असें असतां स. १८४७ त इचलकरंजी संस्थान हें करवीरकर महाराजांच्या ताब्यांतले आहे असें जर सरकार म्हणूं लागलें, तर पूर्वीच्या वर्तनाशीं या वर्तनाचा मेळ कसा बसवावयाचा, हें काहीं आमच्या लक्षांत येत नाहीं!
 इलाखाप्रकरणाचा निकाल असा अकल्पित रीतीनें आपणाविरुद्ध झाला, आपल्या पूर्वजांनी अनेक प्राणसंकटें सोसूनही केवळ तरवारीच्या जोरावर जें ब्रीद रक्षण केलें तें गमावण्याचें आपल्या कपाळीं आलें, हें पाहून तात्यासाहेबांस फारच वाईट वाटलें. कोल्हापूरकरांचा ताबा आपल्या कुळांत कधीं कोणीं पतकरला नाहीं व तो आपणही कधीं पतकरणार नाही, आपणास सरकारानें नेमणूक ठर-